हनुमान रामायणातील वानर नायक आणि लोकप्रिय हिंदू देव आहे. त्याचे साहित्यिक नाव हनुमत असून त्याचे बोली रूप हनुमान होते आणि तेच विशेष प्रसिध्द आहे. अयोध्येच्या रघुवंशातील राजा दशरथाचे पुत्र श्रीराम व लक्ष्मण यांना चौदा वर्षांचा वनवास पत्करावा लागतो. पुढे वनवासात असताना लंकेच्या रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर हनुमान सीतेच्या शोधात श्रीरामाला मदत करतो. रामायणाच्या किष्किंधा कांडामध्ये सीतेच्या शोधासाठी लंकेला गेला असताना, साहित्यिक नायक म्हणून प्रकट होतो. रामायणाच्या जवळजवळ सर्व आवृत्त्यांमध्ये हनुमान श्रीरामाचा सहकारी, प्रतिबिंब, सेवक, मार्गदर्शक, तत्वज्ञ आणि मित्र म्हणून दिसतो. हनुमान रामाचा दास असून तो नवविधा भक्तिपैकी दास्यभक्तीचे उदाहरण म्हणून प्रस्तुत केला जातो.
वैष्णव सांप्रदायात्व दैवत्व
दक्षिण भारतात चोळ काळातील तमिळ कवी कंबरने त्यांच्या रामायणात राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना अनुक्रमे विष्णू, लक्ष्मी, आदिशेष, शंख व चक्र यांचे रूप मानले आहे. ही देवत्वाकडे नेणारी प्रक्रिया मध्ययुगीन भक्ती चळवळीची उपज आहे. त्याच अनुषंगाने पुढे विजयनगर साम्राज्याच्या काळात हनुमानाचे वैष्णव संप्रदायामध्ये दैवत्व प्रस्थापित झालेले दिसते. या प्रक्रियेमध्ये हनुमानाला एक विशेष बहुमुखी रूप देण्यात आले. पाच मुख आणि अनेक (दहा) हातांसह असलेला हनुमान. यावरच आजचा लेख आधारित आहे.
हजारो सूर्याचे तेज असणारे डोळे
पंचमुखी हनुमानाची मूर्तिशास्त्रीय वैशिष्ट्ये 19व्या शतकातील श्रीतत्त्वनिधी ग्रंथात सविस्तर दिलेली आहेत. सुदर्शन संहितेतील पंचमुखी हनुमानाचा ध्यान श्लोक श्रीतत्वनिधी ग्रंथात मूळ स्त्रोत म्हणून उधॄत केला आहे. त्या श्लोकानुसार, हनुमान “पंचमुखी” असून त्याचे रूप अत्यंत भयंकर आहे. त्याच्या प्रत्येक मुखाला तीन डोळे आहेत म्हणजेच त्याला एकूण पंधरा डोळे आहेत. हे डोळे हजारो सूर्य एकत्रितपणे प्रकाश देतात त्याइतके तेजस्वी आहेत.
विविध दुष्टशक्तीशी लढणारी पाच वेगवेगळी मुखे
हनुमानाचे हे पाच चेहरे वेगवेगळ्या प्राण्यांची रूपे आहेत. वानराचा चेहरा मध्यभागी असून, उजव्या आणि डाव्या बाजूस अनुक्रमे नरसिंह आणि वराहाचे चेहरे आहेत. मागील बाजूस गरुड आणि वरच्या बाजूस घोड्याचा चेहरा आहे. या चेह-यांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिले आहे. ह्या पंचमुखी हनुमानातील वानरमुख असलेला देव अत्यंत शक्तिशाली असून त्याचे दात बाहेर आलेले आहेत. त्याच्या भुवया एकत्र झालेल्या आहेत. नरसिंहाचे मुख आश्चर्य आणि विस्मय जागवते, कारण ते तेजःपुंज आहे. हे मुख शत्रूंमध्ये भीती निर्माण तर करतेच पण भक्तांना मात्र भयमुक्ती प्रदान करते. गरुडरूपाचे नाक टोकदार आणि चेहरा तेजस्वी आहे. हे रूप विषप्रभावापासून संरक्षण करते आणि राक्षसी शक्तींपासून बचाव करते. वराहरूप काळ्या रंगाचे असून त्याची त्वचा तेजस्वी असते. ते सर्व राक्षसी शक्तींवर नियंत्रण ठेवते आणि ताप-ज्वराचे निवारण करते.
पंचमुखी हनुमानाच्या हातात पुढीलप्रमाणे शस्त्रे आहेत: तलवार, खट्वांग, पाश, अंकुश, हार, वृक्ष, गोमुद्रा, आणि मुण्ड (कपाळ). प्रस्तुत ध्यानश्लोकात फक्त आठ वस्तूंचा उल्लेख असला तरी दुसऱ्या एका ध्यानश्लोकात पुढील दहा वस्तू शस्त्रे म्हणून उल्लेखिल्या आहेत: खड्ग (तलवार), खेतक (ढाल), पुस्तक, अमृतकलश, अंकुश, हार, हल (नांगर), खट्वांग, साप, आणि वृक्ष.
