बालपणी शिवबाराजांनी रामायण महाभारत आदि ग्रंथातील गोष्टी ऐकलेल्या हे आपल्याला माहिती आहे. मात्र केवळ गोष्टीच न ऐकता त्यांनी प्राचीन भारतीय राजनीती, कूटनीती यांचाही पुरेपूर अभ्यास केला होता हे आपल्याला त्यांचं चरित्र अभ्यासताना जाणवतं. अनेकदा आपण म्हणतो की, शिवाजी महाराजांनी अमुक केलं, तमुक केलं.. त्यावेळी आपण हे लक्षात घ्यायला हवं की स्वराज्यासाठी महत्वाचे निर्णय हे महाराज त्यांचे मुत्सद्दी आणि गुप्तहेर यांच्याशी सल्ला मसलत करून घेत असत. त्या सर्वांनी युद्धनीतीचा फार बारकाईने अभ्यास केला होता.
युद्धनितीचा अभ्यास
शिवाजी महाराजांनी लढलेली युद्धे आणि त्याचा रोमहर्षक इतिहास वाचताना, ऐकताना आपण अनेकदा त्यांनी वापरलेल्या युद्धनीतीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करतो. युद्धनीतीमधील शिवरायांनी वापरलेल्या अनेक तत्वांपैकी दोन महत्वाची तत्वे म्हणजे स्वतःला हवं त्यावेळी शत्रूवर हल्ला करणं आणि स्वतःला हव्या त्या जागेवर युद्ध घडू देणं. या दोन गोष्टींवर युद्धाचे निर्णायक यश फार अवलंबून असतं. शिवरायांच्या नंतर पहिले बाजीरावदेखील ही तत्वे वापरताना दिसतात. शिवकाळातील विविध युद्धांचा मागोवा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की, प्रत्येक युद्धावेळी शिवरायांनी वेगळे डावपेच आखले आहेत.
फतेहखानचा पराभव
त्यांच्या आयुष्यातील पाहिल्या मोठ्या लढाईवेळीची गोष्ट. फतेहखान किंवा फत्तेखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यावर चालून आला. यावेळी परिस्थिती फार बिकट होती. प्रत्यक्ष शहाजीराजे आदिलशाही कैदेत होते. एकीकडे फतेहखान इकडे तर फरादखान हा सरदार शिवरायांचे बंधु संभाजीराजे यांच्यावर कर्नाटकमध्ये चालून गेला होता. तरीही हे दोघंही भाऊ डगमगले नाहीत. शिवरायांनी बलाढ्य अशा पुरंदर किल्ल्यात ठाण मांडले. एकीकडे शिरवळचा सुभानमंगळ जिंकून फतेहखानाच्या एका तुकडीला पराभूत केलं तर प्रत्यक्ष खानाला त्याच्या सैन्यासह अगदी किल्ल्यापर्यंत येऊ दिलं. ते सगळे अर्धा गड चढून आल्यावर त्या दमलेल्या सैन्यावर घणाघाती हल्ला चढवून त्यांची दाणादाण उडवली.
युद्धभूमी ठरवत लढणारा राजा
त्यानंतर अजिबात माघार न घेता कोकणातील प्रदेश, जावळीचे खोरे, कल्याण भिवंडीपर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. रायगड ताब्यात घेतला. जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडची निर्मिती केली. ज्यावेळी अफजलखान चालून आला तेव्हा पुन्हा महाराजांनी वेगळं धोरण अवलंबले. त्यांच्या बलाढ्य सैन्याला थेट अन्य कुठे भिडायचे नाही असं ठरवलं. केवळ गोपीनाथकाका बोकिल या एका राजदूताच्या माध्यमातून अफजलखानाला बेसावध ठेवत गर्द जंगलातील प्रतापगडजवळ आणलं. जेव्हा भेटायचं ठरलं तेव्हा महाराज आणि त्यांच्या मुत्सद्दयानी सर्व नियोजन केलं. खानाच्या सर्व सैन्याचा पराभव करायचे ठरले. प्रत्येक सरदारांना जागा आणि कामे नेमून दिली. प्रसंगी काही दगाफटका झालाच तरी माघार न घेता शत्रूचे सर्व सैन्य जावळीच्या खोऱ्यातच संपवावे ही स्पष्ट सूचना दिली. सुदैवाने शिवरायांच्याच हातून खान मारला गेला आणि मग मराठ्यांनी त्या फौजेचा दणदणीत पराभव केला.
तो सारा युद्धइतिहास खूप बारकाईने समजून घ्यायला हवा. इतका मोठा विजय मिळाल्यावरही महाराज आणि मराठी सैन्य विजयोत्सव साजरा करत बसले नाहीत तर त्यांनी मोठ्या झपाट्याने कराड, कोल्हापूर, वाळवा, रायबाग, चिकोडी पर्यंतचा मुलुख स्वराज्यात आणला.
