भारत हा कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या महत्त्वाच्या देशांच्या यादीत जागतिक पातळीवरील क्रमवारीत अमेरिका, जपान व चीन यांच्या खालोखाल चौथ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील कीटकनाशक क्षेत्रात मुख्यत: तीन प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो.
बहुराष्ट्रीय कंपन्या – जगातील प्रमुख आणि नावाजलेल्या कीटकनाशक कंपन्यांपैकी बहुतेक सर्वच भारतात व्यवसाय करत आहेत. उदा. Syngenta, Bayer CropScience, Monsanto (आता Bayer मध्ये समाविष्ट), BASF, Dow, Du-Pont, Cheminova (आता FMC मध्ये समाविष्ट), Isagro इत्यादी
भारतीय कंपन्या – भारतीय उद्योजकांनी चालू केलेल्या लहान, मध्यम, मोठ्या क्षमतेच्या आणि नंतर बहुराष्ट्रीय स्तराला गेलेल्या अनेक कंपन्या आहेत. उदा. Rallis, Nagarjuna (NACL), Excel Crop care (आता Sumitomo मध्ये समाविष्ट), De-Nocil, Dhanuka, Indofil, UPL, Crystal, Gharda Chemicals इत्यादी
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या – Hindustan Insecticides Limited (HIL)
या सर्वच कंपन्या तीन प्रकारची कामे करतात. यातील पहिले काम म्हणजे प्रामुख्याने तांत्रिक स्तराच्या (Technical grade) कीटकनाशकांची, म्हणजेच बाजारात विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमध्ये असलेल्या मूळ रासायनिक घटकांची निर्मिती करणे, दुसरे काम तांत्रिक ग्रेडपासून वापरास योग्य अशा स्वरूपात असलेल्या (Commercial grade) कीटकनाशकांची निर्मिती करणे आणि तिसरे काम म्हणजे वापरासाठी तयार कीटकनाशकांची बाजारात विक्री करणे.
यापैकी पहिल्या दोन प्रकारच्या कामांमध्ये रसायनशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी, उत्पादन अभियांत्रिकी या क्षेत्रांमधील ज्ञान आणि अनुभव असलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच तिसऱ्या म्हणजे विक्रीच्या कामामध्ये विक्री व्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापन अशा क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव असलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ही सर्व उत्पादने कृषी क्षेत्रात वापरली जात असल्यामुळे कृषी पदवीधर तसेच कृषी उद्योग व्यवस्थापन, ग्रामीण व्यवस्थापन या विषयांचे ज्ञान असलेल्या युवकांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.
भारतातील कीटकनाशक उद्योगांचे महत्त्व
कीटकनाशक उद्योग समूह हा भारतीय अर्थव्यवस्थेमधील एक महत्त्वाचा उद्योग आहे. वाढती लोकसंख्या, अन्नधान्याची वाढती मागणी, कीटकांमुळे होणारे पिकांचे मोठे नुकसान, अन्य अनेक देशांच्या तुलनेत भारतातील प्रति हेक्टरी कीटकनाशक वापराचे कमी प्रमाण आणि त्यामुळे कीटकनाशके वापरुन शेतीमधील उत्पादन वाढविण्याची संधी इत्यादि बाबींमुळे कीटकनाशक उद्योगांची महत्त्व वाढत चालले आहे. भारतात जगातील एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या सुमारे 16 टक्के अन्नधान्य उत्पादन होते. आणि ते करताना जगाच्या एकूण कीटकनाशक वापरामधील केवळ 2 टक्के कीटकनाशके वापरली जातात.
भारतात दरवर्षी होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीची अंदाजित रक्कम सुमारे 90 हजार कोटी रुपये असते. हे नुकसान कमी करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने कृषी रसायने आणि कीटकनाशके वापरण्याची आवश्यकता आहे. भारतातील या उद्योगांना भारतातील कृषी क्षेत्राची मोठी बाजारपेठ तसेच जगभरात निर्यातीची बाजारपेठ उपलब्ध आहे. सध्या भारतातील कीटकनाशक उद्योगांची वार्षिक उलाढाल सुमारे 26 हजार कोटी रुपये इतकी आहे. ही उलाढाल भारतातील एकूण रासायनिक उत्पादन क्षेत्राच्या सुमारे 2 टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचा वार्षिक वाढीचा दर सुमारे 13 टक्के राहिलेला असून सध्या हे उद्योग वार्षिक सरासरी 6 ते 8 टक्के दराने वाढत आहेत. भारतातील अन्य उद्योगांच्या तुलनेत हे प्रमाण चांगले आहे. तसेच भारतीय कीटकनाशक उद्योगांनी निर्यात वाढीचा वार्षिक दर सुमारे 15 टक्केच्या आसपास ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
हे ही वाचा : खत उत्पादन आणि वापराच्या जागतिक नकाशावर भारत
भारतातील कीटकनाशक उद्योग: व्यावसायिक वातावरणाची वैशिष्ट्ये
भारतातील कीटकनाशक उद्योगांच्या कामाचा आवाका आणि कामाची पद्धत समजावून घेण्यासाठी इथले व्यावसायिक वातावरण कसे आहे, ते समजावून घेणे आवश्यक आहे.
