कधीकाळी नक्षलवादाचा प्रभाव असलेले क्षेत्र म्हणून ज्या जिल्ह्याचा उल्लेख केला जायचा, त्यामध्ये गडचिरोली जिल्हा हा प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर उभा राहायचा. विकासात्मक काम होण्यासाठी उद्योग आणि रोजगार महत्त्वाचे असतात. गडचिरोलीमध्ये सध्या सुरक्षेबरोबरच विकासावरही जोर दिला जातोय. ज्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट यासारख्या सुविधा देण्याच्या कामाबरोबरच या जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे सुरू केले जाऊ लागलेत. मागील काही वर्षांमध्ये या जिल्ह्यांत अनेक वेगवेगळे बदल घडताना दिसून येऊ लागलेत. या बदलामुळे निश्चितच इथल्या स्थानिक रहिवाशांना फायदा होताना दिसत आहे.
रक्तरंजित इतिहास असलेल्या भागात विकासाच्या नव्या संधी
आता गडचिरोलीमध्ये एक मोठा स्टील प्लांट सुरू असून यामुळे गडचिरोलीत रोजगाराची संधी उपलब्ध झालीय. या भागात लॉयड मेटल एंड एनेर्जी लिमिटेड हा स्टील प्लांट आल्याने सद्यस्थितीत तिथल्या दीड हजार रहिवाशांच्या हाताला काम मिळाले आहे. इथे फक्त रोजगाराची संधी उपलब्ध नाही तर या कंपनीकडून स्थानिक रहिवाशांमध्ये स्किल वाढवण्याचे कामही करण्यात येतंय. लॉयड मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीने केवळ अनेक वर्षापासून बंद असलेल्या सुरजागड येथील माईनचे काम सुरू केले नाही तर, त्यासोबत या जिल्ह्यातील कोणसरी गावात स्टील प्लांटचे काम जोरदारपणे सुरू केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच या स्टील प्लांटच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि सध्या या प्लांटमधून उत्पादनही सुरू झालंय.
पहिल्याच इंडस्ट्रीमुळे विकासाला मिळाली गती
गडचिरोली जिल्ह्यातील ही पहिली इंडस्ट्री असल्याने इथल्या रहिवाशांसोबतच स्थानिक प्रशासनालाही याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे रोजगाराबरोबरच हेल्थकेअर, शिक्षा आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर सुद्धा कंपनीचा जोर आहे.
हे ही वाचा : नक्षलवाद्यांच्या हरयाणवी कॅडरचं आत्मसमर्पण
कंपनीची समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड
कंपनीने सुरजागड माईन जवळ सी.एस.आरच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी मुलांना पहिली ते दहावीपर्यंत सीबीएससी शाळा सुरु केलीय. ज्यामध्ये 700 विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत.
सोबतच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये इथल्या रहिवाशांना मोफत उपचार मिळणार आहेत. महिलांना रोजगार मिळावा म्हणून एक मोठं गारमेंट युनिटही कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे.
गावाचा कायापालट प्रगतीपथावर
हा स्टील प्लांट ज्या कोनसरी गावच्या जमिनीवर उभा राहतोय. त्या गावचा कायापालट करण्याचं कामसुद्धा सुरू आहे. गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण तसेच या गावातील मंदिराचे पुनर्निर्माण आणि लायब्ररी बनवण्यासोबतच संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन गटार आणि पक्के रस्ते सुद्धा बनवण्याचे काम सुरू आहे.
सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाची मोफत ट्रेनिंग देण्यात येतेय. एवढेच नाही तर मेघावी विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला सुद्धा या कंपनीमार्फत पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा : गडचिरोली सिव्हिक एक्शन प्रोग्राम
स्थानिक पातळीवर रोजगारसंधी
या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध नसल्याने इथले स्थानिक युवक दुसऱ्या राज्यात जाऊन नोकरी करत होते.याचा परिणाम असा होत होता की, त्या युवकांच्या घरच्यांना काही अडचण झाली. तर हे युवक वेळेत घरी पोहोचू शकत नव्हते. पण आता गावाजवळच त्यांना रोजगार मिळत असल्याने ते त्यांच्या घरच्यांसोबत सुखी असल्याचं कोणसरी गावचे सरपंच सांगतात.
आणखी काही नव्या उद्योगांची पायाभरणी
गडचिरोली जिल्ह्यात एक उद्योग उभा राहिल्याने वरील सर्व बदल घडून आले आणि अजूनही बदल घडत आहेत. अशातच आता यातूनही एक पुढचं पाऊल महाराष्ट्र सरकारकडून टाकण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात रोजगार उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमध्ये दोन विशेष करार केले. यामधील पहिला करार महाराष्ट्र सरकार आणि कल्याणी ग्रुप यांच्यासोबत झाला. ज्यामध्ये डिफेन्स आणि स्टील उद्योग यासाठी कंपनी जिल्ह्यामध्ये एकूण 5250 करोड रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे किमान चार हजार स्थानिक रहिवाशांना थेट रोजगार मिळणार तर दुसरा करार महाराष्ट्र सरकार आणि जे एस डब्ल्यू ग्रुप सोबत झाला. या करारानुसार ही कंपनी तीन लाख करोड रुपये यांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे जिल्ह्यात 10000 लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. ही कंपनी जिल्ह्यात स्टील, रिन्यूएबल एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर सिमेंट सारखे उद्योग निर्माण करणार आहे.
कधी या भागात उद्योगधंदे करण्यासाठी कोणतेही उद्योगपती तयार होत नव्हते. मात्र सकारात्मक पाऊल टाकून या भागात उद्योग धंदे येण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकांना याचा चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला पाहायला मिळेल.