महाराष्ट्राच्या नकाशावर नजर टाकतो तेव्हा, डाव्या बाजूच्या डोंगरवाटांच्या कोकणापासून ते उजव्या बाजूच्या विदर्भातील सपाट पठाराचा विस्तार डोळ्यात भरतो. जशी भौगोलिक स्थिती बदलते तसं पर्जन्यमान बदलतं. मातीचा पोत बदलतो. पर्जन्यमान बदललं की तापमानात बदल होतात. हवेतली आर्द्रता बदलते. हवा बदलली की पिके बदलतात. पिके बदलली की खाद्यसंस्कृती बदलते. ओल्या नारळाची जागा सुका नारळ घेतो. भाताची जागा गहू घेतो, नाचणीची जागा ज्वारी घेते. आमसुलाची जागा चिंच घेते. काजूची जागा शेंगदाणे घेतात. खोबऱ्याच्या तेलाची जागा शेंगदाणा किंवा सूर्यफुलाच्या बियांचं तेल घेते.
काही बदल उपलब्धतेवर जाणवतात. फणसाच्या आठळ्यांची सलगी जितकी कोकणात जाणवते, तितकी घाटावर जाणवत नाही. कारण पावसाळ्यात जेव्हा कोकणात उसंत न देणारा पाऊस कोसळत असतो तेव्हा भाज्यांची वानवा भागविण्यासाठी आठळ्यांची भाजी केली जाते. घाटावर जेव्हा सूर्य आग ओकत असतो तेव्हा कांदा, मुळा,कोरड्यास तेलं चटणी आणि भाकरीवर भूक भागवली जाते. कोकणात गरम गरम भात, कुळथाच पिठलं केलं जातं. कारण भात आणि कुळीथ हे कोकणातली पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनांची जोडी आहे. घाटावर पिठलं भाकरी केली जाते कारण ज्वारी आणि हरभरा डाळ हे घाटावरची पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनांची जोडी आहे.
एवढी मोठी यादी ! एवढ्या खासियती! एवढं वैविध्य!
ढोबळ मानाने जरी माहिती असलं तरी याहीपेक्षा अजून काहीतरी विशेष असेलच ना! असं काही, जे फक्त आपलं आहे किंवा महाराष्ट्र भूमी या वैशिष्ट्यांचं माहेरघर असेल. नक्कीच आहे आणि आपण GI मार्गे ही वैशिष्ट्ये महाराष्ट्र भूमीशी एकरूप करू शकतो.
GI म्हणजे काय? आणि याचा फायदा काय?
GI म्हणजे Geographical Indication. एखादया भौगोलिक प्रांतात उपलब्ध असणारी किंवा तयार होत असणारी वस्तू ही त्या प्रदेशाची खासियत बनून जाते. एखादा शोध लावल्यावर शास्त्रज्ञ /कॉर्पोरेट्स त्या शोधाचे स्वामित्व किंवा पेटंट त्यांच्या नावावर करून घेतात. जेणेकरून त्यांच्या परवानगीविना दुसरे कोणी त्या शोधाचा आर्थिक गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. तसंच काहीस GI ला पण लागू आहे. फरक फक्त इतकाच की पेटंट वैयक्तिक असतं तर GI हा सरकारी असतो. त्यावर सरकारची मालकी असते.
