‘अरुण गवळी’ ! ‘नाम तो सुना होगा सबने…’ अशाच काही पद्धतीनं सगळेचजण अरुण गवळीला ओळखतात. खासकरुन वयाची पन्नाशी पार केलेले मुंबईकर. नंतरच्या पिढीसाठी मात्र त्याच्या आठवणीच राहिल्यात, कारण गेली 16 वर्ष अरुण गवळी हा जेलमध्ये आहे. आणि त्याचं साम्राज्यही पूर्वीसारखं राहिलं नाही. एक मिल कामगार ते शिवसेनेला ऐन उमेदीच्या काळात टक्कर देणारा राजकारणी, असा प्रवास केलेला अरुण गवळी जेलमध्ये कसा पोहोचला? हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
बालपण
अरुण गवळी म्हणजेच अरुण गुलाब अहिर. याचा जन्म हा 1955 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातला. तो लहान असतानाच त्याचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. गुलाब अहिर तेव्हा कॉटन मिलमध्ये काम करायचे. अरुणला चार भावंडं होती. दोन भाऊ आणि दोन बहिणी. गावाकडून मुंबईत आल्यामुळं गुलाब गवळींना त्यांच्या मुलांकडून शिकून मोठं होण्याच्या अपेक्षा होत्या. अरुण गवळीनं 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं. नंतर काही त्याचं आणि शिक्षणाचं सूत जुळलं नाही. काही कारणानं त्याच्या वडिलांना मीलमधली नोकरी सोडावी लागली. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. आणि नाईलाजानं त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागलं. पण तरीही 70 च्या दशकात 10 वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे मोठी मजल समजली जायची.
गुन्हेगारांची संगत आणि गुन्हेगारीत प्रवेश
पैसे कमावण्याच्या हेतुनं अरुण गवळी महालक्ष्मी इथल्या शक्ती मीलमध्ये काम करु लागला. 1977 च्या दरम्यान त्यानं विक्रोळीच्या क्रॉम्पटन ग्रेव Crompton Greaves मध्ये काम करायला सुरुवात केली. आणि इथंच त्याची ओळख झाली ती सदाशिव पावले म्हणजेच सदा मामा याच्याशी. इथंच त्याला त्याच्या शाळेतला मित्र रमा नाईकही भेटला. रमा आणि अरुण भायखळ्याच्या एकाच महानगरपलिका शाळेत शिकत होते. रमा नाईक अरुण गवळीचा सिनीयर होता. रमा नाईकला त्याच्य़ा रागिट आणि सतत भांडण करण्याच्या स्वभावमुळं सहावीत असतानाच शाळा सोडून द्यावी लागली. पण अरुण गवळी आणि त्याची मैत्री कायम होती. सदा पावलेच्या सहवासात हळूहळू अरुण गवळी आणि रमा नाईक चुकीच्या गोष्टी करु लागले. हळूहळू त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत गेली.
BRA गँग
1980 च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्ड कात टाकत होतं. एकीकडे करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलीयार गुन्हेगारीतून निवृत्ती घेत होते, तर दुसरीकडे दाऊद इब्राहिमसारखा क्रुरकर्मा मुंबईत त्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. अरुण गवळी आणि रमा नाईक हे भायखळा, सातरस्ता परिसरात रहायचे. त्यांना तिथं त्यांचं साम्राज्य तयार करायचं होतं. पण भायखळ्यात आधीच भायखळा कंपनी नावाची गँग आपलं बस्तान बसवून होती. रमा नाईक आणि भायखळा कंपनीत कट्टर दुश्मनी होती. त्यांना टक्कर देणं हे एकट्याचं काम नाही हे त्याला माहीत होतं. त्यानं बाबू रेशिम आणि अरुण गवळीला सोबत घेऊन BRA गँग तयार केली. BRA म्हणजेच Babu Reshim, Rama Naik and Arun Gawli तिघांच्या नावाचे इनिशीअल्स घेऊन त्यांनी ही गँग तयार केली. आणि सगळ्यात आधी भायखळा गँगला संपवून आपले साम्राज्य उभारायला सुरुवात केली.
दाऊदशी मैत्री ते दुश्मनी
जवळपास 1988 पर्यंत रमा नाईक आणि अरुण गवळी दाऊदला त्यांच्या मुंबईतल्या धंद्यात मदत करत होते. त्यांनी दाऊदचे मुंबईतले जवळपास सगळेच दुश्मन संपवले. पण एका जमिनीच्या वादातून रमा नाईकनं दाऊदला मदत करणं बंद केलं. आणि त्यानंतर दाऊदनं रमा नाईकचं एन्काऊंटर करवलं. रमा नाईक हा अरुण गवळीचा फक्त पार्टनर नव्हता, तर तो त्याचा लहानपणचा मित्र, आणि त्याचा मेंटॉर होता. त्यामुळं त्याच्या एन्काऊंटरनंतर अरुण गवळीनं मुंबईत दाऊदशी खुलेआम दुश्मनी सुरु केली. एक एक करत त्याच्या टोळीच्या माणसांना संपवायला सुरुवात केली. 1992 मध्ये अरुण गवळीनं दाऊदची बहिण हसीना पारकरचा नवरा इस्माईल पारकरला मारल्यानंतर दाऊदनं अरुण गवळीचा भाऊ किशोर म्हणजेच पप्पा गवळी याला संपवलं. या दुश्मनीत मुंबईत रक्ताचे पाट वहात होते. दोन्ही गँगचे महत्वाचे शिलेदार या गँगवॉरमध्ये मारले गेले. अरुण गवळीच्या जवळचे आणि विश्वासातले साथिदार दाऊदनं संपवले. अरुण गवळी एकटा पडला.
