मध्यमवर्गीय कुटुंबातल्या चारचौघींसारखं तिचं बालपण, वडील पोलिस अधिकारी, आई शिक्षिका, घरातली मोठी मुलगी, तिच्या पाठचे दोन जुळे भाऊ. पालघरच्या बोईसरमध्ये जन्मलेल्या या मुलीचं आयुष्य लाडाकोडात सुरू होतं, अभ्यासातही ही हुशार होती, त्यामुळे आईवडिलांना या लेकीचं जास्त कौतुक होतं. अचानक वयाच्या पाचव्या वर्षीपासून डोळ्यातून सतत पाणी येणं, डोळे लाल होणं, डोकं दुखायला लागणं असा त्रास सुरू झाला. आईला वाटायचं ही फार मातीत खेळते, मजा मस्ती करते त्यामुळे असं होत असणार. ही मुलगी सहा वर्षांची झाली आणि पहिलीत असताना हिला अचानक पूर्णपणे दिसायचं बंद झालं, फळ्यावरचं काहीच दिसेना म्हणून काही दिवस शिक्षकांनी पहिल्या बेंचवर बसवलं, पण जेव्हा हिला आजूबाजूचंही काहीच दिसेना तेव्हा हिचे शिक्षक हबकले आणि पालकांच्या तर पायाखालची जमीनच सरकली! “या मुलीला दिसत नाही, तर हिला शिक्षण कसं देणार?” असा काहीसा विचार बोलून दाखवत शाळेनं हिला शिक्षण देणंच नाकारलं. पण ही मुलगी हारली नाही. ही आहे सध्या कॅनरा बँकेची अधिकारी, ‘कवडसे’ या पुस्तकाची लेखिका आणि साहित्य जागर या खास अंधांसाठीच्या व्हॉटसअप ग्रुपची इतर संस्थापकांपैकी एक संस्थापक- ज्यांचं नाव आहे अनुजा संखे.
कोवळ्या वयातील आघात आणि त्रास
एक शाळा सोडावी लागलेली मुलगी ते यशस्वी बँकर या प्रवासाबद्दल अनुजाताई सांगतात, “मला अचानक दिसणंच बंद झालं तेव्हा नेमकं काय घडतंय, हे ही कळण्याची समज नव्हती. पण शाळा बंद झाल्याचं मनस्वी वाईट वाटलं होतं. आई वडील तर घाबरूनच गेले होते, आजूबाजूचे लोक जे काही सांगतील ते सर्व उपाय ते करायला लागले, काहीही करून मुलीची दृष्टी परत यावी हीच त्यांची तळमळ होती. यात वैद्यकीय उपचार होते, अंगारेधुपारे, देवऋषी- बाबा- बुवाही होते. कुणी म्हणायचं देवाचं करायचं राहिल्यानं असं झालं, कधी कुणी बाबा पूर्ण डोक्याला कसली मंत्रभारित पावडर फासायचा तर कोणी माझ्या बंद डोळ्यात कसलं तरी डोळे चुरचुरवणारं औषध घालायचा, एक बाबा तर माझ्या बंद डोळ्यांवर पांढऱ्या कांद्याचे पातळ काप ठेवायचा.
साधा कांदा चिरताना आपल्या डोळ्यांना धारा लागतात. माझ्यासारख्या सहा-सात वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांचं काय होत असेल? दोन-तीन दिवस हे सुरू होतं. पुढं त्या बाबाची यायची वेळ झाली की, मी रडू लागे. मला होणारा त्रास सहन न झाल्याने, पप्पांनी त्याचं घरी येणं बंद केलं आणि हा उपचार बंद झाला. असे अगणित उपचार झाले पण आईबाबांनी एका मर्यादेपलीकडे मला त्रास होऊ दिला नाही”

आजाराचे निदान आणि पुढची दिशा
त्या पुढे सांगतात, “या सगळ्यासोबत वैद्यकीय उपचार सुरूच होते. डॉक्टर जयेश नावाच्या एका डॉक्टरांना माझं शिक्षण पुन्हा जोमाने सुरू करण्याचं श्रेय जातं. माझ्या उजव्या डोळ्यात काचबिंदू तर डाव्या डोळ्यात मोतिबिंदू असल्याचं त्याच्या शस्त्रक्रियेचं निदान डॉक्टरांनी केलं. अर्थातच हे ऑपरेशन केलं तरी माझी दृष्टी येणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. मात्र त्याबरोबरच आई- बाबांना माझं शिक्षण बंद पडल्याची जी खंत वाटत होती त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला की, “अंध मुलं- मुली सुद्धा शिकतात, तुमची मुलगी स्मार्ट आहे, अंधांसाठीच्या खास शाळा असतात, त्यात तिचा प्रवेश करवून तिचे शिक्षण सुरू ठेवता येईल”- हा दिलासा त्यांनी दिला. आणि दादरच्या कमला मेहता अंधशाळेत माझ्या आयुष्याच्या पुढचा प्रवास सुरू झाला. ही शाळा निवासी होती, त्यामुळे आईबाबांना एवढ्या लहानश्या मुलीला एकटं कसं ठेवायचं याची काळजी वाटत होती, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजत असल्याने त्यांनी तो निर्णय घेतला.”