या GI बाबतीत एक रंजक किस्सा रसगुल्ल्याबाबतीत आहे. ज्यावेळी रसगुल्ला कोणाचा? असा प्रश्न पडला तेव्हा पश्चिम बंगाल, ओडिसा आणि राजस्थान या राज्यात वाद सुरु झाला. पश्चिम बंगाल सरकारने रसगुल्ला आमचा म्हणायला सुरुवात केली तेव्हा ओडिसा सरकारने जगन्नाथपुरीच्या 56 भोग प्रसाद थाळीचा उल्लेख करत रसगुल्ला आमचा असं म्हणणं मांडलं. राजस्थान सरकार या वादविवादात मागं पडलं. खरंतर राजस्थानमधील पोखरण गावात आजही रसगुल्ला तिथे जन्माला आला असं म्हणणारे लोक आहेत. शेवटी GI कार्यालयातील एका मद्रासी अधिकाऱ्याने पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यातील वाद मोठ्या कुशलतेने हाताळला. त्याने दोन GI तयार केले. पांढराशुभ्र रसगुल्ला उर्फ “बांगलार रोशोगुल्ला” बंगाल राज्याला दिला तर गुळापासून तयार झालेला तपकिरी रसगुल्ला “ओडिया रोशगुल्ला” ओरिसा राज्याला दिला. याचा फायदा बंगाल सरकारने उठवत त्यांच्या रसगुल्ला,रसमलाई, चमचम अशा सगळ्या मिठायांचं जोरदार मार्केटिंग करत “बंगाली मिठाया” जगभर प्रसिद्ध केल्या आणि उद्योगधंद्याला चालना दिली.
हळदीच्या जीआयसाठी प्रदीर्घ प्रतिक्षा
महाराष्ट्र राज्यातील 70 टक्के हळद उत्पादन आणि साठवणूक करणाऱ्या सांगलीला, हळदीचा GI मिळावा म्हणून शिवराज्य हळद उत्पादक शेतकरी स्वयं सहाय्यता गटाने प्रदीर्घ काळ मागणी लावून धरली. शेवटी 5 जुलै 2018 रोजी सांगलीला हळदीचा GI मिळाला. सरकारी GI पत्रकात सांगलीचा हळद वायदे बाजार आणि साठवणुकीसाठी जमिनी खाली विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या मोठमोठ्या पेवांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.
पेवांमध्ये हळद वर्षानुवर्षे टिकून राहते आणि इतकेच नाही तर हळदीचा औषधी गुणधर्म पण वाढतो. आज सांगलीला या हळदीमुळे जगाच्या नकाशावर स्थान प्राप्त करण्यात यश आलं. देशांतर्गत हळदीच्या व्यापारात सांगलीच्या हळदीला मोठी मागणी निर्माण झाली आणि शेतकऱ्याला चांगला हमीभाव पण मिळाला.

अंजीर फळ नाही
नारळ, आंबा, काजू, केळी, कोकम, करवंदे अशी कोकणाची फळांची बुट्टी आहे. तर अंजीर, डाळिंब, संत्री मोसंबी ही घाटावरची फळांची बुट्टी आहे. अंजीराचा विषय निघाला म्हणून नमूद करतो की, मुळात अंजीर हे फळ नसून अनेक फुलांचा समुच्चय असणारं एक संयुक्त फुल आहे. निसर्गाची किमया बघा! हे अंजिराचं फुल बंद असून सुद्धा त्यात परागकण घुसू शकतात आणि त्यासाठी एका किड्याची मदत होते. या किड्याचं नाव आहे Fig Wasp. ज्यावेळी फुल फुलत असतं त्यावेळी मादा Wasp अंगावर परागकण लेवून येते आणि आपले पंख झाडून फुलाच्या अतिशय छोट्या छिद्रातून आत घुसून जाते. या परागकणांच्या बदल्यात फुल तिच्या अंड्यांना जागा देते. Coevoluation चं हे एक उत्तम उदाहरण आहे.
पुणे जिल्हा, त्यातही पुरंदर आणि भोर तालुके अंजीर उत्पादनात अग्रेसर आहेत. 2016 साली पुरंदर तालुक्याला अंजीरासाठी GI (Geographial Index) प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला 34 जीआय
आतापर्यंत महाराष्ट्राला 34 GI मिळाले आहेत त्यापैकी 27 GI हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांशी संबंधित आहेत. नाशिकची द्राक्षे, सांगलीचे बेदाणे आणि हळद, नंदुरबारची तूर डाळ, मंगळवेढ्याची ज्वारी / शाळू , वेंगुर्ल्याचे काजू, महाबळेश्वरची स्ट्राबेरी, लासलगावचा कांदा , साताऱ्याचा वाघ्या घेवडा, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ, नागपूरची संत्री, भिवापूर (नागपूर)ची मिरची, डहाणूचे चिकू ही या मांदियाळीतली काही नावे… यावरून आपल्या खाद्यपदार्थातील वैविध्यता स्पष्ट दिसून येते.
