पौराणिक कथेनुसार माघ शुक्ल चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला होता म्हणून या माघी गणेश चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. गणेशजन्माची प्रसिध्द कथा आपल्याला माहिती आहेच. पार्वतीने तिच्या दाराचे रक्षण करण्यासाठी माती किंवा उटण्यापासून एक बालक बनवून त्यात प्राण फुंकले. ही कथा शिवपुराणात येते. परंतु इतर पुराणांमध्ये गणेशाच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. या लेखात आपण गणेश जन्माच्या अशा काही आगळ्या वेगळ्या कथा पाहणार आहोत.
विष्णूने घेतला पार्वतीच्या पोटी जन्म
ब्रह्मवैवर्त पुराणात गणेशाच्या जन्माची एक वेगळी कथा सांगितली आहे. ही कथा तुलनेने कमी प्रसिद्ध आहे. शिवाच्या आग्रहावरून पार्वतीने अनेक वर्षे विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पुण्यक नावाचे व्रत केले. तिच्या या तपश्चर्येने संतुष्ट होऊन विष्णूने पार्वतीला सांगितले की, तो प्रत्येक कल्पात (युगात) तिचा पुत्र म्हणून अवतार घेईल. त्यानुसार, गणेशाचा जन्म झाला. कैलासावर पुत्रजन्माचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यासाठी सर्व देवांना नवीन जन्म झालेल्या बालकाचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यानुसार सर्व देव कैलासावर आले. मात्र, शनी त्या बालकाकडे पाहण्यास संकोच करत होता. कारण शनीला ‘त्याच्या दृष्टीने विनाश होईल’ असा शाप मिळाला होता. म्हणून शनीने डाव्या डोळ्याच्या कोप-यातून बालकाकडे पाहण्याचा निर्णय घेतला. परंतु पार्वतीने शनीने बालकाकडे पूर्णपणे पाहावे असा अत्याग्रह केला.
शेवटी पार्वतीच्या आग्रहास्तव शनीने बालकाकडे पाहिले आणि परिणामी त्याच क्षणी त्या बालकाचे शिर धडावेगळे झाले. हे पाहून शिव आणि पार्वती दुःखाने व्याकुळ झाले. शेवटी विष्णूने, आपल्या गरुडावर आरूढ होऊन, पुष्पभद्रा नदीच्या काठी जाऊन एका लहान हत्तीचे शिर आणले. ते शिर पार्वतीच्या मुलाच्या धडावर लावले गेले आणि त्याला पुन्हा जीवदान मिळाले. पुढे त्या बालकाचे नाव गणेश ठेवले गेले. सर्व देवांनी गणेशाला आशीर्वाद दिले आणि त्याला सामर्थ्य व समृद्धी लाभो अशी इच्छा व्यक्त केली.
बाल-आदित्याच्या हत्येमुळे शिवाला शाप
गणेशाच्या जन्माबाबतची आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा शिवाकडून नकळत बाल-आदि्त्याची (सूर्य) हत्या झाली. मात्र नंतर शिवाने त्या मुलाला पुन्हा जीवन दिले. मात्र यामुळे कश्यप ऋषी संतप्त झाले. त्यांनी शिवाला शाप दिला की, त्याच्या मुलाचे शिर त्याला गमवावे लागेल. पुढे गणेश जन्माच्या वेळेस हा शाप खरा ठरला. तेव्हा इंद्राच्या हत्तीचे शिर शिवाच्या मुलाला लावण्यात आले.
विघ्नेशाची जन्मकथा
आणखी एका कथेनुसार एकदा पार्वतीने स्नानासाठी वापरलेले पाणी गंगेत फेकले. ते पाणी हत्तीचे मुख असलेल्या देवी मालिनीने प्यायले. याचा परिणाम म्हणून तिला चार हात आणि हत्तीची पाच डोकी असलेला मुलगा झाला. गंगेने त्या मुलाला आपला पुत्र मानले. शिवाने त्याच्या पाच डोक्यांचे एका डोक्यात रूपांतरण केले आणि त्याला पार्वतीचा पुत्र म्हणून घोषित केले. पुढे हाच शिवाचा आणि पार्वतीचा पुत्र विघ्नांचा अधिपती (विघ्नेश) म्हणून प्रसिध्द झाला.
