स्वप्नं पाहणं महत्वाचं असतंच पण त्याचबरोबर ती स्वप्नं पूर्ण होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणं, हेही तितकंच महत्वाचं असतं. त्यासाठी लागते प्रचंड इच्छाशक्ती, अखंड मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द.. हे सगळं एकत्र आलं की शून्यातूनही विश्व निर्माण करता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्योजक धनंजय दातार. दुबईस्थित धनंजय दातार हे जगभरात ‘मसाला किंग’ म्हणून प्रसिध्द आहेत. स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येकासाठी धनंजय दातार यांची यशोगाथा खरोखरंच अत्यंत प्रेरणादायी आहे.
दहावीत पाच वेळा नापास
विदर्भातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात धनंजय दातार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एअर इंडियात काही काळ होते. तिथून निवृत्त झाल्यानंतर ते 1975 साली दुबईत नोकरीसाठी गेले. धनंजय दातार यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. पण खूप मोठा उद्योजक होण्याचं मात्र त्यांचं स्वप्नं होतं. अगदी शाळेत असतानाही फावल्या वेळेत चिंचा, आवळ्यांपासून ते छोट्या छोट्या गोष्टी विकण्याचा उद्योग त्यांनी केला. खरंतर दहावीत ते पाच वेळा नापास झाले होते. पण आयुष्याच्या शाळेत आलेल्या अनुभवांच्या जोरावर ते यशस्वी उद्योजक तर झालेच. पण त्यांनी लाखो जणांना रोजगारही दिला.
वडिलांच्या मालकीच्या दुकानात कामगार म्हणून रुजू
वडील दुबईत गेल्यानंतर धनंजय दातार 1984 मध्ये म्हणजे 20 वर्षांचे असताना तिथे गेले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी दुबईत किराणा मालाचं एक छोटंसं दुकान उघडलं होतं. भारतीय मसाले, लोणची, चटण्या तिथे मिळत नाहीत, हे लक्षात घेऊन हे दुकान उघडण्यात आलं होतं. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून धनंजय दुबईत गेले, तेव्हा वडिलांनी मुलगा म्हणून त्यांना कोणत्याही सवलती दिल्या नाहीत. उलट सर्वसामान्य कामगारांप्रमाणे त्यांना नोकरीवर ठेवलं. दुकानात अगदी सामानाची पोती उचलण्याच्या हमाली कामापासून धनंजय दातार यांनी सुरूवात केली. दुकानाच्या खिडक्यांच्या काचा पुसणं, सामानं उचलणं, त्याचा हिशेब ठेवणं, मालाची ने-आण करणं अशी सगळी कामं त्यांनी केली. आणि इथूनच सुरूवात झाली त्यांच्या स्वप्नांच्या प्रवासाची…
50 हून अधिक सुपरस्टोअर्स
वडिलांचं दुकान धनंजय दातार यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर नावारूपाला आणलं. त्याच्या जोडीला होता तो प्रामाणिकपणा. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी व्यवसायात सचोटी आणि प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा असतो असं ते मानतात. त्यामुळेच त्यांनी त्यांच्याकडील मालाच्या दर्जामध्ये कधीही तडजोड केली नाही. त्याचा परिणाम म्हणजे सुरुवातीच्या एका दुकानापासून आता त्यांची 50 पेक्षा जास्त सुपरस्टोअर्स, मसाल्याचे, पिठाच्या अत्याधुनिक गिरण्या आणि आयात-निर्यात कंपनीही आहे. जवळपास नऊ हजारांपेक्षा जास्त विविध प्रकारची भारतीय उत्पादने त्यांच्या या सगळ्या सुपस्टोअर्स मिळतात. ‘मसाला किंग’ ही अशी उपाधी त्यांना देण्यात आली आहे. आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिल्याने त्यांना यश मिळत गेलं. या सगळ्या प्रवासात त्यांनी मेहनत तर केलीच पण त्यांचा दूरदर्शीपणाही उपयोगी पडला.
