सिव्हिक सेन्सची ऐशीतैशी

भारतीयांच्या सिव्हिक सेन्सचे बारा वाजलेत. नवे महामार्ग आणि फ्लायओव्हर होतायत. पण लोक तेच आहेत. त्यांची सार्वजनिक वर्तणूक तशीच बेशिस्तीची आहे. सामान्यांच्या मनस्तापाला कारणीभूत होणाऱ्यांचं काय करायचं?
[gspeech type=button]

तंत्रज्ञान विकसित होत आहे. पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एक वरदान वाटतं. कारण आसपासच्या वाहतुकीची बोंब आहे. आपल्याच कर्माने. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तीन तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर लक्षात आलं की, जर पारंपरिक गिअरवाली गाडी चालवत असतो तर कंबरेचा काटा मोडला असता आणि डाव्या हाताला तेलमालिश करावं लागलं असतं. मनस्तापाचा हिशेब आपण करतच नाही. ती परदेशातली चंगळ.

या वाहतूक कोंडीचं कारण मोठं विचित्र होतं. विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नवनिर्वाचित मंत्री आणि सत्तापक्षातले सन्माननीय नेते विमानाने मुंबईत लॅण्ड होणार होते. त्यांच्या स्वागताला कार्यकर्ते, कंत्राटदार, व्यापारी, सान-थोर उद्योजक, एजंट, डीलर, सीए, पीए, हौशे, नवशे आणि अर्थातच गवशे मोठ्या प्रमाणात आपली वाहनं घेऊन विमानतळानजीक गडावरून पायउतार झाले होते. या साऱ्यांच्या आणि त्यांच्या बांडगुळांच्या असंख्य गाड्या या विमानतळावरच्या ‘कार’स्थानावर पार्क नव्हत्या. कारण तिथे तासाला अडीचशे रुपये भरावे लागतात. या सत्तेच्या परिघातल्यांना पैशांची कमतरता नसली तरी नियमांचं अर्थातच वावडं असतं. सरकारी वा पालिका सेवेचे पैसे भरणं त्यांना अप्रतिष्ठेचं वाटतं. त्यांची प्रतिष्ठा निम्न स्तरावरील सरकारी कर्मचाऱ्यांना दम दिल्याने अनेक पटींनी वाढते. त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने सत्ताकांक्षींच्या गाड्या दुहेरी आणि तिहेरी रांगेने महामार्गावर लागल्याने रविवारच्या दिवशी सुटीच्या मूडमध्ये बाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मुंगीच्या गतीने मार्गक्रमणा करावी लागली. त्यात अस्मादिकही आलेच.

एरव्ही वीकडेजमध्ये वाहतुकीत अडकणं लोकांना सवयीचं झालंय. पण सुटीच्या दिवशी मुंबईच्या घाई नसलेल्या शांघाई रस्त्यांवरून जरा गाडी चालवावं म्हटलं तर वाहतूक खोळंबा करणारे उपटसुंभ उपटतातच. नेहमीच्या अंदाजित वाहतूक कोंडीचा मानसिक त्रास होत नाही. पण आकस्मिक आणि केवळ नियमबाह्य सार्वजनिक वर्तवणुकीमुळे वाहतुकीची कोंडी मनस्ताप देणारी असते. आणि हा मनस्ताप हल्ली वारंवार होतो. कारण मेट्रोची कामं सुरू आहेत, काही ठिकाणी एमएमआरडीएने बॅरिकेड लावलेत काही ठिकाणी पालिकेने. हे सारं भवितव्यातल्या सुविधांसाठी त्यामुळे आपण कळ सोसावी अशी सरकारची अपेक्षा. मागच्या सरकारने खड्ड्यांची चाळण भरण्यासाठी असं पॅचवर्क केलं की रस्त्यावर व्यस्त खड्डे उभे राहिले. म्हणजे रस्त्यावर खड्ड्यांचे एम्बॉसिंग केले गेले. हे पॅचवर्क आता मोटारसायकलवाल्यांसाठी स्पीडब्रेकरसारखे दणके देतात. जर सर्व्हे केला तर मागच्या वर्षीपासून मणक्यांची आणि माकडहाडांची ऑपरेशन्स वाढलेली दिसतील.

