इराण आणि इस्रायल मध्ये युद्धाचे वारे वाहायला लागले आणि भारतीय शेअर बाजाराला पडायला शेवटी एक कारण मिळालं. याआधी अशी पडझड युक्रेन आणि रशिया युद्धाच्या वेळी झाली होती.
अशा वेळी गुंतवणूक सल्लादारांचे फोन खणखणत असतातच, तसाच आलेला एका क्लायंटचा फोन –
“अरे चारू, मार्केट पडतंय..”
” बर मग…?” त्याच्या वाक्यावर माझा तितकाच शांत रिप्लाय.
“आपल्याला काहीतरी अॅक्शन घ्यायला पाहिजे”- इति क्लायंट.
“तुझी अॅक्शन घ्यायची इच्छा असेल तर दोन ऑप्शन आहेत – एक म्हणजे झाला आहे तो प्रॉफिट बुक करायचा” माझा पहिला सल्ला
“अरे पण आठवड्याभरापूर्वी 25% रिटर्न दिसत होते आता 22% दिसतायत, परत 25% मिळाले की विकूया” – क्लायंट
“बरं मग मार्केट पडतंय तर अजून इन्वेस्ट करूया” – माझा दुसरा सल्ला
“नाही नाही, आता नको, मार्केट अजून पडलं तर..?” क्लायंटची लगेच माघार.
“बघ म्हणजे तुझ्या अॅक्शनच्या प्रश्नाचं तूच उत्तर दिलंस. अशा परिस्थितीत बेस्ट ऑप्शन आहे – नो अॅक्शन. आपण 8 महिन्यांपूर्वी SIP सुरू केली होती 10 वर्षांसाठी, मग अजून एक वर्ष सुद्धा नाही झालं आणि तू पॅनिक झालास ? उलट हीच खरी वेळ आहे, ज्याच्यात तुझ्या SIP खालच्या किंमतीत जास्त युनिट्स मिळवून देतायत. जे भविष्यात तुला मोठा फायदा करून देतील.” फोन कॉल समाप्त.
लोभ आणि भीतीचा बाजार
शेअर बाजार म्हणजे भीती (fear) आणि लोभ (greed) याचा सगळ्यात मोठा खेळ. 12% च्या अपेक्षेने सुरू केलेली गुंतवणूक – 22% मिळत असले – तरी 25% हवेत हा लोभ आणि खरं म्हणजे मार्केट खाली असताना नवीन गुंतवणूक करायच्या ऐवजी मार्केट अजून खाली जाईल ही भीती, अशी परिस्थिती नेहमीच बघायला मिळते.
कळतं पण वळत नाही
“शेअर मार्केटच्या उतार चढावातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय, आपला पोर्टफोलिओ सोन्यासारखा लखाखत नाही” हे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे अलिखित सूत्र आहे. यातून वॉरन बफे असो नाहीतर राकेश झुनझुनवाला कोणीही वाचलेलं नाही. अर्थात, हे सूत्र गुंतवणूक करताना बहुतेक सगळ्यांनाच कळतं, पण त्यानंतर सगळ्यांना वळतच असं नाही.
म्युचुअल फंड आणि मार्केट परस्पर संबंध
म्युचुअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर मार्केटशी समांतर असल्यामुळे त्यातील चढ-उतारा प्रमाणे गुंतवलेल्या रकमेचे वर्तमान मूल्य हे गुंतवलेल्या रकमेच्या खाली देखील जाऊ शकते ही गोष्ट पचनी पडायला फार वेळ लागतो. कितीही समजत असलं तरी जसं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तसेच म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याशिवाय मार्केट मधील चढ उतार पचवता येत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे गुंतवणूक ही कायम FD, NSC सारख्या पर्यायांमध्ये करायची सवय असल्यामुळे मार्केटची रिस्क घेण्याची आणि ती पचवण्याची क्षमता बोथट झालेली असते.
गुंतवणुकीला वाढण्यासाठी संयम, वेळ द्या
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चढ उेतार आपल्याला मुख्य उद्देशाकडून भटकवून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडतात. आता वरील उदाहरणच बघितलं तर समजेल – 50,000 दर महिन्याची SIP सुरू करताना 12% वार्षिक परतावा मिळेल आणि 10 वर्षे सलग गुंतवणूक केली की त्यातून साधारण 1 करोड 10 लाखाच्या आसपास मुद्दल उभी होईल. हे सर्व calculation समजून केलेली ही गुंतवणूक. अर्थातच शेअर मार्केटच्या गेल्या 7-8 महिन्यांच्या वाढत्या आलेखामुळे परतावा अपेक्षेपेक्षा चांगला मिळतोय. पण गुंतवणूक करून अजून एक वर्ष देखील झालेले नाही, बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.त्यात असे कितीतरी चढ उतार पार करायचे आहेत. अशा वेळी गुंतवणुकीला वाढण्यासाठी आणि शेअर बाजारातली अस्थिरता पचवण्यासाठी किमान पाच वर्षे देणे आवश्यक आहे. आपला गोल आणि अँक्शन प्लॅन याकडे दुर्लक्ष करून वेगळाच रस्ता पकडणे म्हणजे “नजर हटी – दुर्घटना घटी” याला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या चढ उताराकडे थोडं दुर्लक्ष करणे बऱ्याचदा फायदेशीर ठरतं. आणि अशा अस्थिर वातावरणात गुंतवणूक सल्लागार तुम्हाला सगळ्यात योग्य सल्ला देऊन चुकीच्या ऍक्शन घेण्यापासून वाचवू शकतो.
युद्ध, इतर देशांच्या आर्थिक धोरणातील बदल, भारतातील विविध राज्यात होणारी इलेक्शन, बजेट यासारख्या कित्येक कारणांमुळे शेअर बाजारातील चढ उतार चालूच राहणार अशा वेळी त्या लाटांच्या तडाख्यात गटांगळ्या खायच्या की स्थितप्रज्ञ सर्फर सारखं त्या लाटेवर सवार होऊन त्याचा आनंद लुटायचा ही गोष्ट तुमच्याच हातात आहे….
1 Comment
Very well written… keep writing