अभिजात मराठीची देवनागरी

Abhijat Marathi Bhasha : ‘मला मराठी टाइप करता येत नाही,’ असं लोक न लाजता सांगतात. निर्लज्जपणे असं म्हणायचं होतं. पण त्यामुळे अनेकांचा पापड मोडण्याची शक्यता. पूर्वी अक्षराला हसू नये अशी तळटीप पत्रव्यवहारात असायची. ती केवळ हस्ताक्षराच्या न्यूनगंडातून नव्हती, तर ऱ्हस्व-दीर्घ व्याकरणाच्या गंडातून असायची. हल्ली ‘माझं मराठी थोडं कच्चं आहे,’ अशी तळटीप बोलतानाही सरसकट असते. ती मात्र अहंगंडातून असते. पण मराठीला अभिजात न्यूनत्व बहाल करून जाते.
[gspeech type=button]

वर्तमानपत्रातल्या बऱ्याच जाहिरातींमध्ये चुका असतात. त्या उसंडु म्हणजे उपसंपादकांच्या डुलक्या नसतात. जाहिरात क्षेत्रातील अमराठी लोकांनी जाहिरातीतला मजकूर संपादन केल्यामुळे राहून गेलेल्या त्रुटी असतात. जाहिरातीतल्या मजकुरातले बरेचसे उच्चार हे गुजराती-पंजाबी पद्धतीचे किंवा गुगल ट्रान्सलेशनद्वारे करवून घेतलेले दिसतात. आपण मराठी वाचक जाहिरातीतला मजकूर म्हणून खुशाल खपवून घेतो. त्यामुळे जाहिरात क्षेत्रातल्या मराठी माणसांच्या नोकऱ्या बाधित होतात.

अॅडव्होकेट शांताराम दातार यांनी कोर्टाच्या निकालपत्रासाठी व मराठी भाषेतून विधिसाक्षरतेसाठी आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांनी मराठी विधिकोषाची सिद्धताही केली. न्यायालयांमध्ये ड्राफ्टिंग अर्थात न्यायालयीन मसुदा आणि इतिवृत्तांचे लेखन हे ब्रिटिश काळापासून इंग्रजीत होते. इथे दाक्षिणात्य टंकलेखकांची मक्तेदारी होती. ती मोडीत काढण्यासाठी न्यायालयांमध्ये मराठी भाषेमध्ये निकालपत्र व मसुद्याचा आग्रह धरला पाहिजे. त्यामुळे मराठी टंकलेखकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.

मोल्सवर्थने मराठी शब्दकोष विकसित केला होता. पण तो एतद्देशीयांसाठी नव्हे, तर ब्रिटिशांना इंग्रजीतून मराठी समजून घेता यावं या उद्देशाने. पण मराठीजनांना इंग्रजी समजून घेतानाही त्याचा उपयोग झाला. मराठी अभिजात होण्यासाठी उपयोग नसला तरी शब्दकोषाचं श्रेय तर मोल्सवर्थला द्यावं लागेल.

मराठी भाषेची लिपी देवनागरी. देवनागरीला लंगडी लिपी असंही म्हणतात. ही लिपी तीन स्तरात लिहिली जाते. मधलं अक्षर, वेलांटी आणि खाली उकाराचा डेक. आपले वर्णही रोमन वर्णांप्रमाणे एका मितीत नाहीत. त्यामुळे आधुनिक ओसीआर म्हणजे ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन या तंत्रज्ञानाला देवनागरी पर्यायाने मराठी भाषा पूरक नाही. त्यामुळे जुनी पुस्तकं स्कॅन करून त्याचे टेक्स्ट (संगणकातील टंकलिखित) स्वरूप विकसित करणे शक्य होत नाही. ओसीआरमध्ये मराठीत केवळ 60 टक्के अचूकता प्राप्त होते. रोमन लिपीसाठी ती 96 टक्क्यांपर्यंत आहे.

आपल्या देवनागरी लिपीच्या वर्णमालेच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रयास झालेत. कोलतेंनी 70 च्या दशकात वर्णमाला दुरुस्तीचा घाट घातला होता. तो प्रयत्न अर्धवट सोडला गेला. त्यानंतर 90 च्या दशकात राज्य मराठी भाषा विकास संस्थेत सरोजिनी वैद्य यांच्या पुढाकाराने प्रयत्न हाती घेतले गेले. पण त्यांनाही पुढे जाता आलं नाही.

