विष्णुच्या सहाव्या अवताराची कथा म्हणजेच रामकथा. याचे सर्वात महत्वाचे आणि मूळ मानले गेलेले संस्करण म्हणजे संस्कृत भाषेतील वाल्मीकीकृत रामायण. ह्याला आदीकाव्याचा दर्जा आहे. रामभक्तीसोबत रामकथेचाही प्रसार झाला आणि ही कथा भारताच्या विविध भागात पसरली. त्यामुळे वाल्मीकींच्या मूळ संस्कृत संस्करणासोबतच इतर दोन महत्वाची संस्करणे निर्माण झाली आणि प्रसिद्धही झाली.
रामचरितमानस आणि रामावतरम
सोळाव्या शतकातील तुलसीदासकृत अवधी भाषेतील रामचरितमानस आणि तामिळ भाषेतील कंबाने रचलेले रामावतरम. ही दोनही संस्करणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात तुलसीरामायण आणि कंबरामायण या नावानेही प्रसिद्ध आहेत. याशिवाय भारतात इतर अनेक भाषांमध्ये रामकथा विविध प्रकारे रचली आणि सांगितली गेली. व्यापार, सांस्कृतिक आदान-प्रदान, धार्मिक प्रवास इत्यादी अनेक कारणांनी रामकथा आशियाच्या विविध भागात पोहोचली. परिणामी रामकथेची अनेक संस्करणे निर्माण झाली आणि त्या त्या भागात रामकथा विविध प्रकारे म्हणजेच, कथन, सादरीकरण, शिल्पे, चित्रे इत्यादी प्रकारे जतन केली गेली.
भावार्थ रामायण
महाराष्ट्राबाबतीत बोलायचे झाल्यास, मराठी भाषेतही रामकथेची काही संस्करणे निर्माण झाली. आजच्या लेखात आपण रामकथेच्या मराठी संस्करणांची ओळख करून घेवू.
मराठी भाषेतील सर्वात प्रसिध्द रामकथा म्हणजे सोळाव्या शतकाच्या शेवटाला लिहिलेले भावार्थ रामायण. ह्याचा कर्ता म्हणजे संत एकनाथ. वाल्मीकी रामायणाप्रमाणेच एकनाथांनीही भावार्थ रामायण सात काण्डांत विभागले आहे. त्यांची नावे, बाल, अयोध्या, अरण्य, किष्किन्धा, सुन्दर, युध्द आणि उत्तर. यातील उत्तरकांडाची रचना एकनाथांच्या कोण्या एका शिष्याने केली असावी असे म्हटले जाते. एका दंतकथेनुसार एकनाथांनी युध्दकांडाचे फक्त 44 अध्याय लिहिले. आणि त्यांच्या गवव नाव्याच्या शिष्याने उरलेले काण्ड पूर्ण केले. मात्र काही आधुनिक अभ्यासकांच्या मते एकनाथांनी अहिरावण आणि महिरावणाचा वृत्तान्त सोडल्यास बाकी संपूर्ण युध्दकांड रचले होते. अहिरावण आणि महिरावणाची कथा जयरामसुत नावाच्या व्यक्तिने लिहिली असावी असे मानले जाते.
एकनाथांनी श्रीगणेशाला वंदन करून भावार्थ रामायणाची सुरुवात केली आहे.
ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न । उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥
भावार्थ रामायण रचताना एकनाथांनी रामायणाच्या प्रचलित असलेल्या तीन संस्करणांना मुख्य आधार मानले. वाल्मीकीकृत रामायण, अध्यात्म रामायण आणि आनन्द रामायण. असे म्हटले जाते की एकनाथांनी भावार्थ रामायणाच्या कथेला वाल्मीकींच्या रामायणाच्या ढाच्यात प्रस्तुत केले. मात्र भावार्थ रामायणातील भक्तीचे वातावरण अध्यात्म रामायणाला अनुसरून आहे.
