संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीमधल्या जरुडमध्ये भूजल पातळी प्रचंड खालावली. संत्रा बागा सुकू लागल्या आणि शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या. पण निवृत्त लष्करी जवान सुधाकर मानकर यांनी सरपंचपदी आल्यावर गावाला एक ध्येय दिलं. आता जरुडमधील विहिरांना 20 फुटांवर पाणी आहे. आणि जरुडमध्ये दुबार पिकं घेतली जात आहेत.
कमी पावसाचा फटका
अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आणि शक्ती नदीच्या काठावर जरुड गाव वसलं आहे. इथली लोकसंख्या 20 हजाराच्या आसपास. गावाचा भौगोलिक परिसर 6,500 एकरात पसरलेला आहे. इथली जमीन काळी व चिकन माती मिश्रित, संत्र्यासाठी एकदम पोषक असणारी आहे. पण 2018 मध्ये या भागात पाऊस फारच कमी पडल्याने भूजल पातळी कमी झाली. विहिरी आटल्या. शेजारचे शेकदरी धरण कोरडे पडले. संत्रा बागा सुकायला लागल्या. शेतकरी हवालदिल झाले. परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या.
सेवानिवृत्त जवानाच्या हाती गावची धुरा
भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यावर सुधाकर मानकर आपल्या गावी जरुडला परतले. गावच्या पाण्यासोबत गावची रया आणि लोकं दोन्ही आटायला लागल्याचं त्यांच्या नजरेत लगेच आलं. गावकऱ्यांनी गावाची जबाबदारी सुधाकर मानकर यांच्या खांद्यावर टाकली. 2019 मध्ये मानकर यांना सरपंच म्हणून निवडून दिले. सुधाकर मानकर यांनी सर्वात आधी गावाला हिरवेगार करण्याचा संकल्प केला.
मानकर यांनी निवडून आल्यावर गावकऱ्यांची एक विशेष सभा बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे 14 एप्रिल रोजी बोलावली. आपल्या मनातील कल्पना त्यांनी गावकऱ्यांसमोर बोलून दाखवल्या. त्यांचे सहकार्य मागितले. सर्वप्रथम शेताच्या बांधावर असलेली झाडे जी वानरांच्या त्रासामुळे गावकरी तोडून टाकत होते, त्यावर त्यांनी बंदी घातली. गाव हिरवगार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी गावातील आजूबाजूला असलेली पडीक जागा सर्वप्रथम लोक सहभागातून साफ करून घेतली.
अटल भू योजना आणि वसुंधराचा प्रवास
मानकर यांना शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमाबद्दल कळले. त्यांनी त्या अभियानाचा अभ्यास केला आणि त्यात सहभागी व्हायचे ठरविले. आणि मग सुरू झाला माझी वसुंधरा टप्पा 0.5 व अटल भूजल योजनेचा प्रवास. लोक सहभाग आणि शासनाची मनरेगा योजना या माध्यमातून मानकर यांनी सरपंचपदाच्या पहिल्याच वर्षी गावात 8600 वृक्षांची लागवड केली. त्यांचे योग्य संगोपन केले. लोकांचा उत्साह वाढला. दुसऱ्या वर्षी पुन्हा 12 हजार वृक्षांची लागवड केली. वृक्ष लागवडीकरता रोपांची उपलब्धता व्हावी, म्हणून गावातच 51 हजार वृक्षरोपांची नर्सरी स्वतः तयार केली. सरपंच पदाच्या तिसऱ्या वर्षाच्या कार्यकाळात पुन्हा गावात 38,400 वृक्ष लागवड केली. गावात एकूण आठ ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ऑक्सिजन पार्क निर्माण केले. त्या ऑक्सिजन पार्कमध्ये संपूर्ण देशी जातीचे वड, पिंपळ, बिहाडा, चिंच, आंबा असे विविध वृक्ष आणि फळझाडे दिमाखात बहरत आहेत.
ड्राय झोन झाला वेट झोन !