विशेष शाळेतील स्वावलंबनाचे धडे
अनुजाताई पुढे सांगतात, “मला शाळेत जायला मिळणार या बातमीनेच मला आनंद झाला होता. मधली दोन वर्षं वाया गेली होती, मित्र मैत्रिणी पूर्वीसारखी खेळायला घेत नव्हते, नातेवाईकांकडे एक तर दया नाहीतर पूर्ण दुर्लक्ष याचा अनुभव यायचा, त्यामुळे आता नवीन शाळेत पहिलीपासून शिकायचं या बातमीनंच माझ्यात उत्साह संचारला. माझी बॅग वगैरे घेऊन मी शाळेत दाखल झाले, पहिला दिवस छान गेला, पण संध्याकाळ झाली तशी आता आई जवळ नाही, लाड करणारे बाबा भेटणार नाहीत, या भावनेने रडू फुटायला लागलं.
अर्थात पहिल्यांदा वसतिगृहात राहणाऱ्या कोणत्याही मुलांना होतं तसं मी आधी घराला मिस केलं पण पुढे या शाळेत इतकी रमले की, मला आयुष्यभराच्या मैत्रिणी आणि चांगले शिक्षक इथे लाभले. इथे ब्रेल लिपी तर शिकलेच, पण बाकीची कला कौशल्यं- शिवणकाम- विणकाम हे सुद्धा शिकवलं जायचं. आणि अर्थातच पांढरी काठी वापरून समाजात, रस्त्यावर वावरावे कसे, एकट्यानं चालताना लोकांची मदत कशी घ्यावी, आपल्याला काय मदत हवी आहे, ते कसं सांगावं, त्यांनी आपला हात कसा पकडावा आणि आपण त्यांना कसं पकडावं, हे प्रत्यक्षपणे शिकवलं जातं. मग मुलगी नीट तयार झालीये, असं वाटल्यावर तिची परीक्षा म्हणून तिला एकटीला बाहेर पाठवलं जायचं. मोबिलिटी शिकवणाऱ्या शिक्षिका तिच्याशी एकही शब्द न बोलता तिचं सबंध रस्ताभर निरीक्षण करत राहायच्या. आम्हांला मोजके पैसे देऊन दर रविवारी बाहेरच्या दुकानातून खाऊ आणायला पाठवलं जायचं, हे सगळं करताना समाजात वावरावं कसं याचं आपोआपच शिक्षण होत जायचं, अभ्यास तर मला आवडायचाच ”
हेही वाचा – अंधश्रद्धेच्या जटांना कात्री लावणाऱ्या नंदिनी जाधव!
कॉलेजकरता एकटीनं बोईसर ते दादरचा रेल्वे प्रवास
पुढे आठवी ते दहावी नायगांवच्या सरस्वती हायस्कूलमध्ये आणि पुढे रूईया कॉलेजमधून अनुजा संखे यांनी बीए केलं. बारावीपर्यंत कमला मेहता शाळेच्या वसतिगृहातच त्या राहिल्या पण पुढे रूईयाला शिकताना बोईसर ते विरार शटल, विरार ते दादर लोकल परत माटुंग्यापर्यंत परत लोकल बदलून अनुजाताईंना प्रवास करावा लागायचा. रोजचे अडीच ते तीन तास त्यांचे या प्रवासातच जायचे. पण शिकण्याची, काही तरी वेगळं घडविण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती.
