भविष्यकाळामध्ये हवामान बदलांच्या परिणामामुळे जगभरात अन्नधान्याचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे तिबेट पठारावर शेती विकसीत करण्याचा विचार चीनच्या शास्त्रज्ञानी मांडला आहे.
हवामान बदलांमुळे आज जगभरामध्ये अनेक नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ॲमेझॉन जंगलाचा ऱ्हास, अटलांटिक महासागर आणि ध्रुवीय बर्फाचं वेगानं बाष्पीभवन होत आहे. या अशा पर्यावरणीय घटनांसह विविध ऋतूमध्ये घडणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासह कृषीक्षेत्रावरही नकारात्मक परिणाम होत आहेत.
चीन राष्ट्रीय हवामान अहवाल
या हवामान बदलांसंदर्भात चीनच्या राष्ट्रीय हवामान संस्थेतर्फे (National Climate Centre – NCC) अहवाल सादर करण्यात आला. या अहवालामध्ये हवामान बदलांमुळे होणाऱ्या भविष्यकालीन परिणामांवर चर्चा केली आहे. या अहवालामध्ये तिबेट पठार हे चीनचं भविष्यकालीन धान्य कोठार म्हणून कसं विकसीत होऊ शकते यावर भाष्य केलं आहे.
तिबेट पठार आशियातील हवामान बदलाचं केंद्र
तिबेट पठाराकडे आशियातल्या हवामान बदलाचं केंद्र म्हणून पाहिलं जातं. हवामान नियंत्रणामध्ये तिबेटचं पठार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पाणी संवर्धन, माती संवर्धन,वारे रोखणं यासह या पठारावर जैवविविधतेचं नैसर्गिकरित्या संवर्धन केलं जात आहे.
या पठारावरच्या जैवविविधतेचं, परिसंस्थेचं आणि नैसर्गिक वैशिष्ट्याचं रक्षण करत या पठारावर शेती विकसीत करण्याची भविष्याची गरज आहे. असं मत चीनच्या राष्ट्रीय हवामान संस्थेचे इंजिनियर मा लीजुआन यांनी मांडलं आहे.
तिबेट पठाराचे शेतीक्षेत्रात रुपांतर करणं एक आव्हान
या वैविध्यपूर्ण अशा पठाराचा शेतीसाठी उपयोग करुन घेताना अनेक अडचणी येऊ शकतात. कारण या पठाराचं झपाट्याने बदलत असणारं वातावरण हे शेतीसाठी प्रतिकूल आहे. पण तरीही या पठारावरच्या थंड वातावरणातही वाढू शकणाऱ्या पिकांचं उत्पादन घेता येऊ शकते. यामध्ये बार्ली म्हणजे जव या पिकांचं उत्पादन घेता येऊ शकते. चीनमधल्या शास्त्रज्ञांनी या पठारावर ज्या भागात जास्त सुर्यप्रकाश उपलब्ध होतो अशा भागात प्रती एकर 75 टन बटाट्याचं उत्पादन घेतलं आहे. त्यामुळे या पठाराच्या विविध भागावरच्या पर्यावरणीय स्थितीनुसार शेती विकसीत करण्याचा विचार चीन करत आहे.
एआयचा वापर
पठारावर शेती विकसीत करण्यासाठी चीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या संपूर्ण पठारावर चीन सेन्सॉर लावणार आहे. या सेन्सॉरच्या मदतीने पठारावरच्या सद्य स्थितीचं आकलन करण्यासाठी मदत होईल. पठारावर पूर कधी येणार आहे, त्यानुसार पिकांची लागवड कधी व कुठे करावी, अशा सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं जाणार आहे.
मात्र, या पठारावर खोदकाम वा मानवी हस्तक्षेप वाढू लागला तर या पठारावरची जैवविविधता आणि परिसंस्था धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.