रिअल इस्टेटमध्ये प्रवेश
मुंबई अंडरवर्ल्डच्या कुणाही गँगस्टरला जमलं नाही त्या श्रेत्रात अरुण गवळीनं आपला जम बसवला. कारण या श्रेत्रात टिकायचं असेल तर मसल आणि मनी पॉवर किती महत्वाची आहे हे त्यानं ओळखलं होतं. आणि त्यासाठी मटक्याबरोबरच रिअल इस्टेट त्याला खुणावत होतं. रिअल इस्टेटच्या व्यवसायातून त्यानं बक्कळ पैसा मिळवला. अनेक वर्ष अडकलेल्या प्रॉपर्टीज त्यानं त्याच्या मसटचल पॉवरवर मिळवून दिल्या आणि पैसा कमवला.
शिवसेनेचा पाठिंबा
80 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबई पोलिस अरुण गवळी आणि त्याच्या साथिदारांना पकडत किंवा त्यांच्या माणसांचं एन्काऊंटर करत होते. त्यावेळी शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे दैनिक सामनामधून या सगळ्यांचा बचाव करत. त्यांना ‘आमची मुलं’ असं संबोधून, पोलिसांनी त्यांना पकडण्यापेक्षा खऱ्या आतंकवाद्यांना पकडावं असं चॅलेन्ज करत. त्यानंतर अरुण गवळीला शिवसेनेचा पाठींबा मिळत गेला. त्याला आता एक आश्रयस्थान मिळाल्यासारखं झालं होतं. पण लवकरच त्याचा हा भ्रम दूर झाला. एका केसमध्ये पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली. तेव्हा शिवसेना आपल्याला मदत करेल, आपल्या पाठीशी उभी राहील असं त्याला वाटत होतं. पण शिवसेनेनं त्याला कोणतीही मदत केली नाही. अरुण गवळीला कळलं की आता आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागणार आहे. त्यानंतर जेलमधून बाहेर पडल्यावर त्यानं शिवसेनेला टक्कर देण्यासाठी अखिल भारतीय सेनेची स्थापना केली. अखिल भारतीय सेनेनं मुंबई महानगरपालिकेत चांगलं यश मिळवायला सुरुवात केली. एबीसी चे अनेक नगरसेवक महानगरपालिकेत निवडून गेले.
मुंबईचा डॅडी
गुन्हेगारीत कमावलेला पैसा त्यानं आता राजकारणात वापरायला सुरुवात केली. लोकांच्या समस्या सोडवायला लुरुवात केली. दगडी चाळीत त्यानं आपला दरबार भरवायला सुरुवात केली. गँगस्टर ते डॅडी या प्रवासाची सुरुवात झाली. मार्केटमध्ये एखाद्या वस्तूचे भाव आकाशाला भिडले की, अरुण गवळी त्या वस्तूचे किंवा पदार्थाची मोठ्या प्रमाणात खरेदी करुन लोकांना कमी किंमतीत विकायचा. या गोष्टींमुळं अरुण गवळीची जनमानसातली प्रतिमा बदलायला लागली. आणि अरुण गवळी हा कोणताही भाई न राहता लोकांचा ‘डॅडी’ झाला.
आमदार आणि अटक
2004 मध्ये अरुण गवळीनं स्वत :च विधानसभा निवडणूक लढायचं ठरवलं. 2004 च्या निवडणुकीत अखिल भारतीय सेनेनं 100 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले. पण त्यातून फक्त अरुण गवळीलाच विजय मिळाला. मुंबईच्या चिंचपोकळी मतदारसंघातून अरुण गवळी आमदार झाला. आमदार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच त्याच्यावर काही केसेस दाखल झाल्या. त्याला अटकही झाली, आणि जामिनही मिळाला.
पोलिसांना भीती
अरुण गवळी आमदार झाल्यानंतर मात्र मुंबई पोलिसांना वेगळीच भीती सतावत होती. याच पद्धतीनं जर अरुण गवळीला राजकीय यश मिळत गेलं, तर एक दिवस तो मंत्रीही होईल आणि त्य़ाला आपल्याला सॅल्यूट ठोकावा लागेल, अशी भीती मुंबई पोलिसांत पसरली होती.
जन्मठेपेची शिक्षा
मार्च 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर य़ांचा त्यांच्या घाटकोपरमधल्या राहत्या घरी खून करण्यात आला. या खुनाचा आरोप अरुण गवळी आणि इतर 11 आरोपींवर लावण्यात आला. मे 2008 मध्ये या खून प्रकरणात अरुण गवळीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर MCOCA म्हणजेच संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत खटला भरला. MCOCA कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2008 पासून आजपर्यंत अरुण गवळी जेलमध्ये आहे. 69 वर्ष वय असल्यानं आणि जेलमधली चांगली वागणूक लक्षात घेऊन अरुण गवळीची शिक्षा कमी करावी, अशी मागणी त्याचे वकील सध्या करत आहेत.