रेकॉर्डिंग आणि इतरांच्या नोटस् ने अभ्यास
अर्थात शिक्षण सोप्पं नव्हतं- राज्यशास्त्र, समाजशास्त्र याची ब्रेल पुस्तकं सहजासहजी उपलब्ध व्हायची नाहीत. अभ्यास करताना रेकॉर्डिंगवर, काही वेळा इतरांच्या नोटसवर अवलंबून राहावं लागे. पण याच काळात त्यांना सहकार्य करणाऱ्या काही डोळस आणि अंध असं दोन्ही चांगलं मित्रमंडळ त्यांना लाभलं. अनुजा यांना वाचन, लेखन, चालू घडामोडी, सामाजिक बांधिलकी या सगळ्यात रस असल्याने आपण पत्रकारिता करावी असं त्यांना फार प्रकर्षाने वाटायला लागलं होतं. त्या अनुषंगाने मुंबई मराठी पत्रकार संघातून त्यांनी एक छोटासा कोर्स केला. त्यावेळी दिलेल्या एका असाईनमेंटवर लेख लिहिताना अनुजाताईंनी लिहिलेल्या लेखाचे , “तू छान सगळ्यांना समजेल असं, वाचावसं वाटेल असं लिहितेस” असं हेमंत देसाई सरांनी केलेलं कौतुक त्यांचा आत्मविश्वास वाढवून गेलं.
मुंबई विद्यापीठात पत्रकारितेत एम ए करणारी पहिली अंध व्यक्ती
पुढं प्रत्यक्ष पत्रकारितेत एम ए करण्याच्या इच्छेतून त्यांनी तत्कालीन विभागप्रमुख डॉ. संजय रानडे यांच्याशी संपर्क साधला आणि फोनवर सांगून टाकलं की, “मी पूर्ण अंध आहे पण मला पत्रकारिता करायची आहे”. त्यावर डॉ. रानडे यांनी कसलेही आढेवेढे न घेता, “तुम्हांला पत्रकारिता करायची इच्छा आहे ना, जरूर करा ” असं म्हणत प्रत्यक्ष भेटून प्रवेशपरीक्षा आणि मुलाखत याची माहिती अनुजाताईंना दिली. त्यांच्या या मानवीय दृष्टिकोनाने अनुजाताईंचा आत्मविश्वास वाढला आणि सर्व परीक्षा उत्तीर्ण होत त्या मुंबई विद्यापीठात पत्रकारितेत एम ए करणाऱ्या पहिल्या अंध विद्यार्थिनी ठरल्या. विभागाने आणि वर्गमित्रांनी असाईनमेंट करताना, अभ्यास शिकता आवश्यक तिथे मदत केल्याचं त्या आवर्जून सांगतात. जसं की ऑडिओ- व्हिज्युअल असाईनमेंट असेल तर अनुजाताईंना केवळ ऑडिओ क्लीप बनवण्याची मुभा होती.
पत्रकारीता ते सामाजिक संस्थेत अधिकारी
पुढे अनुजाताईंनी Media and Disability communication मध्ये पीजी डिप्लोमा केला. National institute for Hearing Disability आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा डिप्लोमा होता. अंधांचे- अपंगांच्या प्रश्नांबद्दलची, त्यांच्या जगण्याविषयी माध्यमकर्मींनी किती संवेदनशील असायला हवं, याबद्दलच्या कोर्सने त्यांना आणखी अंतर्मुख केलं. या दरम्यान त्यांनी प्रहार, तेव्हाचा आयबीएन लोकमत आणि इतरही काही ठिकाणी इंटर्नशिप केली. स्वागत थोरात यांच्या ‘स्पर्शज्ञान’ पाक्षिकात तर त्या खूप आधीपासून लिहित होत्या. पत्रकारीतेची मनापासून आवड होती, पण इथं कायमस्वरूपी नोकरी कुणीच ऑफर करत नव्हतं. त्यामुळे पी जी डिप्लोमानंतर बंगलोरमधल्या एका सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेत प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून मिळालेली नोकरी त्यांनी स्वीकारली. तिथंही मुलीला एकटं पाठवायला आई तयार नव्हती, तेव्हा वडिलांनी “आपल्या धडधाकट मुलीला अशी करिअरची संधी मिळाली असती तर तू अडवलं असतंस का? आपण तिच्या पाठीशी आहोत, तिला जाऊ दे” अशी वडिलांनी आईची समजूत घातली आणि अनुजाताई बंगलोरला रवाना झाल्या. नवं काम, नवा उत्साह असं सगळं चांगलं चाललेलं असताना 2013 साली अचानक अनुजा यांच्या वडिलांचे निधन झाले. आणि अनुजाताई कोलमडल्या, वडिलांवर अतिशय मनापासून प्रेम करणाऱ्या अनुजाताईंसाठी हा आघात एवढा मोठा होता, की त्या बंगलोरमधली नोकरी पूर्ण करू शकल्या नाहीत आणि मुंबईला परतल्या.