उद्योगधंदा आणि मार्केटिंगसाठी महत्त्वाचे
उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी या GI चा खूप उपयोग होतो. अर्थात त्याचं मार्केटिंग सुद्धा जोरदार करावं लागतं. आज हापूस आंबा म्हटलं की देवगड आणि रत्नागिरीच आठवतात. या हापूस आंब्यामुळे, आंब्याच्या अफाट निर्यातीमुळे महाराष्ट्र आणि कोकण जगाच्या नकाशावर पाय रोवून उभे आहेत. संत्री म्हटलं की नागपूरचंच नाव डोळ्यासमोर येतं. संत्र्यावर आधारित खूप मोठा फूड प्रॉसेसिंगचा उद्योग उभा राहिला. द्राक्षे आणि वाईन म्हटलं की नाशिकच डोळ्यासमोर येतं. नाशिकने द्राक्ष लागवडीपासून ते भारताची वाईन कॅपिटल होण्यापर्यंतचा मोठा प्रवास पार केलाय.
महाबळेश्वर = स्ट्रॉबेरी हे समीकरण असंच मनात पक्कं झालंय. या भागातील शेतकरी पूर्ण वर्षाचं अर्थार्जन केवळ थंडीत घेतो. कोल्हापूरच्या गुळाची आणि येथील गुऱ्हाळांची कीर्ती दूरवर पोचली आहे. कोल्हापूरकडून खाली दक्षिणेला जाताना वाटेत तांदळाचा सुवास येऊ लागला की समजावं, आजरा हे गाव आलंय. गंधसाळ (अपभ्रंश –घनसाळ) नावाचा तांदूळ नावाप्रमाणे आपला सुगंध पसरवत असतो.
आपली खासियत जपण्याचा मार्ग
शेती आणि शेती उत्पादने हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. नैसर्गिक वैविध्यतेमुळे आणि अनुकूल वातावरणामुळे आपली भरभराट सहज होऊ शकते. एक ग्राहक म्हणून सुद्धा आपण आपल्याच अर्थचक्राला गती देऊ शकतो. शेतीपूरक स्थैर्यामुळे आपली खाद्यसंस्कृती सुद्धा बहरलेली आहे. महाराष्ट्रात उपलब्ध पालेभाज्यांची यादीच खूप मोठी होऊ शकते. त्यामुळे GI हा एकमेव मार्ग आहे ज्यायोगे आपण आपली विविधता आणि खासियत जपून ठेवू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांना हा वारसा देऊ शकतो.
10 Comments
सागर, लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि अभ्यास पूर्ण आहे. कौतुक वाटते तुझे. लगे रहो.
फारच तपशीलवार आणी अभ्यासपूर्ण लेख खूप खूप हार्दिक शुभेच्छा
सखोल माहिती, सहज सुंदर लिखाण त्यामुळे लेख चविष्ट झाला आहे.
सागर खूपच सुंदर अभ्यासपूर्ण लेख लिहीला आहेस.
माहितीपूर्ण लेख आहे….. छान
अप्रतिम लेख
उत्तम लेख! मी पाठवलेला वॅट्स्यावरचा संदेश पहावा
फारच छान विश्लेषण केले आहे. मला gi बद्दल पहिल्यांदाच कळले. सागर ,अशीच संधी तुला वारंवार मिळो व आमच्या ज्ञानात भर पडो. मनापासून शुभेच्छा .🌹🌹
खुपच महिती देणार लेख आहे. gi ची मला माहिती न्हावती खूपच सुंदर
Apratim lekh. Hats off.