निसर्गात एक काम करण्यासाठी, अनेक वेगवेगळे घटक कार्यरत असतात. त्याचवेळी प्रत्येक घटक, इतरही अनेक कामे करत असतो. ह्यामुळे संसाधनांची देवाणघेवाण होत असते. अशा जेवढ्या जास्त साखळ्या तयार होतील तेवढी, लवचिकपणे टिकून राहणारी सिस्टिम तयार होते. जंगलात गवत आणि इतर वनस्पती सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून अन्न तयार करतात. वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर तृणभक्षी आणि इतर प्राणी जगतात. त्याचप्रमाणे पक्षीही फळे, कीडे-कीटक इत्यादी खाऊन जगतात. पशुपक्ष्यांच्या विष्ठेतून आणि मूत्रातून तसंच सर्व सजीव मेल्यानंतर त्यांच्या पेशींच्या विघटनातून, त्यांनी निसर्गातून घेतलेले अन्नघटक पुन्हा व्यवस्थेत परत येतात. हे निसर्गाचं सहजीवनाचं चक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी पर्माकल्चर व्यवस्थेतही गाईगुरे, कोंबड्या, शेळ्या, डुक्कर, मासे, मधमाशा इत्यादी पाळले जातात. उपलब्ध संसाधने, हवामान, संस्कृती आणि उद्देश ह्यांच्यावर प्रत्येक प्रोजेक्टची डिझाईन अवलंबून असते.
पशुपालनाचे फायदे
1. जमिनीची सुपीकता वाढवणे
जनावरांची विष्ठा आणि मूत्र नत्र, स्फुरद आणि पालाश ह्यांनी युक्त असतं. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. कोंबड्या आणि बदकांसारखे पक्षी आपल्या नखांनी जमीन वरचेवर उकरतात, ज्यामुळे वनस्पतींच्या मुळ्यांजवळ हवा खेळती राहण्यास मदत होते.
2. कीड व्यवस्थापन
कोंबड्या खासकरून जमिनीवरील अळ्या, गोगलगायी आणि शंख इत्यादी खातात व बदके पाणथळ जागेतील कीटक, मच्छर, तणांच्या बिया इत्यादी खाऊन कीडनियंत्रणाचं मोलाचं काम करतात. आमच्या कोंबड्या किमान काही तास जनावरांच्या गोठ्यात फिरतात अशी व्यवस्था केली आहे, त्यामुळे जनावरांच्या अंगावर असलेल्या गोचीड वगैरेंचं चांगलं नियंत्रण होतं.
3. अन्न
गाईगुरे, मासे, डुक्कर,कोंबड्या, बदके आणि पक्षांची अंडी हे सर्व आपल्या सर्वांसाठी अत्यावश्यक असलेल्या स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहेत. जनावरांचे दूध आणि त्यापासून बनवता येणारे पदार्थ हा स्निग्ध पदार्थांचा चांगला, शाश्वत आणि सहज पुनर्निर्माण करता येण्यासारखा स्रोत आहे.
4. परागीभवनात मदत
मधमाशापालन केल्यास अन्न मिळण्यासोबत परागीभवनात मदत होऊन फळांचे व भाज्यांचे उत्पादनही वाढते.
5.जमिनीचे व्यवस्थापन:
शेळ्या, मेंढ्या आणि गाईम्हशी गवत आणि तण खाऊन त्यांचं नियंत्रण करतात.
पशुपालनाचे फायदे बरेच असले तरी पर्माकल्चरमध्ये माणसांची काळजी आणि निसर्गाची काळजी ही मूल्ये महत्वाची आहेत. तेव्हा कोणत्याही पाळीव प्राण्याला आनंदाने जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते पुरविणे किंवा व्यवस्थेमध्ये आपोआप मिळेल हे पाहणे हे माणसाचे काम आहे. ह्यातले काही महत्वाचे घटक पुढीलप्रमाणे:
1.जागा
कोंबड्या, गाईगुरे, मासे इत्यादी सर्वांना त्यांच्या संख्येच्या आणि पशुपालनाच्या पद्धतीनुसार विशिष्ट प्रमाणात मोकळी जागा मुक्तसंचारासाठी हवी असते. त्यासाठी विशिष्ट भाग मोकळा सोडता येईल किंवा विशिष्ट वेळात प्राणीपक्षांना मोकळं सोडता येईल. बी-बियाणे, भाजीपाला, लहान वनस्पती ह्यांना अशा मोकळ्या फिरणाऱ्या प्राण्यांपासून धोका होणार नाही हेही पाहावे लागेल. आम्ही सध्या दुपारी 1 ते 6 एवढ्या वेळात आमच्या कोंबड्यांना मोकळं सोडतो. बाकीच्या वेळात त्या त्यांच्यासाठी बांधलेल्या शेडमध्ये किंवा कंपाऊंड मध्ये बंदिस्त असतात. ज्यावेळी कोंबड्या मुक्तपणे वावरत असतात त्यावेळी कुत्र्यांना मात्र बांधून ठेवावे लागते.