लग्नानंतर बँकेत नोकरी
वडील गेल्याचं दु:ख ताजं होतंच. मुंबईला परतल्यानंतर अनुजा संखे यांना 2014 साली सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्कारही मिळाला. याच दरम्यान अनुजा संखे यांचा भरत घोडके यांच्याशी 2014 सालीच विवाहही झाला. भरत आणि अनुजा महाविद्यालयीन आयुष्यापासून एकमेकांच्या प्रेमात होते. दोन्ही अंध व्यक्तींनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या आणि संसाराला सुरूवात झाली. घरची जबाबदारी, संसार, नवीन माणसांशी जुळवून घेणे हे सुरूच होतं. पण अनुजाताईंना आपण घरी न बसता काहीतरी करायला हवं हे जाणवत होतं. भरत घोडके हे युनियन बँकेत मॅनेजर त्यांनी अनुजाताईंना सुचवलं की तू सुद्धा बँकेची परीक्षा देऊन बघ, लिखाण हे छंद म्हणूनही सुरू ठेवता येईल. आणि अनुजाताईंनी बँकेची परीक्षा दिली आणि त्या सुद्धा कॅनरा बँकेत अधिकारी म्हणून रूजू झाल्या.

साहित्यप्रेमी अंधांकरता साहित्यनिर्मिती
यासोबतच अनुजाताईंनी आपलं लिखाण, साहित्यप्रेम सोडलं नाही. नवी उमेद या फेसबुक पेजवरची त्यांची लेखमालिका गाजली, नंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेल्या लेखांचे तर 2024 साली ‘कवडसे’ नावाने लेखसंग्रह प्रकाशित झाला. याशिवाय 2019 पासून ‘साहित्यजागर’ हा साहित्यप्रेमी अंध लोकांचा व्हॉटसअप ग्रुप स्थापन करणाऱ्या हर्षद जाधव, प्रकाश पंडागळे, चेतना मोरे, भरत घोडके या लोकांसोबत अनुजा संखेही होत्या. 2019 पासून सुरू असणाऱ्या या ग्रुपवर टाईमटेबलप्रमाणे कविता, कथा, विज्ञानविषय साहित्य, अर्थभान, ताज्या घडामोडी असे विषय आणि त्यावरचं साहित्य दररोज शेअर होतं. यांचे सहा दिवाळी अंकही आले असून, सदस्यांची दोन साहित्य संमेलनंही झाली आहेत. महाराष्ट्रभरातल्या साहित्यप्रेमी अंधांना जोडणारा हा ग्रुप मोलाचं काम करतोय.
हेही वाचा – ‘बौद्धिक संपदेला, झालर सहृदयतेची – ठसा डॉ. मृदुला बेळेंचा’
भरतसर आणि अनुजाताई यांना ओजस आणि असीम अशी दोन मुलं आहेत. दोन्ही वेळेला आपलं होणारं बाळ डोळस होईल की आपल्यासारखं होईल, याची त्यांना आईवडील म्हणून काळजी होती. मात्र दोन्हीही बाळं डोळस असल्याने त्यांच्या नजरेने, मुलांच्या अस्तित्त्वाने या दोघांचा संसार आणखीनच फुलला आहे. आपल्या बँकेच्या नोकरीने आर्थिक स्थैर्य दिल्याने या दोघांनी मुंबईत आपलं स्वत:चं घरही घेतलेलं आहे, आणि पूर्णपणे स्वत:च्या अटींवर जगत अतिशय, डोळस पालकत्व निभावत आणि संवेदनशीलतेने भरत घोडके आणि अनुजा संखे संसार करत आहेत.
1 Comment
Very very good. Congrats , Anuja.. Great !