उत्तर आणि दक्षिणेतील मूर्तींमधील वेगळेपण
पंचमुखी हनुमानाच्या वर दिलेल्या मूर्तिशास्त्रीय वर्णनातून दिसते की, वैकुंठ-चतुर्मूर्ती, उत्तर भारतात प्रसिद्ध विष्णूचे रूप आणि सदाशिवाचे पंचमुखी रूप यांची एकत्रीकरण पंचमुखी हनुमानाच्या रूपात दिसून येते. शिवाशी निगडित असलेले तीन डोळ्यांचे वैशिष्ट्य येथे आढळते. हनुमानाच्या या रूपात दिसणारी खट्वांग, पाश, अंकुश, साप, मुण्ड ही शस्त्रे मुख्यत्वेकरून शिवाशी संबंधित आहेत. दुसरीकडे, वानर (हनुमान), गरुड (विष्णूचे वाहन), वराह (विष्णूचा तिसरा अवतार), घोडा (हयग्रीव, विष्णूचा अंशावतार) इत्यादी प्रजाती पंचमुखी अंजनेयाच्या चेह-याच्या रूपात दिसतात. त्या सर्व वैष्णव परंपरेशी संबंधित आहेत. मात्र, लक्षवेधी गोष्ट म्हणजे विष्णूशी संबंधित पारंपरिक शस्त्रे म्हणजेच शंख, चक्र, गदा, पद्म मात्र पंचमुखी हनुमानाच्या या रूपात आढळत नाहीत. बलरामाशी संबंधित असलेले हल आणि त्रिविक्रमाशी संबंधित असलेले खड्ग-खेतक पंचमुखी हनुमानाशी संबधित आहेत. मात्र ती देखील केवळ वैष्णव संप्रदायाची नाहीत.
यावरूप असे नक्कीच म्हणता येईल की पंचमुखी अंजनेयाच्या रूपात शिव आणि विष्णू या दोघांच्या वैशिष्ट्यांचा समन्वय झालेला आढळतो. पण त्यात शैवचिन्हे अधिक ठळक आहेत. मूळतः अंजनेय हा एक गौण वैष्णव देव आहे, पण येथे त्याला एक श्रेष्ठ देव मानून शिवाच्या समकक्ष स्थान दिले गेले आहे.
हेही वाचा – शिवलिंग संकल्पना आणि स्वरुप
विजयनगर साम्राज्यात हनुमान उपासनेस महत्त्व
पंचमुखी अंजनेयाचे रूप उत्तर भारतीय मूर्तिकलेच्या परंपरेत अत्यंत लोकप्रिय झाले आहे. दक्षिण भारतात रामायण कथानकाची मूर्तिशिल्पांत सुरुवात मध्ययुगीन काळात झाली, उदाहरणार्थ बादामी, पट्टडक्कल आणि एलोरा येथील मंदिरे. एलोराच्या सुंदर्कांडातील एका दृश्यात लंकेत श्रीरामाच्या सभेत हनुमान दिसतो. तथापि, ही सर्व चित्रे दुर्मिळ आणि लघुरूपात आहेत. फक्त चोल व होयसळ काळापासूनच रामकथा व्यापक प्रमाणात कलात्मक माध्यमांतून दिसून येते. चोल कांस्यमूर्त्यांत श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे चित्रण आहे. श्रीराम किंवा हनुमान यांना समर्पित मंदिरे विजयनगर काळानंतरच प्रकट झाली, जसे की हजारा रामस्वामी मंदिर, विजयनगर किंवा तमिळनाडूमधील वडुवूर, कुंभकोणम्, नीडमंगलम्, मधुरांतकम वगैरे ठिकाणांतील मंदिरे. येथे रामकथेचे दृश्यचित्रण मोठ्या प्रमाणात आढळते. यावरून असे दिसते की राम (आणि त्याच्याशी निगडित हनुमान) उपासना विजयनगर काळात रूढ झाली.
के.सी. आर्यन यांच्या संग्रहालयात पंचमुखी हनुमानाच्या विविध मूर्ती आणि चित्रे जतन केलेली आहेत. ह्या मूर्ती आणि चित्रे “Hanuman in Art and Mythology” या ग्रंथात प्रसिध्द झालेली आहेत. ह्यातील बहुतेक चित्रे राजस्थान व नेपाळ येथील असून बहुतांश 17व्या शतकानंतरची आहेत. तसेच काही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आहेत. या मूर्ती दगड, कांस्य किंवा लाकूड यांत साकारल्या आहेत.