शेतजमीन मुळातच मर्यादित आहे आणि दरवर्षी कमीकमी होत जाते आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता जेवढी वाढवता येईल, तेवढी शेती किफायतशीर होणार, हे गणित समजून घेणे आवश्यक आहे.
पिकांची उच्च उत्पादकता असलेले इतर देश आणि त्यांची प्रत्येक महत्त्वाच्या पिकांमधील उच्च उत्पादकता किती आहे, यांच्याशी तुलना केल्यास भारतातील पिकांची उत्पादकता फारच कमी असल्याचे आढळून येते. इतकचं नव्हे तर भारताची उत्पादकता जगाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षाही कमी आहे. त्यामुळे साहजिकच जगाच्या तुलनेत भारतीय कृषी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी पडते आहे. हे सोबत दिलेल्या आलेखावरून स्पष्ट होते. या आलेखातून असं दिसते की, भारतात भात पिकाची उत्पादकता जगातील उच्च उत्पादकता असलेल्या अमेरिका आणि चीन या देशांपेक्षा जवळपास एक तृतीयांश आहे. आणि जागतिक सरासरीच्या जवळपास अर्धी आहे.
भारतात भरडधान्य पिकांची उत्पादकता ही अमेरिका आणि चीनच्या तुलनेत एक चतुर्थांशपेक्षाही कमी असून जागतिक सरासरीच्या अर्ध्याहूनही कमी आहे. गळीत धान्ये किंवा तेलबियांच्या बाबतीत भारताची उत्पादकता त्या मानाने बरी आहे. याचं प्रमाण अमेरिकेपेक्षा साधारण एक तृतीयांश आणि चीनच्या अर्धी आहे. या पिकांच्या तुलनेत गहू पिकात मात्र भारताची उत्पादकता त्या मानाने चांगली आहे. गहू उत्पादनात भारताची उत्पादकता ही अमेरिका आणि जागतिक सरासरीइतकीच तर चीनच्या तुलनेत दोन तृतीयांश आहे.
अशा परिस्थितीत उत्पादकता वाढवायची कशी, हे मोठं आव्हान आहे. पारंपरिक संशोधन पद्धतींनी बियाण्याची गुणवत्ता वाढवण्याचे उपायांवर संशोधन केलं आहे. या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की, उच्च दर्जाची बियाणी निर्माण करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. आणि बियाणे निर्मितीमध्ये या जैवतंत्रज्ञानाचा वापरही वाढवावा लागणार आहे. तसेच पिकांचे पोषण योग्य प्रकारे होण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर होणे आवश्यक आहे.
उत्पादकतेच्या बाबतीत भारताची कामगिरी मुख्य अन्नधान्य पिकांच्या बाबतीत समाधानकारक नाही. मात्र, द्राक्ष हे एकमेव पीक असं आहे की ज्यात भारताची उत्पादकता जगात सर्वात जास्त म्हणजेच सरासरी हेक्टरी 30 टनांपर्यंत आहे. त्यामुळे जर शास्त्रीय पद्धतीने पिकांचे नियोजन केलं तर भारतात उच्च उत्पादकता मिळवणे शक्य आहे.
पिकांवर येणारे जैविक आणि अजैविक ताण –
किडी, रोग, तण असे जैविक घटक आणि दुष्काळ, जमिनीतील व पाण्यातील क्षार अशा अजैविक घटकांचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर प्रभाव होतो. या सर्व घटकांमुळे उत्पादनातील जवळपास एक तृतीयांशपेक्षा जास्त भाग नष्ट होतो. हे टाळायचं असेल तर पीक संरक्षण करणाऱ्या कृषी निविष्ठाचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणं आवश्यक आहे. तसेच अजैविक ताणांना तोंड देऊनही उच्च उत्पादकता देतील अशी बियाणी जैवतंत्रज्ञान वापरुन तयार करावी लागतील.