उत्पादन क्षमतेचा मोठा पाया – भारतात कीटकनाशक उत्पादन करण्यासाठी आवश्यक निर्मिती क्षमतेचा मोठा पाया उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते. इतर प्रगत देशांमध्ये संशोधित होणारी नवी रासायनिक उत्पादने व्यावसायिक पातळीवर उत्पादित करून निर्यात करण्याची भारतीय उद्योगांना मोठी व्यावसायिक संधी आहे. अनेक भारतीय उद्योग त्या संधीचा फायदा घेत आहेत.
उत्पादनांची मर्यादित संख्या – उत्पादन क्षमता भरपूर असूनही एकूण उत्पादनांची संख्या मात्र कमी आहे. म्हणजेच, काही ठराविक उत्पादनेच मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात. प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील उत्पादनांमध्ये विविधता कमी आहे.
निर्यातीवर भर – उत्पादनाचा मोठा हिस्सा निर्यात केला जातो.
उच्च गुणवत्ता मानके – निर्यातक्षम उत्पादने निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली उच्च गुणवत्ता मानके आणि त्यानुसार निर्मिती करण्याची क्षमता उपलब्ध आहे.
कीटकनाशक वापराबद्दल जागरूकता – कीटकनाशकांचा वापर करण्याबद्दल जागरूकता आणि जाणीव वाढत आहे. यामध्ये कीटकनाशके वापरण्याची आवश्यकता, ती वापरण्याची शास्त्रीय पद्धत आणि ती वापरताना घेण्याची काळजी या सर्वच बाबींचा समावेश होतो. यांचा एकत्रित परिणाम कीटकनाशकांचा वापर वाढण्यात होत आहे.
खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन – कीटकनाशक वापर शेतकरी वर्ग करतो. शेतीमधील उत्पादन आणि त्याच्या विक्रीमधून मिळणारे उत्पन्न हंगामी स्वरूपाचे असते. त्यामुळे अनेकदा कीटकनाशक विक्री उधारीवर करावी लागते. त्यामुळे विकलेल्या उत्पादनांची किंमत वसूली आणि एकंदरीतच खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन करणे, हे एक मोठे आव्हान असते.
हे ही वाचा : कीटकनाशके आणि कृषी रसायने
सोपे उत्पादन तंत्रज्ञान – कीटकनाशक उत्पादन करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान अन्य औद्योगिक उत्पादनांच्या तुलनेत सोपे आहे. त्यामुळे नवीन उत्पादन केंद्र चालू करणे किंवा अस्तित्त्वात असलेल्या उत्पादन केंद्राची उत्पादन क्षमता वाढवणे तुलनेने सोपे आणि कमी खर्चाचे आहे.
उद्योगांना सुलभ प्रवेश – तंत्रज्ञान सोपे असल्यामुळे एखाद्या नवीन कंपनीला कीटकनाशक उत्पादन चालू करणे इतर क्षेत्रांच्या तुलनेने सुलभ आहे. त्यामुळे अनेक लहानमोठ्या कंपन्या या उद्योगात आहेत. याचा चांगला परिणाम म्हणजे ठराविक उत्पादकांची मक्तेदारी राहण्यापेक्षा अनेक कंपन्यांची स्पर्धा असल्यामुळे गुणवत्ता राखून उत्पादनांची किंमत कमी राखण्याकडे त्यांचा कल राहू शकतो. पण याच गोष्टीचा वाईट परिणामसुद्धा आहे. सोप्या तंत्रज्ञानामुळे भेसळयुक्त, बनावट किंवा कमी दर्जाची उत्पादने बाजारात आणणेसुद्धा सोपे होते. त्यामुळे अशा बनावट कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार होतात.
ग्रामीण दळणवळण: दळणवळणाच्या साधनांच्या जलद विकासामुळे ग्रामीण बाजारपेठांमध्ये उत्पादने जलद पोहोचविण्यास मदत होत आहे.
लेखाच्या पुढील भागात आपण भारतातील कीटकनाशक उद्योगसमोर असलेली आव्हाने आणि विकासाच्या संधी यांची माहिती घेऊ.