कार्तिकी वारी आणि पंढरपूरची बाजारपेठ

chandrabhagechya tiri : पंढरपूरच्या धार्मिक दैनंदिन कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकाची समजली जाणारी कार्तिकी वारी सध्या सुरू आहे. आषाढी वारीला सुरू झालेला चातुर्मास या वारीच्या समाप्ती बरोबर संपतो.
[gspeech type=button]

पंढरपूरच्या धार्मिक दैनंदिन कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकाची समजली जाणारी कार्तिकी वारी सध्या सुरू आहे. आषाढी वारीला सुरू झालेला चातुर्मास या वारीच्या समाप्ती बरोबर संपतो. या चार महिन्यात पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यामध्ये ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा भागवत आधी भागवत संप्रदायातील महत्त्वाचा ग्रंथांचे पठण हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटले आहे:

आषाढी निकट । आणि कार्तिकीचा हाट ॥१॥

पुरे दोन्हीच बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु॥

तें चि घ्यावे तें चि घ्यावे । कैवल्याच्या रासी भावे ॥२॥

काही कोणा नेणे । विठो वांचुनि तुका म्हणे ॥३॥

या परमार्थिक अनुभूतीला एक लौकिक स्तर आहे. त्याबद्दल थोडे पाहूयात.

 

कार्तिकी वारीत कोकण आणि कर्नाटकचा प्रभाव

देवस्थानाच्या भोवती चालणारी एक वेगळी परिसंस्था असते. त्याचे एक वेगळे अर्थशास्त्र असते. देऊळ केंद्रस्थानी ठेवून त्यावर उपजीविका करणारे अनेक समाज घटक असतात आणि ते सर्वजण या धार्मिक उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पंढरपुरात एकंदरीत चार महत्त्वाच्या यात्रा भरतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. या प्रत्येक यात्रेचा बाज वेगवेगळा असतो. कारण कुठल्या यात्रेला कुठल्या भागातले लोक प्राधान्याने येतात ते ठरलेले आहे. आषाढीनंतर चारच महिन्यांनी कार्तिकी यात्रा येते. यात प्राबल्य असते ते कर्नाटक आणि कोकणाचे. या भागातल्या पिकांची कापणी झालेली असते. हातात चार पैसे खुळखुळत असतात. मग त्या सावळ्या परब्रम्हाच्या भेटीची आस निर्माण होते आणि हे भाविक पंढरी गाठतात.

वारीला स्मरून परतफेडीचे वायदे

इथं आल्यानंतर आधी देवदर्शन आणि त्यानंतर बाजार फिरणे आलेच. पंढरपूरचे आर्थिक गणित या यात्रांवरच अवलंबून आहे. इथं परतफेडीचे सर्व वायदे हे एखाद्या वारीला स्मरुन केले जातात. अगदी येथील स्थानिक नगर परिषद घरपट्टीची सूचना देखील आषाढी वारीच्या आसपास देते. येणारे वारकरी एकमेकाला प्रेमाने माऊली असे संबोधन करतात व विश्वात्मक होतात. भागवत संप्रदायाचे लक्षण मानली झाले जाणारी ‘तुळशी माळ’ ही प्रत्येक वारकऱ्यांच्या गळ्यात असते. ती पंढरपुरातच घेतली जाते व पांडुरंगाच्या पायाशी ठेवून मग परिधान केली जाते. या तुळशीमाळा हाताने तयार करणारी अनेक कुटुंबे पंढरपुरात आहेत. पंढरपूरच्या पंचक्रोशीत खूप मोठ्या प्रमाणावर तुळशीची लागवड होते. त्यात दोन प्रकारच्या तुळशी असतात. कृष्ण तुळस आणि साधी तुळस. या तुळशीच्या काड्या वाळवून तासल्या जातात, त्याचे मणी करून साध्या दोऱ्यात गुंफले जातात.

वारीमधले रोजगार आणि अर्थकारण

तुळशीमाळेनंतर लोक वळतात ते प्रसादाकडे. प्रसाद म्हणजे हळद-कुंकू, बुक्का, पेढे पंढरपुरातील सुप्रसिद्ध देशपांडे पेढेवाले यांची तिसरी पिढी आज कार्यरत आहे.

