एखाद्या माणसानं किती व्हर्सटाईल असावं? म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात उत्कृष्ट ॲथलिट, व्हॉलीबॉलपटू, महाराष्ट्रातील पहिल्या शूटिंग बॉलच्या महिला टीमची कर्णधार, भालाफेकीत त्या काळचं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रेकॉर्ड, उत्कृष्ट कबड्डीपटू या सगळ्यानंतर सुमारे सत्तर प्रकारचे कलाकौशल्याचे क्लास घेणाऱ्या, ब्यूटीपार्लर क्षेत्रातला सिडेस्कोच्या इंटरनॅशनल कोर्समध्ये दुसऱ्या, स्वत:चं ब्यूटीपार्लर आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करून महिन्याला दीड लाख रू. कमाविणाऱ्या ते महाराष्ट्रातील 22 जिल्हे फिरून 319 महिलांच्या जटांचे निर्मूलन करणाऱ्या, समाजसेवेसाठी महाराष्ट्र फाऊंडेशनसह 117 पुरस्कार मिळालेल्या नंदिनीताई. महिलांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा दूर करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खंद्या कार्यकर्त्या , अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य- पुण्याच्या नंदिनी जाधव या दामिनीची ओळख करून घेऊयात.
सिरॅमिक, ग्लास पेटिंग ते सिडेस्को सेकंड रँकर
सिरॅमिक, ग्लास पेंटिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्टचे क्लासेस त्या घेत होत्या. पुढे त्यांनी आधी स्वत:साठी पार्लरचे कोर्सेस करायचं ठरवलं, मग त्यात शिरून ABTC सारखी व्यावसायिक परीक्षाही दिली. पण हे करताना बायका फारच हातचं राखून शिकवतात, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पुढे त्यांनी या क्षेत्रातला स्वित्झर्लंडचा सर्वोत्तम सिडेस्को कोर्स करायचे ठरवले. तेव्हा “तुला हे जमणार आहे का?” अशी त्यांची खिल्ली उडवली गेली. कुणीतरी आपल्या क्षमतेवर शंका घेतली की त्यात 200 टक्के जीव ओतून सर्वोत्तम कामगिरी करायची हा नंदिनीताईंचा स्वभाव त्यांनी इथंही सिद्ध करून दाखवला. आणि चार महिने उशिरा कोर्स जॉईन करून सिडेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत 99 टक्के गुण मिळवत त्या दुसऱ्या आल्या. आणि त्यांनी पुण्यात Golden Glory Women welfare Foundation या नावाने संस्था सुरू केली.
त्या दरम्यान विधवा महिला, एकल महिला यांना क्राफ्ट त्या मोफत शिकवत होत्या. तर आपलं स्वत:चं पार्लर आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केल्यावर आपण हातचं न राखता आपल्याकडे शिकायला येणाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं, हे त्यांनी ठरवलेलंच होतं. हे करताना नंदिनीताईंचे सामाजिक भान कायम जागृत होते. गरजू महिला आणि मुलींना अतिशय सवलतीच्या दरात त्या पार्लरचे बेसिक आणि एडव्हान्स कोर्स शिकवायच्या, गरीब महिलांना स्वस्त दरात ब्यूटी ट्रीटमेंट द्यायच्या. त्यांची कामाची तळमळ, उत्कृष्ट दर्जा, आपल्या क्षेत्रात सतत अपडेट राहण्याची धडपड या सगळ्यामुळे नंदिनीताईंचा ब्यूटीपार्लरचा व्यवसाय अतिशय उत्तम चालला होता. महिन्याला सुमारे सव्वा ते दीड लाख रू. त्या बारा वर्षांपूर्वी कमवत होत्या.