बऱ्याच वर्षांपासून ड्राय झोन म्हणून घोषित झालेला हा परिसर.. गावातील पाणी प्रश्नांवर उपाय म्हणून मानकर यांनी गावात वाहणाऱ्या सुखी नदीचे खोलीकरण करण्यास प्राधान्य दिले. या नदीला आता शक्ती नदी म्हणून ओळखलं जातं. गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी अशा शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले. जे गावकरी आपल्या घराच्या छतावरील पाणी शोष खड्डे करून मुरवतील त्यांना ग्रामपंचायतीने गृहकरांमध्ये 20% सूट दिली. परिणामतः अनेक गावकरी आपल्या छतावरील पाणी घरच्या घरी शोषखड्डे खोदून जवळच्या विहिरीतून मुरवायला लागले. अशा विविध उपक्रमामध्ये गावातील पाणी पातळीत वाढ होऊन गावातील विहिरींना वीस ते पंचवीस फुटावर आता पाणी उपलब्ध होत आहे. मानकर यांच्या पाणी नियोजनामुळे, वृक्ष लागवडीमुळे आणि जलसंधारणाच्या कामामुळे जरूड परिसरातील पाणी पातळीत वाढ झाली.
एक कोटी रुपयांचे बक्षिस आणि विविध उपक्रम
पाणी संचयनाच्या या सर्व एकत्रित परिणामांना चांगलंच यश आलं. जरुडमधील शेतकरी आज दुबार पिके घेत आहेत. जरुडने शासनाच्या अटल भूजल योजनेत देखील उत्कृष्ट कार्य केले. अटल भूजल योजनेतील कामांमुळे अमरावती विभागातील एक कोटी रुपयांच्या पुरस्काराची जरूड ग्रामपंचायत मानकरी ठरली. या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने 2025 च्या गणराज्य दिन समारंभामध्ये त्यांना आमंत्रित केले होते. गावातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, नाला, नदी खोलीकरण, गावात रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रधान्य, प्लास्टिक मुक्त अभियान, संपूर्ण गावात एलईडी लाईटचा वापर, ओला सुका कचरा विलगीकरण आणि त्या माध्यमातून सेंद्रिय खत, गांडूळ खत निर्मिती, गावात सुसज्ज वाचनालय, अभ्यास केंद्र, गावातील रमणीय केलेली स्मशानभूमी (गावकरी आता स्मृतीउद्यान म्हणून संबोधतात), गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाणी मिळेल अशी व्यवस्था, त्यातून वाढलेला रोजगार, शासनाच्या मनोरगा योजनेचा प्रभावी वापर, सरपंच साहाय्यता खाते काढून लोक वर्गणीतून जमा होणारी लाखोंची रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च करणे. अशा अनेक बाबी जरूड गावाला शाश्वत विकासाकडे घेऊन जात आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत परिसरात सौर ऊर्जेवर आधारित प्रकाश सुविधा निर्माण करण्यासाठी आता त्यांचे कार्य सुरू आहे.
निवृत्तीनंतरही देशसेवेचा वसा
सैन्यात सेवा बजावतांना पायाला लागलेल्या बंदुकीच्या गोळीमुळे मानकर यांना अपंगत्व आलं आहे. पण ते त्यांच्या कामाच्या आड कुठेही आलं नाही. मानकर यांच्यातला सैनिक अगदी झपाटल्यासारखा काम करतो. त्यांची सकाळ सुरू होते ती गावासाठी करावयाच्या नियोजनातून. गावासाठी सतत काम, काम आणि काम हा सुधाकररावांचा एकच मंत्र आहे. कणखरपणा, शिस्त आणि तेवढीच शालिनता या गुणांमुळे सुधाकररावांच्या कामात एक वेगळी जरब दिसून येते. गावकरी त्यांच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि श्रमदान, लोकसभागातून गावात विविध उपक्रमांची उभारणी होते. वरुड जरुड चा परिसर म्हणजे एकेकाळी संत्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जात असे. मात्र कित्येक वर्षांपासून पाण्याची पातळी खोल खोल गेल्यामुळे येथील संत्राबागा संकटात सापडल्या होत्या. उगाच चिंता करीत बसण्यापेक्षा यासाठी काहीतरी कृती करणे गरजेचे आहे, हे समजून मानकर यांनी गावातील पडीक जागेवर वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य दिले.
…लाख बोलक्याहूनी थोर ! एकची माझा कर्तबगार ! हे वचन पाळोनि सुंदर! गाव सुधारावे कार्याने !! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वरील ओवी या गाव सुधाकर मानकर यांच्या कर्तबगारीला तंतोतंत लागू पडतात.