जागतिक प्रदुषणाच्या इंडेक्समध्ये राजधानी दिल्ली शहर दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानमधलं लाहोर पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे.
नोव्हेंबर महिना तसा गुलाबी थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र, याच थंडीच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाची समस्या उद्वभवत असते. या दिवसात मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं. यामध्ये धूळ, वाहनांतून निघणार धूर आणि उत्तर भारताकडील राज्यात जाळल्या जाणाऱ्या शेतपिकांच्या कचऱ्याच्या धुरांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं. या सगळ्या प्रदुषणाचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. लोकांचं आयुष्य पाच वर्षांनी कमी होतं.
स्विस ग्रुपच्या एअर इंडेक्स क्वालिटीच्या अहवालानुसार भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमधल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा प्रदुषित झाली आहे. यामध्ये लाहोर पहिल्या क्रमांकावर आहे, दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. यासोबतच बांग्लादेशची राजधानी ढाका शहरातही गेल्या काही दिवसापासून हवेची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे.
दिल्ली प्रदुषणाचीही राजधानी
दिल्लीमध्ये दरवर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रदुषणाची समस्या गंभीर बनते. स्विस ग्रुपने भारतातल्या 14 स्थानिक प्रदूषण नियंत्रण स्थानकांकडून मागितलेल्या अहवालातील माहितीनुसार, बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीतली हवा सगळ्यात जास्त प्रदुषित होती. हवेची गुणवत्ता 299 पातळीपर्यंत खालावली होती.
दिल्लीतले वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सरकारकडून फटाक्यांवर बंदी घातली जाते. मात्र, याची प्रभावी अंमलबाजवणी होत नाही. यासोबतच याच सुमारास पीक कापणीचा हंगाम येतो. त्यावेळी उत्तरेकडील अनेक राज्यात शेतातील पिकांचा राहिलेला कचरा जसं की, पेंढा आणि पिकांची मुळं सुद्धा जाळली जातात. या सगळ्या गोष्टींतून निर्माण झालेला धूर हा धुक्यामध्ये मिसळल्याने हवा प्रदुषित होते.
दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणांमुळे यावर्षी दिल्लीमध्ये आर्टिफिशियल पाऊस पाडला जाण्याची शक्यता पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, मुंबईची हवामान गुणवत्ता पातळी ही 112 आहे. तर दिवाळी सणाच्या वेळी बेंगळुरू शहराची हवामान गुणवत्ताही ढासळल्याचं निदर्शनास आलं आहे.
प्रदुषणाच्या विळख्यातील लाहोर
येत्या काही दिवसात लाहोर हे जगातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून गणलं जात आहे. या दिवसात लाहोरच्या हवा गुणवत्तेचा निर्देशांक पातळी 1165 इतकी नोदंवली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा याची दखल घेतली आहे. नेहमीच्या प्रदुषणाच्या पातळीपेक्षा 120 पट प्रदूषण वाढल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. रविवार दिनांक, 3 नोव्हेंबरला तर यामध्येही वाढ होत गुणवत्तेची पातळी 1900 वर गेली होती.
पाकिस्तानमध्ये लाहोरनंतर कराची शहर हे प्रदुषणामध्ये दुसऱ्या क्रमांकांचं शहर आहे.
या वाढत्या प्रदुषणामुळे लाहोरमध्ये 900 नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यामुळे पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांताच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) सर्व नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. वाहनांमध्ये वापरलं जाणारं दर्जाहीन इंधन, बांधकाम आणि औद्योगिक केंद्रामुळे प्रदूषण वाढत असल्याचा आरोप तेथील जनतेनं केला आहे. यासोबतच भारतातून ही विषारी हवा येत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक सरकारने शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. तर रिक्षांवरही काही काळासाठी बंदी घातली आहे. काही बांधकाम साईट्सवरील काम थांबवण्यात आलं आहे. लोकांनाही आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरात राहण्याचे आवाहन केलं आहे. तसेच परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी वॉर रुम्स उभ्या केल्या आहेत.