व्यावसायिक ते अंधश्रद्धा निर्मूलनचा प्रवास
असं सगळं असताना अचानक अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे कश्या काय वळल्यात, असं विचारले असता नंदिनीताई सांगतात, “नाविन्याची आवड आणि समाजसेवेची धडपड, आणि रूढींना प्रश्न विचारणारी बंडखोर वृत्ती मला गप्प बसू देत नाही. अंनिसबद्दलच्या गोष्टी वाचनात येत होत्या, आपणही अंधश्रद्धा निर्मूलन समिती जॉईन करावी असं वाटलं आणि वर्तमानपत्रातील बातमी वाचून 2012 साली मी श्रीपाल ललवाणी सरांना फोन लावला, त्यांनी मला सांगितलं, “आम्ही दर सोमवारी भेटतो. सोमवारच्या मीटिंगला तुम्ही या” त्यावर माझा प्रश्न होता, “अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम तर दररोजच करायला हवे, बुधवारची कशाला वाट पाहायची?” माझ्या प्रश्नावर हसत हसत ललवाणी सरांनी त्याच दिवशी साधना मीडिया सेंटरला मला बोलावलं. तेव्हा ‘जादूटोणाविरोधी कायदा’ व्हायला हवा यासाठीची सह्यांची मोहीम आणि जनजागृती सुरू होती.
पहिल्याच बैठकीत सगळ्यांसोबत गोल बसून गप्पा मारणारे, अतिशय साधे नरेंद्र दाभोलकर सर मला फार भावले. आणि छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांसह अंनिसमधला माझा प्रवास सुरू झाला. यात विज्ञानाचे हातचलाखीचे प्रयोग शिकणं, विवेकी वृत्ती बाळगणं आणि डॉ. आंबेडकर, महात्मा फुले – सावित्रीबाई फुले अश्या सगळ्या समाजसुधारकांच्या कामाबद्दलचं वाचन वाढवणं हे सगळं सुरू झालं. वर्षभरात मी चमत्काराचे प्रयोग करत व्याख्यानात सहभागी होऊ लागले. 16 ऑगस्ट 2013 रोजी पुणे जिल्हा कार्यकर्त्यांच्या शिबिरात मी जळता कापूर जिभेवर ठेवणे असे प्रयोग करून दाखवले. 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घुण हत्या झाली.”
डॉ दाभोलकरांच्या हत्येनंतर…
नंदिनीताई डोळ्यात पाणी आणत सांगतात, “तो दिवस मला आजही जसाच्या तसा आठवतोय. सकाळी घरी बातम्या बघत असताना, ओंकारेश्वरच्या पुलावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले डॉक्टर दाभोलकरच आहेत हे कळल्यावर मी अक्षरश: सुन्न होऊन खाली बसले होते. इतक्या निष्कपट, सदैव लोकांचं भलं चिंतणाऱ्या माणसाचा कोणी कसा काय खून करू शकतं? हे कोडं काही केल्या सुटत नव्हतं. ससूनला पोहोचले, आणि डॉक्टरांचा निष्प्राण देह पाहून टाहो फोडला. हजारो ओळखीचे- अनोळखी लोक हळहळत होते, अश्रू गाळत होते पण कोणीही दगड उचलायची आणि बदला घ्यायची भाषा करत नव्हतं. डॉक्टरांनी दाखवून दिलेल्या विवेकाच्या मार्गावरच चालायचं आहे, हे डोक्याशी पक्कं केलं. आता बाह्य सौंदर्यासाठी नाही तर आंतरिक सौंदर्यासाठी, वैज्ञानिक विचारांच्या प्रसारासाठी काम करायचं. डॉक्टर ज्या गोष्टीसाठी बळी पडलेत, त्यांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. ‘बंदुकीच्या गोळीचं उत्तर कामातून- विवेकवादातून’ हे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी पक्कं ठरवलं, आणि त्या दिवसापासून ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद करून मी पूर्ण वेळ अंनिसची सक्रिय पूर्ण वेळ कार्यकर्ती झाले.”
12 वर्षाच्या मुलीची जटेतून मुक्तता आणि देवदासीपासून बचाव….
