दिवाळीचा इतिहास हाच मुळी कित्येक युगातील आहे. म्हणजे प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण, 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत पोचले. नागरिकांनी त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ दिवे लावले, पक्वान्न केली आणि त्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं गेलं. म्हणून दीपावली म्हणजे दिव्यांची रांग हा सण साजरा करायला सुरुवात झाली. महर्षी वसिष्ठांच्या काळात गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसाची प्रथा सुरु झाली. कृष्णकाळात, कृष्णाने नरकासुराला मारले म्हणून तो दिवाळीचा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मी, चारित्र्यवान कर्तबगार घरात निवास करते म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. विष्णूच्या वामन अवतारातील काळात बली प्रतिपदा आली. भाऊबीजेच्या दिवशी मृत्युदेवता यम, त्याच्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे गेला होता आणि यमुनेच्या आतिथ्यावर यम प्रसन्न झाला आणि तिला वर दिला की यादिवशी जी बहीण तिच्या भावाला ओवाळेल, त्यांच्यातलं नातं असंच सुखासमाधानाचं राहील. या सगळ्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे पक्वान्ने आणि अन्नपदार्थांची रेलचेल म्हणजेच फराळ!
दिवाळीचा सण थंडीची चाहूल घेऊन येतो. आजकाल पाऊस पडतो हा भाग वेगळा पण पूर्वीच्या काळात दिवाळीच्या दरम्यान थंडी असायची. त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी जास्त उष्मांक असणारे पदार्थ खायचे. म्हणून फराळामध्ये तळलेले, तूप घालून केलेले, गोड पदार्थ दिसून येतात.
वेगवेगळ्या काळातले पदार्थ मिळून झाला ‘दिवाळी फराळ’!
दिवाळीच्या फराळात प्रचंड वैविध्य आहे. पण लाडू, चकली, अनारसे, चिवडा हे मुख्य पदार्थ आहेत. बाकी शंकरपाळ्या, चिरोटे, करंज्या, चंपाकळी, खव्याच्या मिठाया इत्यादी पदार्थ सुद्धा आहेत. काही पदार्थ आयुर्वेदातून आले, काही राजमहाराजांच्या मुदपाकखान्यातून आले, काही सामान्य घरातून आले. त्यामुळे दिवाळीचा फराळ हा कोणत्याही नियमात बांधला जाऊ शकत नाही किंवा पारंपरिक म्हणून गणला जाऊ शकत नाही. कालौघात ज्यांना जसं वाटलं तसं त्यांनी फराळाचे पदार्थ, ‘फराळ’ या श्रेणीत घातले.
औषधं खाण्यासाठी ‘लाडू’ बांधला
आश्चर्य वाटेल, पण लाडू आणि अनारसे हे दोन पदार्थ सगळ्यात प्राचीन आहेत. सुश्रुत ऋषींनी कडवट औषधे खाण्यायोग्य व्हावीत म्हणून लाडवांचा शोध लावला, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ‘गूळ किंवा मध, धान्याचं भरड आणि भाजलेलं पीठ यांना एकत्रित करून केलेला गोळा’ ही लाडवांची आद्य व्याख्या! कालांतराने त्यात औषधी खडीसाखर आली आणि आजच्या काळात काही अपवाद वगळले तर सर्व लाडवांमध्ये साखरच वापरली जाते. डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू, पंजाब मधील पिन्नी किंवा पंजिरी सारख्या लाडवांच्या प्रारूपात गूळ वापरला जातो. शुगर फ्री ड्राय फ्रुट लाडवांमध्ये खजुराचा मुख्य गोडवा असतो. बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, रवा बेसन लाडू, बुंदीचे लाडू हे आद्य किंवा भारतात जवळपास सगळीकडे मिळणारे लाडवांचे प्रकार आहेत. पण दिवाळी फराळात वर्णी लागते ती बुंदी, बेसन व रव्याच्या लाडवांची! बुंदीच्या लाडवात दोन प्रकार आहेत. एक मोठ्या कळ्यांचा बुंदीचा लाडू आणि दुसरा प्रसिद्ध मोतीचूर बुंदीचा लाडू. हा लाडवांचा प्रकार अकबराच्या काळात, राजस्थान मध्ये पहिल्यांदा राजघराण्यातील लोकांसाठी केला गेला. मोतीचूर लाडू हा त्याचा आधुनिक भाऊबंद म्हणता येईल.
ओलसर मोतीचूर लाडू हा आधुनिक अवतार
आजकाल मिठायांच्या दुकानात दिसणारे ओलसर मोतीचूर लाडू हे तर सगळ्यात अर्वाचिन रूप! मुळात आता मिळणारे मोतीचूर लाडू हे बुंदीच्या लाडवांचं बिघडलेलं रूप म्हणता येईल. याचं कारण असं की दिवाळीतील फराळाचा मुख्य हेतू हा जास्त शेल्फ लाईफ आहे. पूर्वी घरी आलेले पाहुणे जेव्हा परत स्वगृही जातील तेव्हा प्रवासात खाण्यास उपयुक्त म्हणून फराळ जास्त केला जायचा. लग्नकार्यात दोन बुंदीचे लाडू आणि बचकभर चिवडा अशी पाकीटे करून पाहुण्यांना दिला जायचा यामागे हेतू तोच होता. या पार्श्वभूमीवर आजकालचे ओलसर मोतीचूर लाडू खरे उतरत नाहीत.