त्याआधी सावरकरांनी मराठी वर्णपद्धती बदलली. त्यांच्या साहित्यक्षेत्रातल्या प्रभावामुळे त्यांना या वर्णपद्धतीसाठी अनुयायी मिळाले. सावरकरांना त्यावेळी खिशात राहील या आकाराचा टाइपरायटर विकसित करायचा होता. त्यासाठी त्यांनी अनेक स्वरांनाही सुटी दिली होती. तरीही कालौघात आपली देवनागरी ही लंगडी लिपीच राहिली. रुकार, ऋकार, रफार, काकपाद, हलन्त हे प्रकार मराठीजनांनाही कळत नाहीत, तर बाकीच्यांना ते समजून घ्यायला अवघडच जाणार. रुपाली हा शब्द रुपं म्हणजे चांदीवरून आला आहे. सावळ्या रंगाच्या मुलीला रुपाली म्हणणं संयुक्तिक. पण रुपाली ऐवजी रूपाली असा दीर्घ रू वापरून, त्याचा अर्थ म्हणजे रूपवान मुलगी असा रुजून गेला. लंगड्या लिपीत र ला उकार द्यायचा असेल तर तो खालच्या थरात नाही, तर पोटात जोडावा लागतो. ञ हा वर्ण आता वापरात नाही. पण तो त्र अशा अर्थाने लिपीत वापरला जातो. ङ हा वर्ण वाङ्मय लिहिताना केवळ वापरला जातो. तोही उच्चारताना काही महाभाग वाडमय असा उच्चारताना ऐकले आहे. सिंह हा उच्चार मराठी सिंव्ह असा उच्चारतात. तो हिंदी पद्धतीने हल्ली मराठीतही उच्चारला जातो. ऋ या वर्णाचा उच्चार रु की री यावरही मराठी भाषकांचा गोंधळ आहेच. हल्ली तर मुलांना शिकवताना काही मराठी आया क्रीश्ना असंही म्हणतात. श आणि पोटफोड्या ष यातील उच्चाराचीही गडबड आहेच.

पण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर हे प्रश्न अप्रस्तुत आहेत. मराठी भाषा व्यवहारात आणण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे. मराठी लिपी व्यवहारात आणण्यासाठी आपल्याला अधिक संधी आहे. कारण हीच लिपी हिंदी, नेपाळी व अन्य काही भाषांसाठीही आहे. त्यामुळे मराठी कळफलक वापरून लिहिणाऱ्यांसाठी अन्य भाषेतल्या नोकऱ्यांचा किंवा भाषांतरकाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

मराठी भाषेची देवनागरी लिपी ही संगणकावर चांगल्या प्रकारे सहज व वेगाने लिहिता यावी म्हणून प्रा. मोहन आपटे यांनी इनस्क्रिप्ट हा कळफलक विकसित केला. इनस्क्रिप्टमध्ये डाव्या बोटांमध्ये स्वर आणि उजव्या बोटांमध्ये व्यंजने आहेत. इनस्क्रिप्ट काळाच्या ओघात विकसित झाला. सुरुवातीला जोडाक्षरांमध्ये अडचणी यायच्या. ज्याला अॅ शब्द लिहिता यायचा नाही. आयलॅश वर्ण म्हणजे ऱ्हस्व किंवा शेतकऱ्यांच्या लिहितानाचा वर्ण ओघाने विकसित झाला. रुकार, ऋकार, रफार हे इनस्क्रिप्टमधून लिहिताना अचूक येतात. कारण इनस्क्रिप्ट कळफलक उच्चार म्हणजे फोनेटिकप्रमाणे विकसित झालेला आहे.

त्याआधी बाजारात मराठी भाषेत टाइप करायला अनेक मराठी फॉण्ट होते आणि ते आपल्या मर्जीने त्यांनी कळफलक विकसित केले होते. भागवतांचे डॉस या संगणकप्रणालीमध्ये मराठी सॉफ्टवेअर उपलब्ध होते. गोदरेज इलेक्ट्रॉनिक्स टाइपरायटरचा कळफलक 90 च्या दशकात मोठ्या प्रमाणात प्रचलित होता. सरकार दरबारी आयएसएम नावाचे सॉफ्टवेअर होते त्यांचा वेगळा कळफलक. वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळे कळफलक असायचे. त्यामुळे एका वर्तमानपत्रातून दुसऱ्या वर्तमानपत्रात जाणं सोपं नसायचं. कारण नव्याने वेगळा कळफलक आणि सॉफ्टवेअर शिकावं लागायचं. बेडेकरांनी फॉण्टफ्रिडम नावाचे सॉफ्टवेअर आणले. त्यात वेगवेगळ्या फॉण्टमध्ये टाइप केलेला मराठी मजकूर आपल्या सोयीच्या फॉण्टमध्ये परिवर्तित करणं शक्य होऊ लागलं. पण हा सगळा द्राविडी प्राणायाम होता.

