महाराष्ट्र सरकारची गावागावातून धावणारी ‘लाल परी’ ही गडचिरोलीसाठी ‘आनंदाची बस’ झाली आहे. गडचिरोलीमधल्या ज्या गावात दळण-वळणाची सुविधा नव्हती अशा गावांमध्ये अखेर राज्य सरकारची एसटी बससेवा सुरु झाली आहे.
आनंदाची बस
गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यामधल्या मुरुमगाव, पेंथरी आणि रंगी या गावामध्ये बससेवा सुरु केली आहे. गडचिरोली विभागा अंतर्गत धानोरा तालुक्यातल्या मुरुमगाव गावासाठी तीन बसेस वापरल्या जातात. दिवसभरात या गावात 10 फेऱ्या नियोजित केल्या आहेत. पेंथरी गावामध्ये 3 बसेस वापरुन 8 फेऱ्या दिवसभरात मारल्या जातात. आणि रंगी गावामध्ये 2 बसेसच्या मदतीने 6 फेऱ्या मारल्या जातात.
आमच्यासाठी ही आनंदाची बस आहे
गावात बससेवा सुरु व्हावी यासाठी धानोरा तालुक्यातल्या लोकांनी सरकारकडे खूप पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन बससेवा सुरु केल्याबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्यादिवशी पहिल्यांदा कटेझरी गावामध्ये बस आली तेव्हा गावकऱ्यांनी रस्ते स्वच्छ करुन ढोल ताशाच्या गजरात बसचं स्वागत केलं होतं.
ही बससेवा फक्त जाण्या-येण्यासाठी दिलेली सुविधा नाही तर आमच्यासाठी ती एक संधी आहे अशी प्रतिक्रिया एका प्रवाशांने दिली.
या बससेवेमुळे गावाचा झपाट्याने विकास होणार अशी आशा व्यक्त करत एका प्रवासी महिलेनं सांगितलं की, “पूर्वी आम्हा गावकऱ्यांना बाजारात, गावातल्या मुलांना शाळेत, डॉक्टरकडे वा कुठेही जायचं असेल तर फार दूरवर चालत जावं लागायचं. मात्र, आता या बससेवेमुळे आमचा वेळ वाचेल, आमची मुलांना शाळेत जाताना कोणत्या अडचणी येणार नाहीत. तसंच आजारी व्यक्तीलाही लवकर रुग्णालयात नेता येईल.”
हे ही वाचा : गडचिरोलीला नक्षली विळख्यातून बाहेर काढणारे सी 60 कंमाडो
गावाच्या विकासाची ही संधी
धानोरा तालुक्यातली ही बससेवा विकासाची एक संधी आहे. यामुळे या गावाचा विकास होणार आहे हे निश्चित आहे. आजुबाजुलच्या जवळपास 10-12 गावांना या बससेवेचा फायदा होणार आहे. शाळकरी मुलांना, आजारी व्यक्तींना याची मोठी मदत होणार आहे. शिवाय रोजगार निर्मितीसाठीही उपयोग होईल अशी प्रतिक्रिया उपअधिक्षक जगदीश पांडे, यांनी दिली.
बदलतं गडचिरोली
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, आता या जिल्ह्याची ओळख बदलत आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्याच्या खात्मा करुन या जिल्ह्यात विकासात्मक काम करण्यात सरकारला यश मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून आता पहिल्यांदा या धानोरा जिल्ह्यातल्या कटेझरी, रंगी, पांथेरी अशा गावातून बस धावत आहे. अनेक नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्वेतोपरी प्रयत्न करत आहे. याचे चांगली परिणाम आता गडचिरोलीमध्ये पाहायला मिळत आहेत.