अमेरिकेत शिकणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, काहींचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तर काहींना देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत म्हटले की, भारतीय विद्यार्थ्यांनी स्थानिक कायद्यांचे पालन करणे गरजेचं आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय विद्यार्थी तिथल्या नियमांचं पालन करत नाहीत असं अमेरिकन सरकारला वाटतं.
काय आहे प्रकरण?
वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉर्जटाऊन विद्यापीठातील बद्र खान सुरी नावाच्या विद्यार्थ्याला अमेरिकन सरकारने अटक केली आहे. अमेरिकन सरकारने त्याच्यावर हमासला पाठिंबा दिल्याचा आणि पॅलेस्टिनी सशस्त्र गटाशी संबंध असल्याचा आरोप केले आहेत. मात्र, एका अमेरिकन न्यायाधीशाने सुरीला भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया थांबवून ठेवली आहे.
सुरीवर कारवाई होण्याच्या एका आठवड्यापूर्वी, कोलंबिया विद्यापीठातील रंजनी श्रीनिवास नावाच्या भारतीय विद्यार्थिनीचा व्हिसा अमेरिकन सरकारकडून रद्द करण्यात आला. तिच्यावर हिंसा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आणि हमासला मदत केल्याचे आरोप होते. त्यामुळे ती स्वतःहून कॅनडामध्ये परत गेली.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी संदेश
रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितलं की, अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली, तर भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास त्यांना मदत करतील. तसेच, भारतीय विद्यार्थ्यांनी कायदेशीर मार्गाने शिक्षण घेणे आणि स्थानिक नियमांचे पालन करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले, ” व्हिसा आणि इमिग्रेशनचे नियम बनवण्याचा अधिकार प्रत्येक देशाचा आहे. आणि त्या कायद्यांचं पालन करणं हे आवश्यक आहे. भारतात, जेव्हा परदेशी नागरिक येतात, तेव्हा त्यांनी भारतीय कायद्यांचं आणि नियमांचं पालन करावं अशी आमची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे, जेव्हा भारतीय नागरिक परदेशात जातात, तेव्हा त्यांनी त्या देशातील कायद्यांचं आणि नियमांचं पालन करावं अशी भारताची अपेक्षा आहे.”
तसेच, रंजनी श्रीनिवास यांच्या प्रकरणात त्यांच्याकडून भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी कोणताही संपर्क साधला नसल्याचं ते म्हणाले. ती कोलंबिया विद्यापीठात अर्बन प्लॅनिंगमध्ये डॉक्टरेट करत होती आणि एफ-1 विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत आली होती. अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, तिचा व्हिसा 5 मार्च रोजी रद्द करण्यात आला होता आणि 11 मार्च रोजी ती स्वतःहून कॅनडाला परत गेली. अमेरिकेच्या कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन (CBP) विभागाकडे त्याचे व्हिडिओ फुटेजही आहे.
भारत-अमेरिका शैक्षणिक संबंधांवर परिणाम होणार?
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारत आणि अमेरिकेतील शैक्षणिक संबंध अधिक मजबूत करण्याची भारताची इच्छा आहे. त्यामुळे शैक्षणिक भागीदारीमुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले व्हावेत, असे रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.