शेतकरी उत्पादक कंपनी (FPC – Farmer Producer Company) शेतकरी उत्पादक संस्था (FPO – Farmer Producer Organization) यांमार्फत विक्री
सहकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये जाणवलेल्या मर्यादा व त्रुटींचा अभ्यास करून त्या त्रुटी कमी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) किंवा शेतकरी उत्पादक संस्था (FPO) तयार करण्याची कल्पना पुढे आली. शेतकाऱ्यांनीच एकत्र येऊन त्यांची व्यावसायिक कंपनी स्थापन करावी आणि केवळ पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती न करता, आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर करून नफा कमावण्याच्या उद्देशाने एक आधुनिक व्यवसाय म्हणून शेती करावी. यासाठी शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी या नव्या संकल्पनेची मांडणी भारतात गेल्या दशकात झाली. आतापर्यंत देशात अशा सुमारे 8,875 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील ‘सह्याद्री फार्म्स’, तमिळनाडूची ‘कोवई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’, ओरिसा येथील ‘जगन्नाथ क्रॉप प्रोड्यूसर्स कंपनी’, झारखंडची ‘मासूटा प्रोड्यूसर्स कंपनी’ अशा काही कंपन्या नावारूपाला आल्या आहेत.
अशा कंपन्यांशी करार करून कृषी निविष्ठा कंपन्या थेट शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. या पद्धतीमध्ये सहकारी संस्थांमार्फत विक्री करताना होणारे फायदे तर आहेतच. शिवाय या प्रोड्यूसर कंपन्या आधुनिक व्यावसायिक पद्धतीने हाताळल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना अन्य फायदेसुद्धा मिळतात. अशा शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने करता यावं यासाठी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देतात. त्यामुळे कंपनीचा कारभार करताना कृषी व्यवस्थेतील इतर घटकांशी व्यावसायिक व्यवहार, विशेषत: आर्थिक व्यवहार ते अधिक आत्मविश्वासाने करतात.
कृषी मालाची विक्री अधिक चांगल्या प्रकारे कशी करावी याबद्दल त्यांना आवश्यक ते ज्ञान मिळते. व्यवसायाची आर्थिक शिस्त कशी असावी, मनुष्यबळ व्यवस्थापन कसे करावे या महत्त्वाच्या बाबीसुद्धा या प्रशिक्षणातून लक्षात येतात. कृषी (Agriculture) पदवीधर, तसेच कृषी व्यवस्थापन (Agribusiness Management), ग्रामीण व्यवस्थापन (Rural Management) विषयात शिक्षण घेतलेल्या युवकांना – शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवस्थापन करणे आणि नव्याने तयार झालेल्या FPC किंवा FPO मधील शेतकऱ्यांना त्यासंबंधी प्रशिक्षण देणे – अशा अनेक संधी उपलब्ध आहेत.
कृषी सेवा केंद्रांमार्फत विक्री
निव्वळ कृषी निविष्ठांची किरकोळ विक्री करण्यासह शेतकऱ्यांना कृषी उत्पादन विषयक योग्य शास्त्रीय माहिती व मार्गदर्शन करणं हे कृषी निविष्ठा विक्रीसाठी कसं आवश्यक असते हे आपण अगोदरच्या लेखांमध्ये पाहिले आहे. याच उद्देशाने कृषी सेवा केंद्रांची निर्मिती झाली. कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यादेखील आधुनिक काळात केवळ एकाच प्रकारच्या उत्पादनाची म्हणजे केवळ खते, किंवा केवळ कीटकनाशके अशा प्रकारे मर्यादित उत्पादन मालिका करत नाहीत. तर वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने एकाच कंपनीच्या ब्रॅंड अंतर्गत ते उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनांची निवड करणे सुलभ होते. आणि कंपनीला एकेका ग्राहकासाठी करावा लागणारा वितरण व विक्रीचा खर्च कमी होतो. याच प्रकारचे विक्रीचे मॉडेल कृषी सेवा केंद्रांमार्फतही चालवता येते. जे छोटे शेतकरी मोठ्या सहकारी संस्था अथवा प्रोड्यूसर कंपन्यांच्या अंतर्गत येत नाहीत, त्यांच्यासाठी हे मॉडेल योग्य आहे.
कृषी सेवा केंद्र गावातील किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थेट आवाक्यात असते, तिथे येऊन आपल्या शंका निरसन करून घेता येतात. अनेक कंपन्या त्यांच्या नव्या उत्पादनांची माहिती अशा कृषी सेवा केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.