आजूबाजूच्या परिसरातून मंगळवार व शनिवार या दोन दिवशी पंढरपुरात खूप मोठ्या प्रमाणात खव्याची आवक होते. येथे वेगळा खवा बाजार भरतो. त्यामुळे पंढरपूरचे पेढे फारच प्रसिद्ध आहेत. आषाढी व कार्तिकीत टनावारी पेढे खपतात.

पंढरपुरात ओल्या उदबत्त्या तयार करणारी ख्यातनाम मंडळी आहेत. ताठे, लाड, देशपांडे ही त्यातील काही ठळक नावे. बत्तासे, चुरमुरे न्यायला हलके, टिकायला चांगले आणि किंमतीला सर्वांना परवडतील असे. त्यामुळे हा प्रसाद वारकरी आनंदाने घेऊन जातात.

रुक्मिणीला, स्वतःला चुडा भरून कोकणातल्या आप्तांकरताही चुडा नेण्याची प्रथा

भाविक भक्तांसाठी विशेषतः महिलांसाठी पंढरपूरची वारी हे माहेरला येणे असते. त्यांच्या मातेला भेटणे आणि रुक्मिणी मातेचा चुडा भरणे हा एक विशेष सोहळा असतो. कोकण परिसरातील महिला विशेषत्वाने हे करतात. त्यांची एक अनोखी प्रथा आहे. दर्शन घेऊन परतताना या महिला चुडा भरतात व भागीरथी परत नेतात. भागीरथी म्हणजे देवीचा पुतळे पितळेचा मुखवटा असतो व दोन हात असतात. कोकणात भरपूर प्रमाणात बांगड्या घेऊन त्या गावातल्या बायकांना वाटल्या जायच्या. कोणे एकेकाळी अशा प्रकारे वारीहून गावात परतणाऱ्या लोकांची मिरवणूक काढली जायची. वारकरी महिला पंढरपुरात आल्या की, चुडा भरतात.

चुडा म्हणजे लाखेच्या बांगड्या पुढे मागे व मध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या. ही प्रथा फक्त पंढरपुरातच आहे. लाखेच्या बांगड्या हाताच्या मापाने जवळ असलेल्या निखाऱ्यावरती मिटल्या जातात. अशा प्रकारच्या लाखेच्या बांगड्या पंढरपुरातच बनविल्या जातात. अशा प्रकारच्या बांगड्या बनवण्याची प्रक्रिया खूप कष्टप्रद आणि तितकीच कलात्मक असते. गेली सुमारे ७० वर्षे पंढरपुरात जगधने कुटुंबीय बांगडी व्यवसाय करतात.श्री अविनाश जगधने हे स्वतः इंजिनियर आहेत तरीदेखील हा पारंपरिक व्यवसाय निष्ठेने करतात.

बाई म्हटली की स्वयंपाक आलाच. त्यासाठी आवश्यक बऱ्याच गोष्टी या कालावधीत विक्रीला उपलब्ध असतात.

चोळखण हे पंढरपूरचे असेच एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. पंढरपुरातील जवंजाळ यांचे चोळखणाचे दुकान प्रसिद्ध आहे. त्यांची देखील चौथी पाचवी पिढी तेच परंपरागत काम करीत आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, “हे खण प्रामुख्याने कर्नाटकातील विजापूर आणि गळेदगूड भागातून येतात. आलेली प्रत्येक वारकरी बाई माहेरचा आहेर म्हणून खण, लुगडे, परकर पोलका एवढे तरी खरेदी करतातच”.

बैलांकरता साज

शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात या सर्व वाऱ्यांना येतो. त्यांना स्वतःबरोबरच आपल्यासाठी राबणाऱ्या बैलांची देखील आठवण असते. त्यांना सजवण्यासाठीचे वेगवेगळे साज यात्रा काळात पंढरपुरात मिळतात. पशुधनाला सजवण्यासाठी वापरला जाणाऱ्या झुली यादेखील पंढरपुरात निर्माण होतात. वेगवेगळ्या नक्षींचे कोलाज केले जाते. त्यात क्वचितप्रसंगी ज्ञानोबा माऊली देखील दिसतात.