2. निवारा
प्रत्येक पाळीव प्राण्याला ऊन, वारा, पाऊस इ. आणि त्यांच्या भक्षकांपासून संरक्षणासाठी निवारा आवश्यक असतो. तो आपल्या डिझाइनमध्ये लक्षात घेतला पाहिजे. आपल्या किंवा आपल्या शेतावर राहणाऱ्या कामगारांना दिवसातून किमान एक दोनदा तरी तिथे लक्ष ठेवण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी, अन्न देण्यासाठी आणि अंडी वगैरे आणण्यासाठी जावे लागतेच. तेंव्हा ह्या निवाऱ्याची व्यवस्था झोन 0 किंवा झोन 1 मध्ये करावी लागते. कितीही काळजी घेतली तरी काही प्रमाणात प्रत्येक पाळीव प्राण्याला त्यांचा विशिष्ट गंध असतोच त्याबरोबर जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही असते. तेंव्हा पशुपालनातून तयार होणारे सेंद्रिय पदार्थ, घाण पाणी हे पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात येणार नाही हे पहावे लागते.
आमच्याकडे कृषीपर्यटनासाठी पर्यटक येतात. प्रत्येकाला गुरांच्या गोठ्यातून किंवा कोंबड्यांच्या खुराड्यातून येणारे वास, आवाज आवडतीलच असे नाही तेंव्हा पर्यटकांच्या निवाऱ्यापासून दूरवर आणि आमच्या घराच्या जवळ त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची व्यवस्था घराच्या दक्षिणेला थोड्या अंतरावर असल्याने त्यावरून येणारा गंध थेट घराकडे येत नाही.
3. अन्न आणि पाणी
प्राण्यांच्या गरजेनुसार पुरेसे स्वच्छ पाणी आणि पोषक अन्न व्यवस्थेमध्ये तयार होत राहील हे पाहावे लागते. सुरुवातीला बाहेरून आणून पुरवायचे असेल तर त्यासाठी खर्चाची तरतूद करावी लागेल.
4. कचरा
पशुपालनातून जो कचरा निर्माण होतो तो जवळजवळ सर्व खत म्हणून शेतात वापरता येतो पण त्यासाठी तो गोळा करण्याची किंवा जागेवर कंपोस्ट करण्याची व्यवस्था करावी लागते. पाळीव प्राण्यानुसार त्यासाठी किती सुका कचरा लागेल हेही पहावे लागते. गाईगुरांचे मूत्र जमा करण्यासाठी व्यवस्था करावी लागते.
5. वेळ आणि काळजी
पाळीव प्राणी त्यांच्या गरजांसाठी पूर्णपणे माणसांवर अवलंबून असतात तेंव्हा एकदा का व्यवस्थेमध्ये त्यांचा समावेश केला की वर्षाचे 365 दिवस त्यांची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. तेंव्हा काही आवश्यक कामांसाठी आपल्याला शेत सोडून जावे लागते तेंव्हा पाळीव प्राण्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावीच लागते. दुभते जनावर असेल तर रोजच्या रोज दिवसातून दोनदा त्यांना पाजावेच (म्हणजे त्यांचे दूध काढणे) लागते. ह्या सर्वांची तयारी आधीपासूनच करावी लागते.
6. कायदे
आपलं शेत जिथे आहे तिथे पशुपालनासंदर्भातील कायदे काय आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. उदा. आपण महाराष्ट्रात असू तर गोहत्याबंदी कायदा लागू आहे. इथे गरजेपेक्षा जास्त गाईबैलांचं उत्पादन झालं तर ते नुकसानकारक ठरेल. याउलट जर आपण गोव्यात असू तर मात्र गोवंशाचं अतिरिक्त उत्पादन हे उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. कोणते प्राणी, पक्षी पाळू शकतो ह्याबाबतीत कायदे काय आहेत त्याची माहिती आधीच घेणे नेहमीच श्रेयस्कर ठरते.
एकूण, व्यवस्थेत पाळीव पक्षी आणि जनावरे व्यवस्था लवचिक ठेवण्यासाठी, अतिरिक्त उत्पादन मिळवण्यासाठी आणि विविधता वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडतात पण त्याचवेळी काही जबाबदाऱ्याही वाढवतात. पर्माकल्चर, ह्या सर्वांचा साकल्याने विचार करून, व्यवस्थेत सामावून जाईल एव्हढ्याच प्रमाणात पशुपालन करणं सुचवतं आणि माणूस म्हणून विश्वस्ताची जबाबदारी आपल्या खांद्यावर देतं.
2 Comments
खूपच मार्गदर्शन पर माहिती मिळाली.
धन्यवाद समीर.
थोडक्यात पण महत्त्वाचे सर्व मुद्दे छान मांडले आहेत. धन्यवाद