भारतीय किराणा ते सौंदर्यप्रसाधनांचा जगभर व्यापार
दुबईतल्या भारतीय ग्राहकांना नेमकं काय हवं आहे ही नस त्यांनी अचूक ओळखली. त्यामुळे भारतीय मसाल्यांबरोबरच विविध डाळी, तांदूळ, पीठे, तेल आणि तूप हेही त्यांनी सुरू केलं. तसंच भारतीयांची खास आवड लक्षात घेऊन उत्तम चवीची लोणची, चटण्या, फरसाण आणि अन्य नमकीन, मिठाया, सुकामेवा कॉफी, डबाबंद आणि इन्स्टंट खाद्यपदार्थांची रेंजही त्यांनी सुरु केली. तसंच माऊथ फ्रेशनर, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधनंही त्यांनी उपलब्ध करून दिली. फक्त भारतीयच नाही तर दुबईतले अन्य लोकही त्यांच्याशी जोडले गेले. ‘अल अदिल’ नावाच्या त्यांच्या कंपनीचा विस्तार आता जगभरात झाला आहे. दुबईच्या बाहेर शारजा, अबू धाबी आणि अजमान या मिडल ईस्ट देशांबरोबरच हा व्यवसाय अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, इटली, कुवेत, ओमान, बहरीन इथंही पसरला आहे.
40 हजार फूट उंचीवर मुलाची मुंज
एकेकाळी पायात फाटकी चप्पल घालावी लागणारे धनंजय दातार यांच्या श्रीमंतीचे किस्से आज जगभरात प्रसिध्द आहेत. आपल्या मुलाची विमानात केलेली मुंज हा असाच एक प्रसिध्द किस्सा. त्यांचा मुलगा रोहितची मुंज त्यांनी जेट विमानात केली होती. मुंबईपासून जवळपास 40 हजार फूट उंचीवर विमानात हा समारंभ झाला होता. 150 जणांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सर्वांनीच पारंपरिक मराठी पोशाख घातले होते. भारतात झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच सोहळा होता. फक्त श्रीमंत व्यावसायिक इतकीच त्यांची ओळख नाही. आपली भारताशी असलेली नाळ त्यांनी तोडलेली नाही. अनेक गरजूंना त्यांनी मदत केली आहे. अनेक तरुण व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत केली आहे. कोरोना काळातही त्यांनी भारतात भरपूर मदत केली.
फोर्ब्सच्या यादीत समावेश
‘जुनं ते सोनं’ हे तर आहेच. त्यामुळे वडिलांनी घालून दिलेल्या परंपरा, व्यवसायातील मूल्ये ते अजूनही जपत आहेत. पण त्याचबरोबर काळाबरोबर चाललं पाहिजे हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायातही अनेक बदल केले. अनेक उत्पादने वाढवली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळेच अरब देशांमध्ये आजही त्यांच्या व्यवसायाची मूळं घट्टं रोवलेली आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार, सन्मान मिळालेले आहेत. 2018 च्या फोर्ब्सच्या मिडल इस्टच्या 100 इंडियन बिझनेस लीडर्स या यादीतही त्यांचा समावेश झाला आहे. या यादीत त्यांना 29 वं स्थान मिळालं होतं. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘मसाला किंग’ हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. जगभरात त्यांचा सतत प्रवास सुरू असतो, अनेक आंतरराष्ट्रीय महत्वाच्या व्यक्तींशी त्यांच्या गाठीभेटी सुरू असतात. तरीही त्यांच्या कुटुंबाक़डे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. आपलं कुटुंब हा आपला आधार आहे असं ते मानतात. व्यवसायात यश मिळवायचं असेल तर कुटुंबाला विश्वासात आणि सोबत घ्या. असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्याही उद्योगात पत्नीचं मत विचारात घेतलं पाहिजे असं ते म्हणतात. त्यामुळेच पत्नी वंदना यांची मिळालेली साथ अत्यंत मोलाची आहे असं त्यांना वाटतं.
अत्यंत गरीबी ते प्रचंड श्रीमंती हा प्रवास फक्त बॉलीवूडच्या चित्रपटांतील हिरोच करतात असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही धनंजय दातार यांचा जीवनप्रवास नक्की वाचा. एकेकाळी अर्धपोटी राहणाऱ्या विदर्भातल्या एका मुलानं त्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं उद्योजकतेचं स्वप्नं कसं पूर्ण केलं याचं अत्यंत प्रेरणादायी उदाहरण म्हणजे ‘मसाला किंग धनंजय दातार…!’