सिंधू पाणी वाटप कराराच्या अंमलबजावणीला भारताने स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या कराराच्या स्थगितीचे गंभीर परिणाम आता पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानच्या दिशेने वाहणाऱ्या झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांचं पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानमधल्या शेतकऱ्यांना शेती करणं कठीण होत आहे.
झेलम नदीवरच्या मंगला आणि सिंधू नदीवरच्या तारबेला या दोन प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. पुरेशा सिंचनाच्या अभावामुळे खरीप पिकं (उन्हाळी पिकं) वाळायला सुरुवात झाली आहे.
पिकांच्या हंगामावर परिणाम
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने लागलीच हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयाचा दूरगामी परिणाम पाकिस्तानमधल्या शेती क्षेत्रावर होणारं हे स्पष्ट होतं. त्यानुसार पाकिस्तानमध्ये उन्हाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप पिकांच्या पेरणीच्या हंगामावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरिफ यांनी नुकताच ताजकिस्तान इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हिमनदी संवर्धन परिषदेत सिंधू पाणी वादाचा प्रश्न उपस्थित केला.
हे ही वाचा : भारताचं ‘पाणी अडवा, पाकिस्तानची जिरवा’ धोरण
पाकिस्तानमध्ये पाणी टंचाई
हिमनदी संवर्धन परिषदेत भारताने पाकिस्तान सरकारकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचं खंडन केलं. उलटपक्षी दहशतवादाला पाठिंबा देत पाकिस्ताननेच सिंधू पाणी वाटप कराराचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण (IRSA) च्या माहितीनुसार, आर्थिक गर्तेत असलेल्या या देशात आता कर्जाप्रमाणे पाणीटंचाईसुद्धा वाढली आहे. पाकिस्तानला यापूर्वीच 21 टक्के पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यात सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्यामुळे मंगला आणि तारबेला या दोन मुख्य धरणांमध्ये साधारण 50 टक्के पाण्याची कमतरता जाणवत आहे.
झेलम नदीवर असलेल्या मंगला धरणातून आणि सिंधू नदीवर असलेल्या तारबेला धरणातून पाकिस्तानमधल्या पंजाब आणि सिंध प्रांतातल्या शेतीसाठी पाणी पुरवलं जातं. तसंच या दोन्ही धरणांवर जलविद्युत प्रकल्प सुद्धा आहेत.
भारताने स्थगितीचा निर्णय घेतल्यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला सिंचनासाठी मे ते सप्टेंबर दरम्यान पाण्याची कमतरता जाणावणार आहे, अशी चिंता सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.
पाणीटंचाईच्या या संकटामुळे दोन्ही प्रमुख धरणातलं पाणी काळजीपूर्वक वापरण्याचे निर्देश पाकिस्तानी सरकारने धरण अधिकाऱ्यांना दिले आहेत.