मानव आणि हत्तीचे सांस्कृतिक संबंध
संशोधकांच्या मते प्राचीन भारतातील हत्तीची पूजा आणि मानवाचे हत्तीशी असलेले सांस्कृतिक संबंध नंतरच्या काळात गणेशरूपाने प्रस्थापित झाले. त्यानुसार वर पाहिलेल्या सर्व कथांमध्ये गणेशाचा जन्म आणि त्याचे हत्तीचे शिर या दोन गोष्टी अधोरेखित होतात. मात्र या संबधात अजून एक वेगळी कथा प्रसिध्द आहे ती म्हणजे शिवाच्या गजासुराच्या वधाची.
गजासूराच्या पोटातून शिवाची मुक्ती
प्राचीन काळी हत्तीप्रमाणे बलाढ्य आणि हत्तीची लक्षणे असलेला गजासुर नावाचा राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या या कठोर तपश्चर्येने शिव संतुष्ट झाले आणि त्यांनी गजासुराला वर मागण्यास सांगितले. ’माझ्या शरीरातून सतत अग्नी प्रज्वलित होत राहील आणि त्यामुळे कोणीही माझ्याजवळ येण्याची हिंमत करणार नाही’ असा वर गजासुराने मागितला आणि शिवाने प्रसन्न होवून दिला. मात्र गजासुराने आपली तपश्चर्या सुरूच ठेवली. आणि वेळोवेळी शिव प्रसन्न होवून गजासुरा पुढे प्रकट होत राहिले. एकदा शिवाने त्याला पुन्हा विचारले की, त्याला अजून काय हवे आहे. या वेळी मात्र गजासुराने कपटाने उत्तर दिले, की शिवाने माझ्या पोटात निवास करावा. शिवाने तेही मान्य केले. दरम्यान, शिव न सापडल्याने पार्वतीने सर्वत्र शिवाचा शोध घेतला. शेवटी, तिने शिवाला शोधून आणण्याची विनंती विष्णूंकडे केली त्यानंतर शिवाला प्राप्त करण्यासाठी विष्णुने एक छोटा नाट्यप्रसंग रचला. त्याने नंदीला एका नाचणाऱ्या बैलामध्ये रूपांतरित केले आणि स्वतः एका बासरीवादकाचा अवतार घेतला. नंदीला नाचवून आणि स्वतः बासरी वाजवून त्या दोघांनी गजासुरासमोर खेळ केला.
त्यामुळे आनंदित झालेल्या गजासुराने बासरीवादकाला विचारले की, “तुला काय हवे आहे?” त्यावेळेस विष्णूने उत्तर दिले, “तू मला मी जे मागेन ते देऊ शकशील का?” उन्मत्त गजासुराने विष्णुच्या मागणीला अनुमोदन दिले.” त्यावर विष्णू लगेच म्हणाला, “जर असे असेल तर, शिवाला तुझ्या पोटातून मुक्त कर.” त्याक्षणी गजासुराला लगेच समजले की, हा बासरीवादक दुसरा कोणी नसून स्वतः विष्णू आहे. त्याने विष्णूच्या चरणी स्वतःला नतमस्तक केले आणि शिवाला मुक्त केले. मात्र शेवटी गजासुराने शिवाकडे दोन वरदान मागितली. त्यातील पहिले म्हणजे गजासुराच्या शिराची सर्वांनी पूजा करावी आणि शिवाने गजासुराची कातडी परिधान करावी.” शिवाने गजासुराच्या मागण्या स्वीकारल्या आणि गजासुराला मुक्त केले. यानुसार शिवाच्या काही रूपांमध्ये त्याने गजचर्म परिधान केलेले असते. आणि वराच्या पहिल्या अटीचा पुढे गणेशजन्माशी संबंध दिसून येतो.
ह्या सर्व कथा गणेशाला त्याचे हत्तीचे किंवा गज मस्तक कसे मिळाले याबाबत भाष्य करतात. जरी आज गणेश जन्माची सुरुवातीला सांगितलेली कथा जनमानसात जास्त प्रसिध्द असली तरीही या इतर कथा प्रामुख्याने, गणेशाच्या विशेष वैशिष्ट्याचा उगम आणि त्याचे विविध पैलू अधोरेखित करतात.