महाराष्ट्रातली वेगळी गावे
भारतीय राज्यघटनेने गावांना व गावांच्या समुहांना स्वायत्त शासन व्यवस्थेचा दर्जा दिला आहे. गावांच्या गावपणाला महत्त्व देणारी पंचायत व्यवस्था समजून घेवून नागरिक वाटचाल करत आहेत. काही गावे शासनाच्या आदेशात बांधून काम करत आहेत. तर काही गावे गरजांवर आधारीत कार्य करत आहेत. आपले स्वतःचे असे वेगळेपण जपणारी गावेही आहेत. ती जगापासून अलीप्त आहेत. त्यांचे कार्य दृष्टीकोन हा कुतूहल जागृत करणारा आहे.
सर्वाधिक वेतन देणारे गाव
भारत सरकार प्रतिवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल मजुरीचे किमान वेतनदर जाहीर करते. हे दर प्रत्येक राज्यासाठी ठरवून दिलेले असतात. याबाबत ग्रामीण विकास विभाग राजपत्र प्रसिद्ध करते. कोणत्याही वर्षाच्या राज्यपत्रात आपल्याला दिसून येईल की, सिक्किम राज्यातील 3 ग्रामपंचायतींचा दर राज्यपत्रात वेगळा दिलेला दिसतो. उदा. सिक्किम राज्याचा दर 212 रुपये आहे. पण तिथल्या ज्ञानथांग, लाचुंगव आणि लाचेन या तीन ग्रामपंचायतींचा दर 318 रुपये आहे.
भारतात साडेसहा लाख ग्रामपंचायती आहेत. मग या तीन गावांचे हे वेगळेपण कसे? भारतीय राज्यघटनेतील सहाव्या अनुसूचीनुसार पंचायतींना निर्णयाचे अधिकार दिले आहेत. या अधिकाराप्रमाणे ग्रामसभा किमान वेतन ठरवणार व तो आम्हांला मिळालेला घटनात्मक अधिकार आहे. असं या तिन्ही गावच्या ग्रामसभांनी सांगितलं. या तिन्ही गावच्या ग्रामसभांनी स्वायत्ततेचा अधिकार मिळवला आहे. ग्रामसभा वा ग्रामपंचायत स्वायत्त आहेत, हे कृतीत आणणाऱ्या भारतातील या 3 ग्रामसभा आहेत.
दृष्टीदान देणारे गाव
सामाजिक बांधिलकी मानून मृत्यूनंतर डोळे दान करणारे हे आगळेवेगळे गाव आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावातल्या सर्वच्या सर्व व्यक्तींनी नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे आणि कृतीतही आणला. आम्ही आमच्या कुटुंबातील माणूस परत आणू शकत नाही. पण आम्ही प्रत्येकजण दोन अंध व्यक्तिंची दृष्टी पुन्हा आणू शकतो, असे इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
अनाथ मुलींचे सासर
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका हा साने गुरुजींच्या विचारांचा तालुका व जिल्हा. याच अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावाने ग्रामसभेत मुलांच्या लग्नाचा विषय चर्चेला घेतला. ‘अनाथ मुलींना गावात सून म्हणून आणायचे’ असा निर्णय झाला. पण माहेर नसल्याने मुलीला कोणी त्रास दिला तर? यावर चर्चा झाली. गावात विविध ग्राम विकास समित्या बनवतात. त्याचप्रमाणे मुलींना आधार देणारी, पाठिंबा देणारी समिती गावात बनवण्यात आली. गावात 20 विवाह सामुहिक पद्धतीने झाले.
व्यसनमुक्त गाव
व्यसनाने कुटुंब बरबाद झाले हे आपण नेहमीच ऐकतो. समाज अनेक कारणांनी व्यसनाचे समर्थन करतो. काही जिल्ह्यात दारुबंदी झाली. राज्यात गुटखाबंदी झाली. पण वास्तव आपणा सर्वांना माहीत आहे.
महाराष्ट्रात असे एक गाव आहे तिथे, कधीच कोणत्याही व्यसनाचे पदार्थ मिळत नाहीत किंवा व्यसन करणारा व्यक्तीही मिळत नाही. बिडमधील आष्टी तालुक्यातील करंज गाव हे व्यसनमुक्त गाव आहे. पण आजच्या तरुणाला व्यसनमुक्तीचे शिक्षण देणारे व त्याची सामुहिक अंमलबजावणी करणारे हे गाव आहे. राज्यात अनेक संशोधन संस्था आहेत. अभ्यासकेंद्र आहेत. या गावाच्या आरोग्याचा अभ्यास आवश्यक आहे.
गणिताचे गाव
मुलांनी अभ्यास करावा म्हणून पालक ओरडतात किंवा अभ्यासाला बसवतात. गावात अभ्यासिका चालवून मुलांना अभ्यासाची सवय लावणारी गावेही आहेत. पण मुलांनी आनंददायी शिकावे, असा विचार सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भादे गावाने केला. मुले कोणत्या विषयात शिकत नाहीत, कोणता विषय नावडता आहे याचा अभ्यास करून ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘गणिताचा गाव’ केला. घरांच्या भिंतींवर, सार्वजनिक भिंतींवर प्रत्येक इयत्तेची गणिते आणि त्याची सूत्रे रंगवण्यात आली. गावच्या साऱ्या भिंती बोलक्या केल्या. प्रत्येक गल्लीला गणितातील संकल्पनेतली नावे दिली.
गावांनी गावाकडून शिकावे. यासाठी पंचायत परिषद, गाव परिषद तयार झाली तर प्रत्येक गाव ‘शासन’ म्हणून कार्य करेल. यातून नवीन दृष्टीकोन तयार होईल. गाव व गावातील माणूस काळाच्या पुढे पाहतो, याला संधी देण्यासाठी सर्व जण प्रयत्नशील राहुया..