रामकथांमधील वैविध्य
भावार्थ रामायणात येणा-या कथानकाचा ओघ लक्षात घेता प्रचलित असलेल्या विविध रामकथांची झलक आपल्याला दिसून येते. दशरथाच्या मुलीचा म्हणजेच शान्ताचा उल्लेख, ताराचा शाप, रावणाने विभीषणावर केलेला लत्ताप्रहार, नारद-कुम्भकर्ण संवाद, कालनेमिची कथा इत्यादी रामायणाच्या गौडी आणि वायव्य पाठांमधील कथानक भावार्थ रामायणात येते. मात्र केवळ वायव्य पाठातील काही कथानकांचा भाग, म्हणजेच विभीषण-निकषा संवाद, नारद वाक्य, कुम्भकर्ण वाक्य, इत्यादीही भावार्थ रामायणात येतात. केवळ गौडीय पाठात येणारा भरत-हनुमान संवाद भावार्थ रामायणात आहे. मात्र तो आनन्द रामायणातून घेतला असावा कारण त्यावर आनन्द रामायणाची छाप असल्याचे दिसून येते. दशरथ आणि कौसल्याचा विवाह, भरत आणि बाल रामाची तीर्थयात्रा, सीतेने शिवधनुष्य उचलण्याचा उल्लेख, रावणाची सीतास्वयंवरास उपस्थिती, लक्ष्मण रेषा, पार्वतीने रामाची घेतलेली परीक्षा, विभीषण रामकीर्तनात तल्लिन असल्याचे हनुमानाने पहाणे, रावणाची दाढी जळण्याचा उल्लेख, रावणासोबत सुलोचना आणि मंदोदरीचे सहगमन, हनुमानाच्या पुत्रजन्माची कथा, रावण-मन्दोदरीच्या विवाहाची कथा, दशरथ-यज्ञातील पायसापासून हनुमानाचा जन्म इत्यादी प्रसंग वाक्मीकी रामायण किंवा अध्यात्म रामायणात आढळत नाहीत, मात्र आनन्द रामायणात आढळतात. त्या अनुषंगाने भावार्थ रामायणातही आढळतात. काही प्रसंग मात्र वाल्मीकी रामायण, अध्यात्म रामायण आणि आनन्द रामायणातही आढळत नाहीत, मात्र केवळ भावार्थ रामायणात आढळतात. ते म्हणजे, भरत आणि शत्रुघ्न कैकेयीची मुले असणे, रामाच्या वैराग्याचे वर्णन, चित्रकूटावर भरत आणि लक्ष्मणाचे युध्द, इन्द्रासोबत युध्द करताना कैकेयीने केलेल्या मदतीमुळे तिला मिळालेले वर, सीता-मन्दोदरी संवाद, रावणाच्या सभेत हनुमानाने शेपटीचे कुण्डल करून त्यावर बसणे, लक्ष्मणाचे वैराग्य, इत्यादी.
विविध मराठी भाषेतील रामकथा
याशिवायही रामकथेची इतर अनेक मराठी संस्करणे उपल्ब्ध आहेत. सोळाव्या ते अठराव्या शतकादरम्यान रचलेल्या, सीतास्वयंवर नावाच्या अनेक रचना मराठीमध्ये प्रसिध्द आहेत. त्यातील काही रचनांचे रचनाकार जनार्दन आणि विठा रेणुकानन्दन, रामदास, वेणावाई, वामन आणि जयराम स्वामी वडगावकर, आनन्दतनय, गोसावीनन्दन, नागेश आणि विठ्ठल आहेत, असे उल्लेख सापडतात. याशिवाय रामायणावर आधारित सतराव्या शतकात रचलेले काही ग्रंथ पुढील प्रमाणे, कॄष्णदास मुद्गलाचे युध्दकाण्ड, मुक्तेश्वराचे संक्षेप रामायण आणि अहि-महिरावण वध, माधवस्वामींची दोन रामायणे, समर्थ रामदासांचे लघु रामायण, सुन्दरकाण्ड आणि युध्दकाण्ड, वेणाबाईंचे रामायण.
रामकथावरील ग्रंथ
श्रीधरकृत रामविजय हा असाच एक रामकथेवर आधारीत महत्वाचा ग्रंथ. यावर भावार्थ रामायणाची छाप आहे. मूळ भावार्थ रामायण वाल्मीकीकृत रामायण, अध्यात्म रामायण आणि आनन्द रामायण यांवर आधारित आहे हे आपण पाहिलेच आहे. मात्र पुढे त्याची प्रसिध्दी पहाता भावार्थ रामायण रामविजय ग्रंथाचा आधार बनले, हीच भावार्थ रामायणाची लोकप्रियता.