डॉक्टरांच्या जाण्यानंतर समाजातल्या अंधश्रद्धा दूर करणं किती गरजेचं आहे, याची पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणीव होत होती. डॉक्टरांच्या जाण्यानंतर नंदिनीताईंनी पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पुस्तकाचं वाचनं, निषेध आंदोलन आणि जनसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र पालथा घातला. शिवाय त्यांनी कामाचा धडाका सुरू केला होता. याच दरम्यान पुण्याच्या जनवाडी परिसरातील एका 12—13 वर्षाच्या मुलीचं देवाशी लग्न लावणार आहेत असं त्यांना समजलं. नंदिनीताई दोन तीन कार्यकर्ते घेऊन जनवाडीत पोहोचल्या. त्या मुलीच्या केसांत जट तयार झाल्याने त्या मुलीचं देवाशी लग्न लावून देण्याचं त्या कुटुंबात घाटत होतं.
नंदिनीताई सांगतात, “केसांत जट तयार होणे हे अस्वच्छता, केसांची निगा न घेणं, एखादा चिकट पदार्थ डोक्याला लागल्यानं होत असतं. मुलीचा देवाशी विवाह लावणं म्हणजे तिला देवदासी बनवणं, हे करू नकात. लेकराचं आयुष्य बरबाद करू नकात हे समजवण्याचा आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत होतो. पण ते लोक ऐकायला तयारच नव्हते, अक्षरश: 27 जण आमच्या अंगावर चालून आले. तेव्हा नुकत्याच झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याचा धाकही दाखवला आणि त्या मुलीच्या आईला समजावले . या सगळ्या त्रासाचं मूळ असलेली या मुलीच्या डोक्यात तयार झालेली जटाच मी काढून टाकते असं आश्वासन दिलं. जटा काढली की देवाचा कोप होतो, जी व्यक्ती जटा कापते तिचा मृत्यू होऊ शकतो, या सगळ्या अंधश्रद्धांना दूर करण्यासाठी मी स्वत: त्या मुलीच्या जटा कापल्या आणि भविष्यातील त्रासापासून तिची सुटका केली.”
4-5 किलो वजनाच्या जटा, उवा-अळ्या आणि दुर्गंधी!
अशी झाली जटामुक्तीच्या नंदिनीताईंच्या प्रवासाची सुरूवात. त्यांचा ब्यूटीपार्लर क्षेत्रातला अनुभव, त्यामुळे बाईची जटा कापताना केस पूर्ण काढून न टाकता त्यांना साजेशी दिसेल अशी केशरचना नंदिनी ताई करून देतात. शिवाय अतिशय प्रेमाने आणि सातत्याने या जटा प्रकरणातल्या अंधश्रद्धांविषयी त्या समुपदेशन करतात. बाईच्या डोक्यावरील जटा कापायला 4/5 मिनिट लागतात, पण तिच्या डोक्यात अंधश्रध्देची रुजलेली जट काढायला सहा/ सात वर्ष समुपदेशन करावे लागते. बाई जोवर स्वत: हून जट काढायला तयार होत नाही, तोवर त्या जबरदस्तीने त्याचे जट निर्मूलन करत नाहीत. मात्र एकदा बाई जट काढायला तयार झाली की गाडी, घोडा, वेळ, सोय कशाचाही विचार न करता कधी बसने, बाईकने, बाईंच्या गावी जाऊन जट काढून देतात. जट डोक्यात बाळगणं सोप्पं नसतं. वर्षानुवर्षे न विंचरलेले, तेलपाणी न केलेले, न धुतलेले केस, त्यांचा गठ्ठा तयार होत असतो. दगडासारख्या गाठी त्यात तयार होतात, उवालिखा,अळ्या, प्रचंड दुर्गंधी असते ते ओझं कधी कधी चार पाच किलोंचं ” 11फूट लांबीच्या जटा बायकांना ते घेऊन जगणं अशक्य होतं.