युनिकोडमुळे हे सगळे उपद्व्याप संपले. तरीही युनिकोड स्वीकारायला आपल्याला उशीरच झाला. बंगाली आणि तमिळ भाषा युनिकोड कन्सोर्शिअम 91 साली आलं तेव्हा तातडीने सदस्य झाल्या. मराठीला एकविसावं शतक उजाडावं लागलं. त्यामुळे फॉण्टचं, कळफलकाचं सामायिकीकरण झालं. त्याचा फायदा मराठी प्रकाशन व्यवसायाला, मराठी प्रसार माध्यमांना तर झालाच. पण संगणकावर आणि कालांतराने मोबाइल फोनवर मराठी टाइप करणं आणि टाइप केलेलं वाचणं एकदम सोपं झालं. हे आता सगळं सोप प्लॅटरवर आलं त्यामुळे सोपं वाटतंय. पण त्याआधी वीस वर्षे या कामात अनेकांना खूप खस्ता खाल्या आहेत. त्या सगळ्यांचंच अभिजीत भाषेचा दर्जा मिळताना आभार मानायला पाहिजे.

मराठी अभिजात झाली म्हणून मराठी भाषेचा अभिनिवेश नको. पण आग्रह जरूर करू शकतो. आवर्जून मराठी बोलणं म्हणजे संस्कृतप्रचुर शब्दांची पखरण करणं नव्हे. अनेक विनोदी प्रहसनात मराठीचा अतिरेक दाखवताना आगगाडी किंवा सिग्नल यंत्रणेसाठी संस्कृत प्रभावातील लांबलचक मराठी शब्द सादर केले जातात. मग मराठी ही जड आणि उपहास करण्यायोग्य भाषा आहे असा गंड आपोआपच तयार होत जातो.

मराठी भाषा ही संस्कृतमधून नाही, तर ब्राह्मी या मातृभाषेतून विकसित झाली आहे. खरं तर अनेक भारतीय भाषांची जननी ब्राह्मी ही भाषा आहे. मराठीवर तमिळ, प्राकृत, संस्कृत, मरहट्टी, फारसी, दखनी, हिंदी, इंग्रजी या भाषांचा प्रभाव पडत गेला. या भाषांच्या प्रभावामुळे ती प्रगल्भ होत गेली. मराठीतल्या अनेक बोलीभाषा विकसित झाल्या. ज्याला आज सदाशिव पेठी म्हणतो ती मराठी प्रमाणभाषाही गेल्या काही शतकात विकसित झाली.

मराठीत आपण अनेक शब्द सहज स्वीकारले आहेत. तरुण संपादक मित्र सचिन परब हे भाषेचे व्यासंगी आहेत. कोर्ट हा शब्द आता मराठीच आहे. आणि मराठी भाषेने तो स्वीकारला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते पटतं. कारण ग्रामीण भागात अनेक लोकांना कोर्ट हा शब्दच कळतो. न्यायालय हा शब्द त्यांना उच्चारायला आणि वापरायला कठीण वाटतो. मग कोर्ट हा शब्द अधिक रुळला असेल तर तो बोली भाषेत स्वीकारायला काय हरकत आहे?

आनि-पानी या वापरावरून अनेक अभिजन भाषेच्या माध्यमातून वर्णव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा संस्कृत हीच अभिजनांची भाषा हा ग्रह तात्पुरता ग्राह्य धरला. तर आनि हा मराठीतला शब्दप्रयोग संस्कृतला अधिक जवळचा. कारण तो अन्य या संस्कृत शब्दातून आला असं आपण मानू शकतो. मग ‘अन्य’ला ‘आनि’ जवळचा की आणि? पाणी हा शब्द संस्कृतमध्ये हात या अर्थाने वापरला जातो. पन्य हा धातू पानीला जवळचा. त्यामुळे आनि-पानी करणारे खरं तर संस्कृतच्या जास्त जवळचे आणि जास्त अभिजन मानायला पाहिजेत. अर्थात हा काही फार गांभीर्याने घ्यायचा विषय नाही. या आनि-पानीच्या हेटाळणीचा प्रभाव इतका पडला की अनेक बहुजन सुशिक्षित आनि-पानी बोलायचं नाही म्हणून आवर्जून न ऐवजी ण वापरू लागले. त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या बोलण्यात शणिवार, माणनीय असे उच्चार येऊ लागले.

बऱ्याच राजकीय लोकांच्या बोलण्यात या ठिकाणी असा शब्दप्रयोग येतो. त्यावरून त्यांची हेटाळणी केली जाते. परंतु मराठी माध्यमांच्या टीव्ही वाहिन्यांवरूनही ‘कुठे तरी’ हा शब्द वारंवार वापरला जातो. हा ‘कुठे तरी’ अगदीच अनावश्यक आहे. पण तरीही आपण तो वापरतोच. त्यामुळे कुणाचीही मराठीच्या वापरावरून हेटाळणी करण्याआधी आपण किती पाण्यात आहोत हेही पाहायला हवे. मराठी अभिजात म्हणून मिरवण्यासाठी, ती रोजच्या व्यवहारात वापरली जावी यासाठी मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. आपल्या शिक्षणाची, अभ्यासाची, आचार-विचारांची भाषा पूर्णपणे मराठी होईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने तिला अभिजात दर्जा प्राप्त होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि
Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