पूर्वी साध्या छोट्या गिअरवाल्या गाड्या चालवताना मुंबईच्या बाहेर गेलं की, ड्रायव्हिंगचा आनंद मनमुराद मिळायचा. रस्ते छोटे असले तरी गर्दी तुरळक असायची. आता वाहनं प्रचंड संख्येने वाढलीत. तिचाकी आणि दुचाकींची संख्या तर भारताच्या मानवी लोकसंख्येशी स्पर्धा करते आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी कोंकणात किंवा 300-400 कि.मी. अंतरावरच्या ठिकाणी जायला सात ते आठ तास लागायचे. आज रस्ते रुंद झालेत. वाहनं अत्याधुनिक झालीत. पण एवढं अंतर कापायला आज आठ ते नऊ तास लागतात. आणि त्यांचं एकमेव कारण आहे की आपल्या लोकांकडे सिव्हिक सेन्स नाही.

आपल्याकडे नवनवे महामार्ग होतायत. पण महामार्गांवरची एक सार्वजनिक वर्तवणूक असते, महामार्गांची एक नागरी समज व उमज असते. ती नव्या वाहनचालकांकडे दुर्दैवाने नाही. त्यामुळे केवळ स्वतःचं वाहन पुढे दामटणे एवढीच समज नव्या वाहनचालकांकडे दिसून येते. वाहतूक कोंडीत एका मागोमाग रांगेने उभं राहून पेशन्स दाखवणं तर अनेक वाहनचालकांना जमतच नाही.  त्यामुळे विरुद्ध बाजूने वाहन पुढे काढण्याचा प्रयोग आपल्या प्रत्येक रस्त्यावर दिवसांतून अनेकवेळा हमखास रंगतो. समोरच्या बाजूनेही तसेच उत्साही चालक पुढे आलेले असतात. मग एकाच महामार्गावर समोरासमोर वाहन येऊन उभी ठाकतात. युद्धासाठी पूर्वी जशी सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकायची तशीच. त्यामुळे युद्धप्रसंग उभा राहतोच. मग कुठूनतरी वाहतूक पोलिस धावत येतो आणि तो शिव्या घालत ही वाहतूक कोंडी पुढील काही तासांत सोडवायचा प्रयत्न करतो.

मुंबई-गोवा रस्त्यावर माणगांव या छोट्या शहरात काहीही कारण नसताना 20 मिनिटे जातात. दुकानांचं रस्त्यावर अतिक्रमण, मग दुचाकी वाहनं कशीही आडवी-तिडवी पार्क केलेली, त्याच्या बाहेर चारचाकी गाड्यांचे दुहेरी रांगेत पार्किंग, अशावेळी या महामार्गावर कशीबशी आठ फुटांची जागा राहते. त्यामुळे बॉटलनेक होऊन अनावश्यक वेळ आणि ड्रायव्हिंगचं टेम्परामेण्ट निघून जातं.