तिसरीच्या मुलीच्या डोक्यातली जट आणि देवाशी विवाहाची तयारी
पुण्याच्या वेल्ह्यातील घावरगावच्या हर्षा नावाच्या चिमुकलीची तर व्यथाच वेगळी. ती तिसरीत असताना तिच्या डोक्यात जट आली, शाळेत मुली तिच्याशी खेळेनात, अभ्यासात मन रमेना, विचित्र वास यायला लागला म्हणून शाळा बंद झाली. पुढे तिच्या आईने हर्षाचा विवाह देवाशी लावायचा ठरवला असं नंदिनीताईंना कळलं आणि त्या गावात पोहोचल्या. आधी फोनवर बोलूनही प्रबोधन होईना. मग त्या थेट कार्यकर्त्यांना घेवून गावात पोहोचल्या. या मुलीची जट कापली आणि देवाशी होणारं लग्न थांबवलं तर गावावर संकट येईल, असं म्हणत गावकरी आणि मुलीची आई नंदिनीताईंशी वाद घालू लागल्या. नंदिनीताईंनी आधी समजुतीने मग कायद्याचा धाक घालून मुलीच्या डोक्यातली जट काढणं किती गरजेचं आहे हे समजावून सांगितलं. गावानं माघार घेतली, आई मात्र ऐकायला तयार नव्हती. अकरा वर्षांची हर्षा मात्र पुटपुटत होती, “आई मला काढायची आहे ना गं जट, मला खूप त्रास होतो.”
हाच मुद्दा नंदिनीताईंनी उचलून धरला आणि हर्षाच्या आईला मुलीची जट काढण्यासाठी राजी केलं. त्यातही त्या बाईंनी गावाबाहेर रांजणखळगे असलेल्या परिसरात जट काढूयात असा आग्रह धरला. गावाबाहेर सपाट पार्श्वभूमी नसलेल्या ठिकाणी जट काढण्यासाठी कशीबशी खुर्ची ठेवून नंदिनीताईंची कात्री चालायला लागली. अतिशय चिवट झालेले केस, डोक्यात साठलेला कोंडा, घाण आणि ते काढताना हर्षाच्या डोक्यातून निघालेलं उवांचं वारूळ!! हर्षाची आई ते सगळं बघून खालीच बसली. हे काम झालं आणि गाडीतून परत जाताना नंदिनीताईंचा बांध फुटला— केवढंसं ते लेकरू, रूढी- धर्म परंपरा नावाखाली त्या जीवाचे किती हाल! हर्षाच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचलायची तयारी नंदिनीताईंनी दाखवली. आज हर्षा कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
जटा प्रत्यक्ष कापतानाची आव्हानं
जटा कापून काढणं सोप्पं नसतं, कौशल्य तर लागतंच पण सुरवातीला कामाची किळसही वाटते. नंदिनी ताई सांगतात, “सुरूवातीला जेवणही जायचं नाही, पण मग बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी केलेलं काम आठवलं आणि आता माझी नजर मेली आहे. जटा कश्या काढाव्यात याचे ट्रेनिंग मी पार्लरच्या अनेक मुलींना दिले. जट काढताना मला त्या बाईचा जात, धर्म, पंथ काहीच दिसत नाही. जटेचं आणि अंधश्रद्धेचं ओझं तिच्या डोक्यावरून उतरवल्यानंतर, तिचं निखळ हसू हा सगळ्यात मोठ्ठा पुरस्कार वाटतो मला.
अंनिससोबत तृतीय पंथीय आणि जोगतींची साथ
या कामात आता काही तृतीय पंथिय, जोगती मंडळीही माझ्यासोबत मदतीला येत आहेत. महाराष्ट्र जटमुक्त करण्यासाठी मी अशीच कार्यरत राहणार आहे”. हे काम करताना महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ताचा सहभाग या जट निर्मूलनात असतो. मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, मनोहर शेवकरी यांची साथ मला नेहमी लाभते. त्यामुळे मी हे काम करू शकते. अंनिसचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागात काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच जटमुक्त होईल, अशी आशा करूया.
3 Comments
Great work salam tyanchya karyala
अनेकांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून तिच्या आयुष्यात आशेचा किरण बनून जगण्याला नविन दिशा देणाऱ्या नंदीनी ताई आपल्या कार्यास सलाम व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Excellent work by Nandini….hats off to you