पारंपरीक विणीच्या घोंगड्या

कर्नाटक जवळ असल्यामुळे कर्नाटकातून खूप साऱ्या घोंगड्या इथे विकायला येतात. या घोंगड्या पांढऱ्या , काळ्या किंवा राखाडी रंगाच्या असतात. या घोंगड्या खूप टिकाव्यात म्हणून घोंगड्यांच्या दोन्ही बाजूंना एक सुंदरशी वीण घातली जाते. त्याला’रेवड’ असं म्हणतात. ही रेवड घालणारी मोजकी चार कुटुंबे आता शिल्लक राहिली आहेत. ही रेवड घालताना आपली नजर त्यांच्या हाताच्या, बोटांच्या गतिमान हालचालींवर खिळून राहते. तीन-चार प्रकारचच्या रंगीत लोकर घेऊन ती दोन्ही हातांनी बोटांमध्ये एकमेकात अडकवून सुंदर वीण घातली जाते.

वाद्यांकरता स्वतंत्र गल्ली

वारकरी म्हणजे भजन कीर्तन आले. त्यासाठी वेगवेगळी सांगितिक वाद्ये आली. पंढरपूरच्या देवळाजवळ एक स्वतंत्र वीणेगल्ली आहे. या गल्लीत पिढ्यानपिढ्या टाळ, मृदुंग,वीणा विकणारी मंडळी आहेत.

फुलांची हौस

देऊळ म्हणले की फुले ही आलीच. देवळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ही फुले विकणारे माळी बसलेले असतात. कार्तिकीला शेवंतीच्या वेण्या मुबलक प्रमाणात विकायला असतात. कोकणातील स्त्रिया आपल्या अंबाड्यावरती या वेण्या अत्यंत आनंदाने परिधान करतात.

जनावरांचा विशेष बाजार

कार्तिकी वारीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पंढरपुरात भरणारा जनावरांचा बाजार. या बाजारासाठी खिलारी जनावरे खूप मोठ्या प्रमाणात येतात. काही कोटींचा व्यवसाय यादरम्यान होतो.

टोपल्या, पत्रावळी ते बाळासाठी कुंची 

पंढरपुरात एक बुरुड गल्ली देखील आहे. बुरुड समाज खूप मोठ्या प्रमाणात विविध वस्तू बनवतो व यात्रा कालावधीत त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

आलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी मोठ्या प्रमाणात पत्रावळी व अनुषंगिक सामान लागते. त्याची खूप मोठी उलाढाल यादरम्यान येथे होते. बाळांकरता झालर असलेलं टोपड, कुंची ह्या सर्व गोष्टी हाताने शिवून छान मांडलेल्या असतात.

जत्रेतली गंमत आटीव दूध, मूर्त्या, पुस्तके 

वारीच्या कालावधीत अटी उद्योगाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. जागोजागी अटीव दूध विक्री चालू असते. या काळात दगडी व पितळेच्या मूर्तीची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते. दगडी मूर्ती व संगमरवरी मूर्ती बनवणारे मूर्तिकार पंढरपुरात भरपूर आहेत. त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत. गोरखपुर प्रेस मार्फत निर्माण केली जाणारी पुस्तके या कालावधीत पंढरपुरात मोठ्या प्रमाणात खपतात.

पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन मिळालं नाही तर…

वारीला आल्यानंतर प्रत्येकाला पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन होतेच असं नाही. त्याला पर्याय म्हणून नगरप्रदक्षिणा, शिखर दर्शन व चंद्रभागा स्नान केले जाते. पंढरपूरच्या बाबतीत चंद्रभागेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्तराज पुंडलिक हा याच चंद्रभागेच्या वाळवंटात विसावला आहे. या पुंडलिक रायाचे सेवेकरी म्हणजे येथील कोळी समाज. आलेल्या लोकांना चंद्रभागेत नका नयन घडविण्याचा व्यवसाय हा समाज प्रामुख्याने करतो.

पंढरपुरात येणारा एक वारकरी खरेदीसाठी एक हजार रुपये खर्च करतो असे धरल्यास, पंढरपुरात एका वर्षात येणारे वारकरी किती व त्यामुळे पंढरपुरात होणारा व्यापारउदीम किती होत असेल त्याचे त्रैराशिक जरूर मांडून पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