हल्ली उत्सवी धार्मिक कर्मकांडांचा नव्याने जल्लोष सुरू झाला आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात पूर्वी समन्वय समिती काम करायची. त्यामुळे गणपतींच्या मिरवणुकांचं नियोजन केलं जायचं. आता समन्वय समिती काम करते की नाही ते कळतच नाही. आणि कोणतंही मंडळ कोणत्याही वेळी कितीही काळ मिरवणूक काढतं. डोंबिवली पूर्वेच्या एका रस्त्यावर ऐन गणेशोत्सवात केवळ गणपती आणण्याच्या वेळी इतकी वाहतूक कोंडी झाली की तीन तास या कोंडीतून हलताच आलं नाही. दुतर्फा पार्किंग असल्यामुळे अगदी दुचाकीवालेही अडकले होते. या सगळ्या कोंडीत वाहतूक पोलिस यंत्रणा कुठे दिसलीच नाही. कोकणात गणेशोत्सवात जाण्यासाठी बसेस अशाच उभ्या केलेल्या. त्या रात्री 10 शिवाय सुटत नसतात. या बसेसपर्यंतही लोकांना पोहचता येत नव्हतं. उत्सवासाठीच्याच तयारीसाठी अनेक लोक बाहेर पडलेले ते नाहक अडकून पडलेले. मात्र फेटे घातलेल्या युवकांचा उत्साह एवढा ओसंडून वाहत होता की, जग थांबलं तरी चालेल पण आमची मिरवणूक जंगी झालीच पाहिजे, अशीच त्यांची भावना दिसत होती. पूर्वी विसर्जनाचीच मिरवणूक असायची. हल्ली गणपती आणतानाही मोठी मिरवणूक काढली जाते. धर्मशास्त्राप्रमाणे त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा झालेली नसते. पण लोकांच्या उत्साहाला मर्यादा कोण घालणार आणि धार्मिक बाबीत काही सकारात्मक सूचना करायला जावं तर स्वतःचा अपमान ओढवून घेण्यासारखं असतं. त्यामुळे लोक निमूट बसून सहन करतात. काही ठिकाणी शुक्रवारी नमाज पढण्याचा कार्यक्रम रस्त्यावर सुरू होतो. अचानकच अर्ध्याहून रस्ता काबीज केला जातो. या धार्मिक कर्मकांडाविषयी सर्वसामान्य माणूस काही बोलत नाही. पण धार्मिक कर्मकांड सुरू असताना वाहतूक वळवणारे जे हौशी कार्यकर्ते असतात. त्यांचा अॅटिट्यूड सर्वसामान्यांच्या डोक्यात जातो. आधीच ते वाईट पद्धतीने हातवारे करत असतात. आधी स्वतःच वाहतूक कोंडी करायची आणि त्यांच्याच कुणा प्रमुखाची गाडी आली की खोळंबलेल्या वाहनांना चला चला लवकर निघा असाही आविर्भाव करून दाखवायचा. त्यांची सार्वजनिक वर्तणूक कोणत्याही शिवीगाळीपेक्षा कमी नसते.

यंदा डीजेच्या आवाजामुळे झालेल्या नुकसानाबद्दल निदान व्हॉट्सअपवर तरी जनजागृती झाली. पूर्वी बैलाच्या कातड्याचे ढोल-ताशे असायचे. त्याची तन्यता आणि कंप हा नैसर्गिक असायचा. त्यामुळे या तालवाद्यांचा कानाला त्रास व्हायचा नाही. आता कारागीरांना बैलाचं कातडं मिळत नाही. मात्र फायबरची तालवाद्य प्रचलित झालीत. त्याची तन्यता आणि कंपक्षमता कित्येक पटींनी जास्त आहे. ते लवकर फाटत नाहीत, त्यामुळे वादक अधिक क्षमतेने ही तालवाद्यं वाजवू शकतात. त्यामुळे उत्सवात ध्वनिप्रदूषणाची 120 डेसिबलची कर्णकर्कश मर्यादा ओलांडल्याचे आपल्याला दिसून येते. ध्वनिप्रदूषणाची मर्यादा हा वेगळा विषय पण ध्वनिक्षेपकाची वेळ रात्री 10 वाजता ठरवून दिलेली आहे. पण 10 म्हणजे फारच लवकर असं तरुणाईला वाटत असतं. त्यामुळे कुणी तक्रार करत नाही तोपर्यंत या दहाचे बारा वाजून जातात तरी आवाज थांबत नसतो.

आपल्या समाजाच्या सार्वजनिक वर्तणुकीवर खूपच काम करावं लागणार आहे. पण आपला भारतीय समाज स्वयंप्रेरणेने वागत नसतो. त्याला दंडुका घेऊनच मागे लागावं लागतं. मात्र आता दंडुका घेऊन केवळ सिव्हिक सेन्सच्या लोकजागृतीसाठी शहर पोलिस काम करत नाहीत. आपला वाहतूक पोलिस सिग्नलपासून पन्नास फुटांच्या मर्यादेबाहेर दबा धरून बसलेला असतो. तो सार्वजनिक वर्तणूक चुकीची कशी होईल ते पाहतो, लोकांनी नियम तोडावेत आणि मग आपण दंड वसूल करू अशी प्रशासकीय धारणा झाली आहे. दंडात्मक कारवाईचा बडगा दाखवून इप्सित साध्य करणं हीच प्रशासकीय नीती होणार असेल तर कधी ना कधी त्याला प्रतिक्रिया येऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