राष्ट्रीय दूध दिवस विशेष मालिका भाग – 4
भारतीय दुग्ध-उद्योग भारतीय कृषी व अन्न-क्षेत्राचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, हे आपण आधीच्या तीन लेखांमध्ये पाहिले. हा उद्योग भारतीय जनतेच्या अन्न-सुरक्षेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठे योगदान देतो आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनाशी तो प्रत्यक्षपणे निगडित आहे. नवनवीन संशोधनामुळे अनेक तांत्रिक समस्या सोडवण्यात यश येत आहे. मात्र, या उद्योगाला काही गंभीर आव्हानांचा सामनादेखील करावा लागत आहे.
दुग्ध उद्योगातील नवीन संशोधन
दुग्ध उत्पादन क्षेत्रात चालू असलेले नवे संशोधन आणि निर्माण केले जाणारे उच्च तंत्रज्ञान या उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. जनावरांच्या संतुलित पोषणासाठी, अनेक पशु-आहार फॉर्म्युलेशन विकसित केले गेले आहेत. दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळ्यात अगदी कमी पाण्यात ताजा हिरवा चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स – ‘मातीविना शेती’ (Hydroponics) तंत्राचा वापर केला जात आहे.
उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून दुधाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी उत्पादनाच्या प्रत्येक पायरीवर शुद्धतेचे परीक्षण करणे, दूध उत्पादनाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांची अंमलबजावणी करणे, तसेच दुधावर प्रक्रिया करून त्यापासून ‘प्रोबायोटिक’ सारखे अगदी नव्या प्रकारचे पोषक अन्नपदार्थ तयार करणे यांचा समावेश होतो आहे.
सुधारणा आणि सुसूत्रतेकरता नवे केंद्रीय मंत्रालय
नवीन तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन व उत्पादन या दोन्ही आघाड्यांवर होतो आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पोषणयुक्त आणि आरोग्याला सुरक्षित दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळतील. याशिवाय, दूध उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा, स्वच्छता आणि गुणवत्ता यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने भर दिला जात आहे. या सुधारणा अधिक सुसूत्र पद्धतीने पार पाडण्यासाठी 2019 मध्ये केंद्र सरकारचे ‘मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय’ (MoFAH&D – Ministry of Fisheries, Animal Husbandry & Dairy) स्थापन करण्यात आले.
जैवतंत्रज्ञानाचा वापर
दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी, गुरांची निरोगी शारीरिक वाढ होण्यासाठी आणि त्यांची प्रजननक्षमता वाढण्यासाठी त्यांच्या उपलब्ध प्रजातींमध्ये अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी संशोधन सातत्याने चालू आहे. त्यासाठी गायीगुरे, शेळ्या, मेंढ्या, आणि उंट यांच्या अनेक प्रजाती त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानी, तसेच जैवतंत्रज्ञान वापरुन त्यांच्या भ्रूण, वीर्य आणि डीएनएच्या रूपात प्रयोगशाळेत संरक्षित केल्या गेल्या आहेत.
जीनोमिक्स (Genomics) आणि क्लोनिंग (Cloning) या जैव-तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांच्या प्रजननाची गुणवत्ता सुधारण्यात मदत मिळत आहे. जीनोमिक्सच्या मदतीने दुभत्या जनावरांमध्ये अधिक चांगल्या गुणधर्माची निवड करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे दूध उत्पादनाचे प्रमाण वाढवायला आणि जनावरांचे आरोग्य चांगले राखायला मदत मिळत आहे. आंतर-प्रजाती क्लोनिंगद्वारे (Inter-specific cloning) उत्तम प्रजातींच्या आणि जंगली प्रजातींच्या म्हशींचा प्रयोगशाळेत संकर करून त्यापासून उत्तम प्रजातींच्या वासरांचे उत्पादन केले जात आहे.
वेगवेगळ्या संस्थांमध्ये विकसित केलेल्या रोगनिदान किट आणि लसींमुळे ICAR (Indian Council of Agricultural Research) ने पशुधनाचे अनेक भयानक आजार यशस्वीरीत्या हाताळले आहेत. यात मेंढी-पॉक्स लस, डुकरांसाठी स्वाइन फिव्हर लस, घोड्यांच्या श्वासोच्छवासाच्या विषाणूजन्य रोगांसाठी इक्वाइन इन्फ्लूएंझा लस, आणि पशुधनाच्या अनेक आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी ‘O’FMD लस अशा अनेक लशी विकसित करण्यात आल्या आहेत. 2011 मध्ये जनावरांच्या ‘बुळकांडी’ (Rinderpest / Cattle Plague) या अतिशय घातक रोगाचे भारतातून निर्मूलन झाल्याची घोषित करण्यात आले. पशुवैद्यक शास्त्रातील संशोधनाचे हे फार मोठे योगदान आहे, कारण संपूर्ण मानवजातीच्या इतिहासातील प्राण्यांच्या एखाद्या रोगाचे अशा प्रकारे मानवी प्रयत्नांमुळे निर्मूलन होण्याची ही पहिली आणि एकमेव घटना आहे.
