गेल्या काही वर्षांपासून ॲपल कंपनीच्या वेगवेगळ्या उत्पादनासाठी लागणारे सुट्टे भाग हे भारतामध्ये तयार केले जात आहेत. ॲपल कंपनीचे उत्पादन निर्माण करणाऱ्या फॉक्सकॉन, पेगाट्रोन, विस्ट्रोन आणि द टाटा ग्रुप अंतर्गत भारतामध्ये हे सुट्टे भाग तयार केले जात आहेत. आनंदाची बातमी म्हणजे ॲपलला सुट्टे भाग पुरवणारी आघाडीची जपानची कंपनी मुराता मॅन्युफॅक्चरसुद्धा भारतामध्ये आपला प्रकल्प सुरू करणार आहे.
मुराता कंपनी ही मल्टीलेयर सिरेमिक चिप कॅपॅसिटर (MLCCs) तयार करते. या एमएलसीसी चिपमध्ये पातळ थरांमध्ये वीज चार्ज करुन साठवली जाते. मोबाईल. सर्व्हर्स, गेमिंग डिव्हाईसमध्ये या चिपचा वापर केला जातो. अलिकडच्या काळात वेगवेगळ्या डिव्हाईसचा वापर पाहता या चिप्सना खूप मागणी आहे.
सध्या मुराता कंपनीचा हा मल्टीलेयर सिरेमिक चिप कॅपॅसिटर तयार करण्याचा प्रकल्प चीनमध्ये सुरू आहे. मात्र, जागतिक पातळीवरील बदलती गणितं पाहता फक्त चीनवर अवलंबून राहण्याऐवजी भारतातही हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय मुराता कंपनीने घेतला आहे. मुराता कंपनीच्या या निर्णयामुळे चीन मात्र चांगलाच धास्तावलेला आहे. कारण आतापर्यंत जगामध्ये इलेक्ट्रोनिक उत्पादनाच्या बाजारपेठेत चीनचा दबदबा होता. मात्र आता अनेक परदेशी कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करीत अशा उत्पादनाची निर्मिती करत आहे. त्यामुळे भारत हा प्रतिस्पर्धी देश असल्यामुळे चीन सरकार आता या कंपन्यांना उत्पादन निर्मितीसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल आणि अत्याधुनिक यंत्रे बाहेर नेण्यासाठी निर्बंध घालत आहे.
कसा असणार आहे भारतातला मुराता प्रकल्प
सध्या मुराता कंपनी 60 टक्के मल्टीलेयर सिरेमिक चिप कॅपॅसिटर हे जपानमध्ये निर्माण करत होती. चीनमध्ये या कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. तर भारतामध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. म्हणून जपानमध्ये उत्पादित होणारं चिपचं प्रमाण हे 50 टक्क्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चीपच्या वाढत्या मागणीमुळे मुराता कंपनीनेसुद्धा प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चैन्नईतल्या वनहब औद्योगिक पार्कमध्ये या कंपनीने जागा घेतली असून तिथे एप्रिल 2026 पर्यंत सिरेमिक चीपच्या प्रकल्पाला सुरुवात करणार आहे.
जागतिक पातळीवर इलेक्ट्रोनिक उत्पादनाच्या बाजारपेठेत भारताची आघाडी
भारतातील मनुष्यबळ संसाधने, सरकारी अनुदानं, परकीय गुंतवणुकदारांना व्यवसाय निर्मितीसाठी प्रोत्साहन देणारी धोरणं आणि जागतिक पातळीवरील भारताची वाढती प्रतिष्ठा यामुळे भारतामध्ये अनेक परदेशातील कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. तरी पायाभूत सुविधा जसं की, वीज पुरवठा आणि दळणवळणाची साधनं हे एक आव्हान आहे. तरी भारतात आताच प्रकल्प सुरू करणं गरजेचं असल्याचं मत या कंपनीने मांडलं आहे.
ॲपल कंपनीच्या पुरवठादार कंपन्यांच्या विस्ताराला चीनचा विरोध
ॲपल कंपनीच्या सुरुवातीपासूनच कंपनीच्या उत्पादनांसाठी जे जे सुट्टे भाग लागायचे त्याची निर्मिती ही चीनमध्येच व्हायची. मात्र, आता ॲपलला सुट्टे भाग पुरवणाऱ्या कंपन्या या चीनच्या बाहेर पडत भारतामध्ये आपले प्रकल्प सुरू करत आहेत. त्यामुळे चीन सरकारने आडकाठीचं धोरण अवलंबिलं आहे. याचाच भाग म्हणून चीन सरकारने फॉक्सकॉन आणि मुराता कंपनीवर उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि अद्ययावत यंत्रे चीनच्या बाहेर घेऊन जाण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधामुळे या कंपन्यांना भारतामध्ये त्यांचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अडचणी येत आहेत.
कच्च्या मालासह चीनमधल्या स्थानिक उत्पादन निर्मितीवर नकारात्मक परिणाम होईल म्हणून ही उपकरणे हाताळणाऱ्या तंत्रज्ञांना (टेक्निशियन) भारतात पाठवण्यावरही आढेवेढे घेतले जात आहेत.
चीनच्या या आडमुठे धोरणाचा नकारात्मक परिणाम केवळ मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांवरच होत नाही तर, ॲपल कंपनीला ही या धोरणांचा त्रास होत आहे. चीनने सरकारी अधिकाऱ्यांच्या ॲपल फोन वापर आणि एआय नियमांसंदर्भात कठोर नियम केले आहेत. तसंच ॲपल कंपनीला एआय फीचर्ससाठी चीनमधल्याच कंपन्यांशी करार करण्याची जबरदस्ती केली जात आहे.
भारतातलं ॲपल उत्पादनांची प्रगती
भारत सरकारने परकीय गुंतवणूक आणि उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन लिंक्ड अनुदान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक देशांतर्गत आणि परदेशातल्या कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी अनुदान दिलं जातं. या योजनेमुळे ॲपलसह अनेक मोठ्या कंपन्या भारतामध्ये आपले प्रकल्प सुरू करत आहेत.
सन 2014 मध्ये आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी 14 ते 15 टक्के उत्पादन हे भारतात झालं होतं. 2025 पर्यंत 20 टक्के आयफोनचं उत्पादन हे भारतात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उत्पादनासोबतच भारतामध्ये ॲपलचे शोरूम सुद्धा सुरू केले आहेत.
भारतातील मनुष्यबळ, आयफोनची मागणी, भारतातील बाजारपेठेसह सरकारच्या उद्योगाभिमुख धोरणांमुळे भारत आता जागतिक तंत्रज्ञान आधारित उत्पादन निर्मिती करण्यात अग्रेसर होत आहे.