नाजूक जाळीदार टिकाऊ अनारसे
एखादा पदार्थ, prolonged ferment केलेल्या साहित्यापासून तयार करून, त्याची पौष्टिकता आणि शेल्फ लाईफ वाढविण्याचं तंत्र जर कोणत्या दिवाळीच्या पदार्थात असेल तर तो एकमेव असा अनारसाचं असेल. अनारसे हे पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी केले होते, अशी आख्यायिका आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात अनारसे विशेष प्रसिद्ध आहेत.
चिवड्याचं अहम् स्थान
या पदार्थाचं श्रेय आपण मराठी लोक घेऊच शकतो. मुळात कमी टिकाऊ तांदुळापासून पोहे उर्फ flattened rice करायची युक्ती ज्याला सुचली त्याला सलाम! तांदळापेक्षा पोह्याचं शेल्फ लाईफ खूप जास्त आहे. तांदळापेक्षा पटकन शिजतात, नुसते खाऊ शकतो, दुधात भिजवून गूळ किंवा मध घालून खाऊ शकतो. त्यामुळे पोहे भारतभर प्रसिद्ध झाले. प्रवास करणाऱ्यांसाठी तर पोहे वरदान ठरले. ‘सुदाम्याचे पोहे’ प्रसिद्ध झाले ते याच कारणास्तव! या पोह्यांचा चिवडा करण्याचं श्रेय आपल्याला जातं. चिवड्याच्या पोह्याचे दोन प्रकार आहेत. एक दगडी पोहे किंवा भाजके पोहे आणि दुसरे पातळ पोहे. पातळ पोह्यांचा चिवडा गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. पण बाकी महाराष्ट्रात दगडी पोह्यांचा किंवा भाजक्या पोह्यांचा चिवडा प्रसिद्ध झाला. दिवाळी असो, लग्नकार्य असो, चहासोबत तोंडात टाकायला यासारखा अजून कोणी नाही.
‘चकली’, नजर हटी दुर्घटना घटी
महाराष्ट्रीयन भाजणीची चकली ही मिश्र धान्यांच्या पाककृतींची राणी आहे. अत्यंत लहरी आणि चुकीला माफी नाही या सदरात मोडणारी! जुन्या जाणत्या सुगरणी चकलीची भाजणी करताना शक्यतो एकांतात करायच्या कारण ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या उक्तीप्रमाणे धान्ये भाजताना थोड जरी दुर्लक्ष झालं तरी भाजणी बिघडणार आणि बिघडलेली भाजणी ही नेहमी चकली तळताना किंवा तळल्यावर कळते. एकतर चकली तेलात विरघळते किंवा कडक होते आणि जमल्यात असं वाटत असतं तेवढ्यात गार झाल्यावर चकली मऊ पडते. चकली तळताना तेलावर विशेष लक्ष ठेवावं लागतं. कारण चकलीच्या पिठातील तिखट तेलात उतरतं आणि शेवटच्या घाण्यातील चकल्या तिखट होतात.
फराळामधला चवींचा मिलाफ
या दिवाळीच्या पदार्थांमध्ये चवीच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट अजून ठळक होते, चवींचा मिलाफ! कोणतीही गोष्ट चटकदार किंवा पुन्हा पुन्हा खावीशी वाटण्यासाठी गोड, तिखट, आंबट या मुख्य तीन चवींचा मिलाफ होणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, लाडवांची मुख्य चव जरी गोड असली तरी गोडाचा अतिरेक टाळण्यासाठी त्यात लवंग, वेलदोडे हे मसाले घातले जातात. बेसनाच्या लाडवात लवंगेचा स्वाद त्याचा खमंगपणा अजून वाढवतो, तर वरती बेदाण्याचा आंबटपणा ती गोडाची चव अजून खुलवतो. चिवड्याची मुख्य चव जरी तिखट असली, तरी बेदाणे किंवा आमचूर आणि पिठीसाखर या आंबट गोड चवी, चिवड्याचा तिखटपणा अजून खुलवतात.
नोकरी आणि इतर धावपळीमुळं दिवाळीचा फराळ घरी तयार करणे हल्ली कमी झालंय. फराळ बाहेरून आणलेला असू देत की घरातला, फसलेला की मस्त जमलेला, कसाही असला तरी फराळ एकत्र खाण्यात खूप जास्त मजा आहे, यावर सर्वांचंच एकमत होईल.
5 Comments
खूपच सुंदर
फराळाचा लेखाचा शेवट …..
दिवाळीचा फराळ संंपल्यावर (थोडे शिल्लक राहतो जसे चकल्याचा चूरा,निरनिराळे चिवडे,मोडलेल्या शंकरपाळ्या इ.)हे सर्व घालून त्यावर कांदा कोधिंबीर लिंबू पिळून भेळ करून खाणे लाजबाब लागते
हा झाला फराळचा शेवट हा हा हा
मस्त, खमंग खुसखुशीत लेख
सागर दिवाळी फराळ खूपच चवदार व खमंग झाला आहे. 👌👍👏👏😊
लेख उत्तम झाला आहे