भारताच्या दुग्ध उद्योगासमोरील सध्याची आव्हाने
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, आणि दुग्ध उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, या क्षेत्राला अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
पशुखाद्य आणि चारा टंचाई:
भारतामध्ये शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे गुरांना चरायला लागणारी जमीन कमी होत चालली आहे. त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन चाऱ्याच्या किंमतीत वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना गुरांना योग्य प्रमाणात खुराक देणेही अवघड बनले आहे. परिणामी, दूध उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वाढत आहे.
कमी उत्पादकता:
भारतात दुभत्या जनावरांची सरासरी वार्षिक उत्पादकता 1,777 किलो प्रति प्राणी आहे, जी 2,699 किलोच्या जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. याचे कारण गुरांच्या प्रजननक्षमता, आरोग्य आणि खुराकाच्या गुणवत्तेतील कमतरता आहे. कमी उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न कमी होत आहे.
वैज्ञानिक पशुआहार पद्धतींचा कमी वापर:
भारतामध्ये आजही गुरांना पारंपारिक पद्धतींनी आहार दिला जातो, ज्यामुळे चांगल्या दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेले पोषण मिळणे कठीण होते. समतोल व पोषक आहार दिल्यास अधिक दूध उत्पादनासाठी पुरेसे पोषण मिळू शकेल.
पशु आरोग्य-सेवांची कमतरता:
दूध उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण हे गुरांच्या आरोग्यावर अवलंबून असते. भारतामध्ये पशु आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळणे कठीण होऊन जाते. त्यामुळे दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
व्यवसायाचे असंघटित स्वरूप:
भारतामध्ये सहकारी क्षेत्राचा विकास झालेला असला तरीही अजूनही बहुसंख्य दूध उत्पादक असंघटित क्षेत्रात आहेत. त्यांना एकत्र येण्याची, आपले हक्क मागण्याची किंवा सरकारी योजनांचा फायदा घेण्याची पुरेशी संधी मिळत नाही.
तंत्रज्ञानाचा स्वीकार:
दुग्धउद्योगात तंत्रज्ञानाचा स्वीकार होण्यात अनेक आव्हाने आहेत. काही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले असले तरीदेखील बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी येतात.
जागतिक हवामान बदल व अन्य समस्या:
जागतिक हवामान बदल आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर होणारे जलवायूमधील बदल, त्यातून येणारी कृषी उत्पादनातील अस्थिरता, नैसर्गिक आपत्ती, कमीतकमी कालावधीत अधिकाधिक उत्पादन करण्याच्या आर्थिक गणिताच्या दबावाखाली ढासळत जाणारी जमिनीची सुपीकता आणि होणारा पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे भविष्यात दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
कृषी निविष्ठांची उपलब्धता:
शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा आणि नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा भासतो. तसेच आवश्यक संसाधनांच्या किमती वाढत जाऊन व्यवसायाचे आर्थिक गणित धोक्यात येते. दुग्ध उद्योगासाठी शुद्ध स्वच्छ पाणी (एक लीटर दूध उत्पादन करण्यासाठी साधारण 628 लीटर पाणी वापरले जाते), चारा पिकांसाठी सुपीक जमीन, बदलत्या परिस्थितीत टिकून राहून भरपूर उत्पादन देणाऱ्या पशुधनाच्या प्रजाती, त्यांच्या उत्तम प्रजननासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता हे सर्व मर्यादित असल्यामुळे, येत्या काळात सतत वाढत्या लोकसंख्येला पुरेसे होईल इतके उत्पादन करणे आणि त्या उत्पादनाची गुणवत्ता उच्च पातळीवर राखणे, हे मोठे आव्हान आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती:
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक किंवा आर्थिक सहाय्य पुरवठा करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने 50 च्या दशकापासून उभारलेल्या सहकारी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या संस्था आणि त्यांचे व्यवस्थापन यामध्ये अनेक समस्या आहेत. त्यासाठी सहकारी संस्थेपेक्षा वेगळ्या आणि अधिक आधुनिक व व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या ‘शेतकरी प्रोड्यूसर कंपन्या’ (FPOs – Farmer Producer Organizations) हा नवा प्रयोग यशस्वी होत आहे. देश पातळीवर 10 हजार प्रोड्यूसर कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट सरकारने जाहीर केले आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यात निदान संख्यात्मकदृष्ट्या भरीव कामगिरी झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी अजून बरेच काम बाकी आहे. त्यासाठी अधिक प्रोत्साहक सरकारी धोरणे आणि संस्थात्मक मदत आवश्यक आहे.
सारांश
भारताच्या दुग्ध उत्पादन क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहे त्यामुळे समस्या सोडवल्या जात आहेत. परंतु त्याचबरोबर अनेक आव्हानेसुद्धा आहेत, ज्यामुळे या क्षेत्राच्या प्रगतीला अडथळे येत आहेत. पशुखाद्य आणि चाऱ्याच्या टंचाईपासून तंत्रज्ञानाच्या स्वीकारातील अडचणीपर्यंत अनेक समस्या आहेत. यावर उपाय म्हणून, शासकीय धोरणे, शेतकऱ्यांसाठी योग्य प्रशिक्षण, वैज्ञानिक पद्धतींचा वापर, आणि तंत्रज्ञानाच्या स्वीकाराला चालना देणे आवश्यक आहे. यामुळे भारताच्या दुग्ध उद्योगाला एक चांगले भविष्य मिळू शकते.