हे ही वाचा : रयतेला मुलाप्रमाणे जपणारे शिवछत्रपती …
उघड्या मैदानातील लढाई
जेव्हा रूस्तूमेजमा आणि फाजलखान मराठ्यांवर आक्रमण करायला आले तेव्हा महाराजांनी कोणत्या किल्ल्यात न लपता कोल्हापूर आणि मिरजच्या दरम्यान एका खिंडीच्या पायथ्याशी भर मैदानात त्यांचा सामना केला आणि त्यांना पळवून लावले.
सिद्दी जौहरचा पराभव
जेव्हा सिद्दी जौहर स्वराज्यावर चाल करून आला, तेव्हा नव्याने हाती आलेल्या स्वराज्यात युद्ध नको असे ठरवून स्वराज्याच्या वाढलेल्या भागाच्या सीमेवर असलेल्या पन्हाळा उर्फ पर्णाल दुर्ग येथे राजांनी स्वतः ठाण मांडले आणि सिद्दी जौहरला अंगावर घेतले.
शाहिस्तेखानाचा बिमोड
काही महिने गेल्यावर पावसाळा सुरू झाल्यावर मोठ्या चतुराईने आणि कौशल्याने वेढा फोडून पलायन केलं. आणि पुन्हा राजगड गाठला. त्यावेळी स्वराज्यात शाहिस्तेखान दाखल झाला होता. त्याने तर पुण्यात असलेल्या शिवरायांच्या लालमहालातच ठिय्या दिला होता. नामदारखान, कारतलबखान असे त्याचे सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालू लागले. तेव्हा पेणजवळ थेट आक्रमण करत शिवरायांनी नामदारखानचा पराभव केला. मात्र कारतलबखानाशी लढायला त्यांनी वेगळी योजना आखली.
कारतलबखान ज्या उंबरखिंडीच्या वाटेने जाणार होता त्या दुर्गम घाटवाटेची अशी काही नाकाबंदी केली की मराठ्यांच्या अवघ्या दोन हजारांच्या फौजेने मोगलांच्या जवळपास वीस – पंचवीस हजारांच्या फौजेचा साफ धुव्वा उडवला. त्यानंतर तर शिवरायांनी थेट लाल महालावर धडाक्यात इतक्या वेगाने हल्ला केला की 2-3 वर्ष स्वराज्यात अजगरासारखा वेटोळे घालून बसलेला शहिस्तेखान अवघ्या तीन दिवसात तुटकी बोटे घेऊन पुण्यातून पसार झाला.
परिस्थितीनुरुप निर्णय
ज्यावेळी मिर्झाराजे आणि दिलेरखान स्वराज्यावर तुटून पाडले तेव्हा मात्र शिवरायांनी फार युद्ध न करता त्यांची ताकद ओळखून तह केला. भले तेव्हा माघार घ्यावी लागली पण काही प्रमाणात स्वराज्य हाती टिकवून ठेवले.
त्यानंतर साल्हेरची लढाई असो, वणी डिंडोरीची लढाई असो, बहादूरखानावर केलेला हल्ला असो की दक्षिण भारतात केलेल्या लढाया असोत.. महाराज आणि त्यांच्या शूर सरदारांनी कायमच युद्धक्षेत्र स्वतःला उपयुक्त ठरेल अशा ठिकाणीच निवडले ज्यामुळे सोबत कमी सैन्य असतानाही मोठे विजय मिळवता आले. फतेहखानाच्या स्वारीवेळी हजारभर असणारे मराठा सैन्य पुढे लाखांवर जाऊन पोचले तरी प्रत्येक युद्धावेळी स्वतःचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठीच सुयोग्य अशी योजना अमलात आणली गेली. आपलं राज्य टिकवायचं असेल तर आपण बलवान असणं, शस्त्रसज्ज असणं खूप गरजेचं असते मात्र, त्याचबरोबर युक्तीने योग्य निर्णय घेणं, युद्धाची जागा आणि वेळ ठरवून नियोजनपूर्वक काम केलं तर यश कसं मिळतं हे शिकायचे असेल तर शिवरायांच्या युद्धइतिहासाचा खोलवर अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.
1 Comment
शिवरायांच्या युद्धनीतीत आपली शक्ती, बलस्थानं, क्षमता व भौगोलीक रचनेचा खडानखडा अभ्यास, चातुर्यपुर्ण व्युव्हरचना, मुत्सदीपणा, गनिमीकावा, सेनापतींवर विश्वास व सुयोग्यवेळेची अचूक निवड यांचा अजोड समुच्चय होता!
रयतेचा खरा राजा हे त्यांनाच शोभते! आतापर्यंतच्या जगातील शूरविरांत ते एकमेवाव्दितीय आहेत!