मराठी पत्रकार दिनी लिहिताना पत्रकारितेची काळजी वाहण्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणाची काळजी वाहण्याची पाळी येईल असं वाटलं नव्हतं. बीड-परभणीच्या राजकारणाची दिशा आणि दशा समजून घेताना सर्वसामान्यच नाही तर बुद्धिवादी आणि पत्रकारही हादरून गेलेत.
हे असं महाराष्ट्रात घडू शकत नाही, अशी स्वतःलाच समजूत घालण्याची वेळ या घटनाक्रमाने आणली. बातमीदारीसाठी काहीतरी मसाला लागतो, झुंज लागते…. विसंवादाच्या ताकाला गॉसिपची घुसळण देऊन बातमीचं लोणीही काढलं जातं. पण असा पडद्यांमागच्या कॉन्स्पिरसींचा काळ येईल आणि पत्रकारितेला फक्त दिलेल्या बातम्यांना फोडणी देण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.
परभणीचे नेते भाषणात ‘जगात जर्मनी आणि देशात परभणी’ असं यमक जुळवतात. गेल्या काही वर्षात ‘बीडचं बिहार’ म्हणायला सुरुवात झाली होती. पण बिहारनेही मान खाली घालावी अशी धश्चोट राजकीय व सामाजिक बधीरता मराठवाड्यात यंदा बघायला मिळाली. यंदा हा शब्द फक्त कालसापेक्ष आहे. कदाचित हे सगळं फार आधीपासूनच असेल. पण हे सगळं इतकं ऑब्विअस होण्याची ही सुरुवात यंदा झाली असावी.
पूर्वी राजकारणी राजकारणी असायचा. त्याला पैसा लागला तर गावातला धनाढ्य लक्ष्मीपुत्र द्यायचा. त्या धनिकाला त्याचा पूंजीवाद जपायला राजकारणी लागायचा. ती गृहितकं लोकांनी स्वीकारली होती. राजकारण्याला कधीमधी राजकीय विरोधकांना धडा शिकवायला किंवा असामाजिक तत्वांशी पंगा घ्यायला ताकद लागली तर गावातला दांडगा पैलवान मदतीला असायचा. पूर्वी धनिक हा धनदांडगा नसायचा आणि पैलवानाचाही गावगुंड झालेला नसायचा. राजकारणी निबर असले तरी कंबरेचं सोडून डोक्याला बांधू लागलेले नव्हते.
राजकारणी, धनिक आणि दांडगाई जरी हातात हात घालून चालत असली तरी त्यांच्यात स्पष्ट सीमारेषा होती. ही सीमारेषा पुसट होत चाललीय. गावचा पेढीवाला मारवाडी असो नाहीतर शहरातला कावेबाज उद्योजक असो, धनिकाला आता राजकारण खुणावायला लागलंय. आपल्याच पैशावर तर हे चाललंय, मग सत्तेची फळं आपणच का चाखू नये? असं त्याला वाटायला लागलं. दांडग्यांच्या बेटकुळ्या गुंडगिरीच्या पलिकडे जाऊन धनदांडग्या होऊ लागल्या. कारण विकासाच्या फळांसोबत जागोजागचे कचरासेठ माफिया फोफावू लागलेत.
कचरा-वाळू, राख-माती, पवन-पारा, इंधन-विंधन, रॉकेल-रखेल, इझम-इसम, सुबक-ठिबक, माध्यम धमन्या अशा सगळ्या ठिकाणी धनाची पेटी गवसू लागली. यात राजकीय पुढाऱ्याला खो देऊन धन-राजकीय-दांडगे पुढे आले. वक्तृत्वात निपुण आणि समाजसेवेची आवड असलेले फक्त टीव्हीचर्चांचे प्रवक्ते बनले… लबाडाच्या आवताणात सुख मानू लागले.
पूर्वी ग्रामीण भागात एखाद्या तालेवार कुटुंबातलं सामाजिक समीकरण सोपं असायचं. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात वाकबगार भाऊ राजकारणात जायचा. अभ्यासात हुशार तो शहरात जाऊन सरकारी नोकरी पटकवायचा. एखादा भाऊ धंदा आजमावयचा. वाचनाची आवड असलेला मास्तर नाहीतर पत्रकार बनायचा. रिकामटेकडा खुमखुमीवाला तालमीत घुमायचा. जो नेमस्तपणे कुळाचार पाळणारा भाऊ असायचा तो इमाने इतबारे शेती करत राहायचा.
शेती करणारा सोडला तर बाकी सगळे सुस्थितीत. राजकारण, धंदेवाला आणि तालमीतला तर गब्बर वाटेवर.
शहरी-ग्रामीण कुटुंबातल्या आकांक्षांची कहाणी बीड-परभणीच्या घटनाक्रमाने बदलली. पटकथा-संवाद अर्थात सोशल मीडियावरचं नॅरेटिव कोणाचंही असो. कथाबीज पायाखालची वाळू सरकवणारं आहे. राजकीय विचारप्रणाली, सामाजिक वारसा, संत-समाजधुरिणांच्या सभ्यतेची परंपरा, प्रादेशिक अस्मिता, मराठी मातीतल्या सहा झोनचा कसदार महाराष्ट्रधर्म वगैरे वगैरे… आता विसरून जाऊ या.
निवडणुका संपल्या तरी प्रचार संपला नाही अशी गत. प्रचारकी थाट आचारसंहितेपुरतेच राखून ठेवण्याचा खेळीमेळीचा कालखंड गेला. आता सगळेच कायम इलेक्शन मोडवर. ट्वेण्टीफोर बाय सेव्हन कुरघोडीचं राजकारण. 85 वर्षांच्या वयोवृद्धाने आता हत्यारं म्यान केलीत. 77 वर्षांचा समतास्वार असहमतीच्या राजकारणत अस्वस्थ. 25 वर्षांचा नवोदित सभागृहात कोट्या करून आरारारा लक्ष वेधून घेतो.
ना समर्थ विरोधक, ना सबळ मीडिया. लोकशाहीच नॉट रीचेबल झालीय. अशा वातावरणात मराठी पत्रकार दिनाचे शुभेच्छुक शोधायचे कुठे?