नवरात्रांत संपूर्ण देशभरात शक्ती किंवा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवस व रात्री केल्या जाणा-या शक्तीच्या उपासनेमध्ये वैविध्य आढळते. ही देवीची रूपे धैर्य, समृद्धी, मातृत्व, आध्यात्मिकता, मुक्ती इत्यादी विविध प्रतीके प्रस्थापित करतात. शिवाय नवरात्र देवीच्या विजयाचे आणि पराक्रमाचे प्रतीकही मानले जाते. नवरात्रीदरम्यान देवीच्या पूजनात कलात्मकताही आढळते. अशाच एका नवरात्रांत केल्या जाणा-या देवीच्या व्रताची माहिती आपण घेणार आहोत.
उकडीची महालक्ष्मी
नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीपूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतेककरून अनेक कुटुंबात महालक्ष्मीपूजन कुळधर्म म्हणून पाळले जाते. पण प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राह्मण या समुदायात एक अत्यंत वेगळा प्रकारचे महालक्ष्मीपूजन पाहायला मिळते. कोकणस्थ ब्राह्मण समुदायात महालक्ष्मीची पूजा उकडीची महालक्ष्मी या नावाने प्रसिद्ध आहे. या समाजातील स्त्रिया लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांना, वसा घेतलेल्या, म्हणून वशेळ्या असेही म्हटले जाते. नवरात्रीतल्या अष्टमीला सकाळी देवीची धातूची मूर्ती, दुर्वांचा एक तातू (तंतू) आणि एक रेशमी तातू यांची पूजा करतात.
हाताने किंवा साच्यात घडवलेला मुखवटा
पूजेचा महत्वाचा भाग सायंकाळी सुरु होतो. तांदुळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा करणे हे या दिवसाचं मुख्य वैशिष्ट्य. म्हणूनच हे व्रत उकडीची महालक्ष्मी या नावाने प्रसिद्ध आहे. सुमारे 1 किलो तांदुळाच्या पिठाची मोदकांना काढतो तशी उकड काढून ती उत्तम प्रकारे मळून घेतली जाते. पूर्वी एक पायली तांदूळ घेतले जात असत. या उकडीपासून देवीचा मुखवटा बनविला जातो. यात दोन प्रकार आढळतात. काही घरांत उकडीचा हाताने आकार देवून कलात्मक मुखवटा बनविला जातो. तर काही घरांत मुखवटा बनविण्याचा साचा वापरला जातो. त्या साच्यात शंखजिऱ्याची पावडर भुरभुरून उकड भरून मुखवटा साकारला जातो. त्यानंतर मुखवटा रंगवला जातो. तयार मुखवट्याला काजळाने नाक-डोळे रेखाटले जातात. नंतर विविध आकाराचे हंडे, कळशा, धान्यांचे पिंप इत्यादींच्या आधाराने मानवी उंचीचा आकार उभारून त्यावर हा मुखवटा बसवितात. हल्ली यासाठी फायबरच्या तयार सांगाडे वापरतात. या सांगाड्याला नऊवार नेसवून आणि विविध अलंकार घालून महालक्ष्मीची सुंदर मूर्ती उभी केली जाते. देवीचे रूप दृष्टाळू नये म्हणून तिला तीटही लावली जाते.
केवळ महाराष्ट्रातच ही परंपरा
साधारणपणे मुखवटा साकारताना आणि मूर्ती उभी करताना लोकांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले जाते. काही ठराविक हया कलेत वाकब असणारेच महालक्ष्मीचा मुखवटा आणि मूर्ती साकारतात. अनेकांचे सल्ले आणि मते टाळणे हा या मागचा उद्देश असावा. महाराष्ट्रात अष्टमीच्या महालक्ष्मीव्यतिरिक्त अन्यत्र कुठेच उकडीचा मुखवटा बनविला जात नाही. फार पूर्वी बंगालमध्ये दुर्गेची प्रतिमा तांदळाच्या पीठाचा मुखवटा साकारून केली जायची असे म्हणतात.
अष्टमीच्या रात्री घागर फुंकणे
मुखवटा सायंकाळी साकारला जातो. यानंतर पूजा, आरती, इत्यादी उपाचार केले जातात. आणि रात्र जागवली जाते. यावेळी देवीपुढे घागरी फुंकल्या जातात. विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर, उपडी घागर धरून त्यात धूर भरला जातो. नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारीत, ती घागर नाचवीत देवीपुढे नृत्य केले जाते, फेर धरला जातो. प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे. चौथ्या प्रहरात म्हणजेच रात्री दोन वाजल्यानंतर देवीची आरती करून उत्तरपूजा केली जाते आणि मुखवट्याचे पाण्यात विसर्जन केले जाते.
तांदळाच्या उकडीचे आव्हान
तांदळाच्या उकडीवर काम करणे हे अत्यंत जिकरीचे काम आहे. त्यामुळे मुखवटा बनविताना मेहनत घ्यावी लागते. उकड मळून लोण्यासारखी मऊ न मळल्यास मुखवट्याला तडे जातात. देवीचे रूप साकारल्यानंतरही विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हल्ली मातीचे किंवा फायबरचे तयार मुखवटे वापरले जातात.
महालक्ष्मीच्या शेजारी शंकर!
या उभ्या मूर्तीच्या शेजारी, पूर्वी एका मोठ्या कलशावर शेंडीसह असलेला नारळ, पगडी किंवा टोपी, गळ्याशी उपरणे आणि कपाळाच्या जागी गंधाचे त्रिपुंड्र लावून ठेवला जात असे. ह्या नारळाला शंकराचे प्रतीक मानले जाते. हल्ली काही ठिकाणी असोला नारळाऐवजी केवळ तांब्याचा कलश ठेवला जातो. महालक्ष्मीचा आणि शंकराचा संबध दुर्गा सप्तशतीत आढळतो. महिषासुराचा वध करण्यासाठी विविध देवांनी देवीला आपापली शस्त्रे दिली. शंकर संहाराचा देव असल्याने त्यानेही देवीला संहारक शस्त्रे आणि शक्ती दिल्या. यामुळे घनघोर युद्धात देवीचा विजय झाला. या घटनेची आठवण म्हणून महालक्ष्मीसोबत भगवान शंकराचीही पूजा केली जाते. काही ठिकाणी या शंकरालाच गोपा, कार्तिकस्वामी, आणि देवीचे बाळ असेही म्हटले जाते. पण ह्यामुळे ही महालक्ष्मी केवळ संपत्तीची देवता लक्ष्मी नसून आदिशक्तिचे महालक्ष्मी स्वरूप आहे हे प्रस्थापित होते.