आरे मराठी समाजाविषयी काही माहिती आपण गेल्या भागात घेतली. आज त्यांचे समृद्ध सांस्कृतिक-साहित्यिक विश्व आणि त्यांच्या भाषेची वैशिष्ट्ये यांची आपण ओळख करून घेऊया.
‘मऱ्हाट देसाच्या पुरान्या कथा’
आरे-गोंधळी हे या समाजाचे कथाकरी प्रसिद्ध आहेत. वाल्मिकी-व्यास परंपरेतल्या रामायण-महाभारतातल्या कथांसोबतच लोकपरंपरेतून आलेल्या कथासुद्धा हे गोंधळी सांगतात. या लोक-परंपरेतल्या कथांना ते ‘मऱ्हाट देसाच्या पुरान्या कथा’ म्हणतात.
कथा 1
कथा 2
आरे मराठी लोकगीते
गोंधळ्यांच्या या कथांबरोबरच स्त्रियांमध्ये प्रचलित असलेल्या ओव्या, नागपंचमीची गाणी, पाळणागीते, ढवळगीते, विवाह समारंभाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे वर्णन करणारी गाणी इ. रचना आरे भाषेचा समृद्ध ठेवा आहेत.
1 लेकीच्या बोळवणीचे गीत
2 नवसाचे गीत
3 नागपंचमीचे गीत
महाराष्ट्रातील गावांमध्ये उत्साहाने साजरा होणारा नागपंचमीचा सण आरे समाजातही उत्साहात साजरा केला जातो.
देवताविषयक गाण्यांचं प्रमाण मात्र आरे-लोकगीतांमध्ये त्यामानाने कमी असल्याची गोष्ट श्रीधर कुलकर्णींनी आपल्या पुस्तकात नोंदविली आहे. तुळजा भवानी ही अरे समाजाची प्रधान देवता आहे. देवीची आरती आणि आवाहन गीत प्रसिद्ध आहे. वेमलवाडा येथे राजराजेश्वराचे देऊळ आहे. त्या राजन्नाच्या स्तुतीपर लिहिलेली स्फुटगीते लोकांच्या मुखी असतात. राजन्नाच्या पाठोपाठ कोत्ताकोंडा येथील विरन्ना, पोचम्मा ही ग्रामदेवता आणि वीर हनुमान या समाजात प्रसिद्ध आहेत.
आरे समाज हा प्रामुख्याने कोरडवाहू शेती करणार समाज आहे. त्यामुळे मृग नक्षत्राच्या पावसावर त्यांचे आयुष्य अवलंबून असते. विंचवाच्या आकाराचे मृग नक्षत्र. त्यामुळे सवाष्णी फेर धरून जे ‘घट घडायचं गीत’ गातात त्यात विंचवाचं प्रतीक वापरलेलं दिसतं.
आरे मराठीचे व्याकरण
काही वाक्यरचनांच्या उदाहरणावरून आरे मराठी भाषेचे स्वरूप आपल्या लक्षात येऊ शकते. प्रमाण मराठीपेक्षा ही रचना वेगळी असली तरी द्रविड-भाषांच्या संपर्कात असलेल्या महाराष्ट्रातल्या मराठीचा तसेच जुन्या मराठीचा बाज या बोलीतही दिसून येतो.
मियां जातं (मी जातो) मियां जाती (मी जाते)
तेन जातं (तो जातो) तिनं जाती (ती जाते)
मियां कामु केला (मी काम केले – कर्ता पुल्लिंगी)
मियां कामु केली (मी काम केले – कर्ता स्त्रिलिंगी)
वावरू लांगारल्यावरे पाऊसू पल्डा (वावर नांगरल्यावर पाऊस पडला)
नागोजी तुरीचं खल्लं केला (नागोजीने तुरीचे खळे केले)
** लेखात वापरलेल्या सर्व उदाहरणांचे तसेच लोककथा-लोकगीतांच्या नमुन्यांचे श्रेय श्रीधर कुळकर्णी लिखित ‘तेलंगणातील आरे-मराठा समाज’ या पुस्तकाचे आहे.
समारोप
या भाषेच्या गमती-जमती बघत असताना एक गोष्ट मात्र विसरता कामा नये. ती म्हणजे आंध्र-तेलंगणात असलेले सर्व मराठी भाषक आरे-मराठी नाहीत. त्याचप्रमाणे आरे-मराठी समाज वसलेल्या भौगोलिक क्षेत्रातच असणारेही सर्व मराठी भाषा आरे समाजाचे नाहीत. उत्तर कर्नाटकातील सरहद्दीवरील काही कुटुंबे निजामकाळात वरंगल प्रदेशात स्थायिक झाली. मातृभाषा असलेल्या मराठी सोबतच कन्नड, तेलुगू, हिंदी आणि शिक्षणाचे-राजकारणाचे माध्यम असलेले उर्दू या भाषांचा प्रभाव त्यांच्या भाषेवर दिसून येतो. याखेरीज जोशीवाड्यातील मराठे, विजापूर मराठे या जमातीही याच प्रदेशात आढळून येतात. त्या-त्या समाजानुसार यांच्या सर्वांच्या बोलीत सहज लक्षात यावा इतका भेद आढळतो.