इंटरनेटद्वारे थेट विक्री
सध्याच्या काळात तरुण शेतकरी स्मार्टफोन धारक झाले आहेत. ग्रामीण भागात मोबाईल उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीला त्याचा वापर केवळ फोन करण्यासाठी, त्यानंतर मुख्यतः मनोरंजनासाठी करायचे. मात्र जसजसं मोबाईलचं रूपांतर स्मार्टफोनमध्ये झालं, तसतसं खरेदी विक्रीची अनेक नवी साधने त्याद्वारे खुली झाली. याचा वापर करून अनेक कृषी निविष्ठा कंपन्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलद्वारे थेट खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत. कंपनीचे विक्री व्यवस्थापक शेतकऱ्यांना whatsapp द्वारे एकत्रित करून त्यांच्यापर्यंत उत्पादनांची माहिती पोहोचवतात, त्यांच्या शंकांचे निरसन करतात, त्यांना उत्पादनांची सखोल माहिती होण्यासाठी फोटो, व्हिडियो आणि ऑनलाइन चर्चा व त्यानंतर प्रत्यक्ष शिवार फेरी आयोजित करतात. त्याशिवाय तरुण शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती उपलब्ध करुन देत उत्पादन खरेदी करण्याची सुविधा ही देतात. या पद्धतीचं एकत्रीकरण सहकारी संस्था, प्रोड्यूसर्स कंपन्या आणि कृषी सेवा केंद्र यांच्याशी करून विक्री व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि ग्राहक अनुकूल करण्याचे प्रयत्न केलं जात आहे.
सतत प्रगत होत जाणाऱ्या मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून, पिकांवरील रोग आणि किडींचं व्यवस्थापन करण्याचं आधुनिक तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना पुरवलं जातं. तसेच हवामान अंदाज आणि त्यानुसार पिकांना होणारे संभाव्य धोके त्यावर करायचे उपाययोजना यांची माहिती सुद्धा कृषी निविष्ठा कंपन्या शेतकऱ्यांना मोबाइलच्या माध्यमातून थेट पोहोचवत आहेत.
व्यवस्थापित किरकोळ विक्री (Organized retail)
कृषी निविष्ठा उद्योगांमध्ये सुरुवातीला मुख्य भर हा उत्पादन करण्यावर असे. पण काळानुरूप विक्रीचं महत्त्व वाढू लागल्यामुळे त्या उत्पादनांची किरकोळ विक्रीची व्यवस्थेला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होऊ लागलं. यामध्ये शहरी भागांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू विकण्याच्या ज्या रीटेल विक्री व्यवस्था आहेत तशाच आधुनिक प्रकारच्या रीटेल व्यवस्था कृषी निविष्ठा विक्रीसाठीसुद्धा सुरू केल्या गेल्या. यामध्ये अनेक कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या आणि अन्य क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी भाग घेतला. आणि त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. यामध्ये काही महत्वाची उदाहरणे म्हणजे ITC कंपनीचे ‘ई-चौपाल’ आणि ‘चौपाल-सागर’ मॉडेल, श्रीराम फर्टिलायझर कंपनीचे ‘हरियाली किसान बाजार’, टाटाचे ‘किसान संसार’, महिंद्रा शुभलाभचे ‘कृषी विहार’ ही आहेत. या व्यवस्थांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा आणि त्यांना सर्वसामान्य ग्राहक म्हणून लागणाऱ्या वस्तू अशा दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या अन्य सुविधा, जसं माती परीक्षण, हवामान अंदाज, बाजारभाव संबंधी माहिती आणि शेतमालाची विक्री व्यवस्था यांची माहिती ही एकाच ठिकाणी करून देण्याचे प्रयोग केले. त्यामधून अशा सुविधा एकात्मिक प्रकारे कशा पुरवता येतील याची प्रारुपे (मॉडेल्स) तयार होत गेली.
नाबार्डच्या योजनेचा सहभाग
‘नाबार्ड’ने (NABARD – National Bank for Agriculture and Rural Development) 2001-02 च्या सुमारास चालू केलेल्या ॲग्रीक्लिनिक व ॲग्रीबिझनेस (Agriclinic and Agribusiness) योजने’अंतर्गत प्रशिक्षण घेऊन अनेक कृषिपदवीधरांनी स्वतःचा कृषिव्यवसाय सुरू केला आहे. ते कृषि-सेवा केंद्र किंवा कृषि-सल्ला केंद्र चालवत आहेत. त्यांच्या मार्फतही कृषि निविष्ठांची विक्री होत आहे. अशा प्रकारचे केंद्र चालवणे ही कृषि पदवीधर युवकांसाठी स्वयंरोजगाराची उत्तम संधी आहे.
अशा प्रकारे एका बाजूला अधिकाधिक आधुनिक होत जाणारी कृषी निविष्ठा उद्योगांची वितरण आणि विपणन व्यवस्था आहे. तर दुसऱ्या बाजूला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन तंत्रांचा वापर करत शेती उद्योग करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. यातच आपल्या तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचा वापर करून उत्तम करियर करण्याचं स्वप्न बघणारे तरुण हे भारतीय कृषी क्षेत्रासाठी अतिशय आश्वासक चित्र आहे. नजीकच्या भविष्यकाळात कृषी निविष्ठा उद्योगांच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी निश्चितच वेधक असतील.
यापुढील लेखांमध्ये आपण महत्त्वाच्या कृषी निविष्ठा म्हणजेच बी-बियाणे, कृषी-रसायने, खते आणि कृषी यंत्रे व अवजारे यांच्याशी संबंधित उद्योगांची ओळख करून घेणार आहोत.