अन्नधान्यामधील पोषकतेची कमतरता –
एका शेतात सातत्याने एकाच प्रकारची पिकं घेणे आणि सततच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता कमी होत जाते. त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होत जाते, किंवा ते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
तसेच उत्पादन जरी योग्य प्रमाणात आले, तरी त्या अन्नधान्याचे पोषणमूल्य कमी होते. याला कारण आहे, शेतजमिनीतून जी मूलद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी वापरली जातात त्यांचं पुरेसं पुनर्भरण झालेलं नसतं. ते योग्य प्रमाणात व्हायचे असेल तर मातीमधील पोषकद्रव्यांचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं आणि सेंद्रिय व रासायनिक खतांचे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
जागतिक हवामान बदलांचा परिणाम –
जागतिक पातळीवर घडणाऱ्या हवामानातील बदलांचा मोठा परिणाम शेती उत्पादनावर होतो. अवेळी / अवकाळी पाऊस, पूर, गारा, सोसाट्याचा वारा, वादळे, चक्री वादळे, उच्च आणि नीचांकी तापमान इत्यादीमुळे पिकांचे वाढीचे चक्र बिघडत चालले आहे. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत पिकांच्या वाढीत अनेक समस्या निर्माण होतात. त्यांना तोंड देण्यासाठी कृषी निविष्ठांचा योग्य वापर करणे हा एक मार्ग दिसतो.
शाश्वत शेती पद्धतींचा वापर –
शेतीसाठी वापरली जाणारी सर्वच नैसर्गिक संसाधने दीर्घ काळ टिकून रहावीत यासाठी त्यांचा वापर शास्त्रीय पद्धतीने केला पाहिजे. यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा समावेश होतो. मातीची सुपीकता, तिच्यातील सेंद्रिय कर्ब आणि जैविक घटक टिकवून ठेवणे, पाण्याची शुद्धता राखणे या महत्त्वाच्या बाबींसाठी कृषी निविष्ठांचा वापर करता येईल.
कृषी निविष्ठांचे तिहेरी योगदान
शेती व्यवसाय अधिकाधिक चांगल्या प्रकारे करता यावेत यासाठी कृषी निविष्ठांचे योगदान तिहेरी प्रकारचे आहे. पहिले सर्वात महत्त्वाचे म्हणजे – उत्पादकता सुधारणे, दुसरे – शेती व्यवसायाचा किफायतशीरपणा वाढवणे आणि तिसरे – शाश्वत पद्धतीने अन्न सुरक्षा प्रदान करणे.
कृषी निविष्ठा उद्योगांची व्याप्ती
कृषी निविष्ठा उद्योगांमध्ये मुख्यतः चार प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो. यामध्ये शेतीसाठी लागणारे बी-बियाणे पुरवणारे उद्योग, सेंद्रिय व रासायनिक खत पुरवणारे उद्योग, कीड रोग व तण यापासून पीक-संरक्षण करण्यासाठी लागणारी सेंद्रिय व रासायनिक द्रव्ये पुरवणारे उद्योग आणि शेतीमध्ये सर्व प्रकारची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रे व अवजारे पुरवणारे उद्योग यांचा समावेश होतो. या चारही प्रकारच्या उद्योगांची व्याप्ती विस्तृत आहे आणि त्यांची वाढसुद्धा सातत्याने होत आहे.
भारतातील बी-बियाणे उद्योगांची सध्याची बाजारपेठ सुमारे 28 हजार कोटी रुपये आहे. येत्या 3 ते 5 वर्षांमध्ये ती वाढून साधारण 35 हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतातील पीक-संरक्षण उद्योगांची सध्याची बाजारपेठ सुमारे 75 हजार कोटी रुपये आहे. येत्या तीन ते चार वर्षांमध्ये ती वाढून 1 लाख कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतातील खत उद्योगांची सध्याची बाजारपेठ सुमारे 94 हजार कोटी रुपये आहे. येत्या 5 ते 7 वर्षांमध्ये वाढून ती सुमारे 1 लाख 34 हजार कोटी इतकी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतातील शेती यंत्रे व अवजारे उद्योगांची वार्षिक उलाढाल सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपये आहे. येत्या 5 वर्षांमध्ये वाढून ती सुमारे 2 लाख कोटींचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवली आहे. अशा प्रकारे सातत्याने आणि वेगाने वाढणाऱ्या या उद्योगांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या उद्योगांची वैशिष्ट्ये पुढील भागात जाणून घेऊ.