पिकं कापण्याचा किंवा पिकं काढणीचा काळ म्हणजे सुगी. शेतकऱ्यांसाठी सुगीचा काळ हा त्यांच्या कष्टाचं फळ देणारा असतो. म्हणूनच आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत सुगीचा काळ अनेक सण-उत्सव, परंपरा याद्वारे फार थाटामाटात साजरा केला जातो. निसर्गाचे आणि देवाचे आभार मानून धनधान्य-समृद्धी साजरी करणे हाच ह्या सण-उत्सव आणि परंपरांमागील मूळ उद्देश आहे. मकरसंक्रांत, तामिळनाडूमधील पोंगल, आसाममधील बिहू, हे भारतातील सुगीशी संबंधीत साजरे केले जाणारे काही प्रमुख सण आहेत.
कापसाचा पहिला वेचा
विदर्भात प्रामुख्याने कापसाचे पीक घेण्यात येते. म्हणूनच विदर्भ महाराष्ट्रात “कॉटन बेल्ट” म्हणून ओळखला जातो. कापसाला विदर्भात “पांढरं सोनं” म्हणतात. कारण हे इथलं प्रमुख नगदी पीक आहे. खरीप पीक असल्याने कापूस लागवड पावसाळ्यात जून-जुलैमध्ये केली जाते. कापूस कापणी साधारण ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. यावेळेस कापसाची बोंडे तयार होऊन फुटतात आणि त्यातून पांढरा कापूस दिसू लागतो. याच वेळी कापसाचा पहिला वेचा वेचण्यापूर्वी विदर्भात ‘सीतादही’ नावाचा छोटासा विधी केला जातो. त्याशिवाय कापसाचे एकही बोंड वेचले जात नाही.
काळ्या आईची पूजा आणि दही-भात
साधारणपणे सीतादहीचा मुहुर्त दसऱ्याला काढतात किंवा कापसाची बोंडे तयार होऊन फुटल्यानंतरच्या एखाद्या बुधवारी, सोमवारी, शुक्रवारी, गुरुवारी मुहूर्त काढतात. सीतादही विधीच्या दिवशी कापसाच्या शेतात पाणी शिंपडून शेताची विधीवत पूजा करतात. नारळ फोडून विडा आणि सुपारी ठेवतात. शिजवलेल्या भातात दही आणि साखर कालवून त्याचा नैवेद्य दाखवितात. नंतर नैवेद्याचा दहीभात शेतात सर्वत्र शिंपडतात. धरणीची म्हणजेच काळया आईची पूजा हाच यामागचा उद्देश आहे. काही ठिकाणी चुलीवर दूधाने भरलेले पातेलं ठेवून दूध ऊतू दिले जाते. दूध उतू जाणे हे शुभ मानले जाते आणि भविष्यात आर्थिक लाभ सूचित करते. याकारणास्तव काही ठिकाणी दूध उतू दिले जाण्याची पद्धत पडली असावी.
कापसाच्या बोंडाचे बाळ आणि कोऱ्या कापडाचा पाळणा
यावेळी केली जाणारी विशेष प्रथा म्हणजे पऱ्हाटीला करगोटा आणि कोऱ्या कापडाचा पाळणा करून बांधतात. बोली भाषेत पऱ्हाटी म्हणजे कापसाच्या झाडाचे काड. कापसाच्या फुलाला किंवा बोंडाला उलटे करून त्याला काडीचे हातपाय करतात. अशी कापसाच्या फुलाची बाहुली करुन तिला झोपाळ्यात झोपवतात. नंतर पाळण्याची आणि त्या कापसाच्या बाळाची पूजा करतात. भूमीच्या सुफलनाशी संबंधीत असलेला हा विधी कापूस वेचण्यापूर्वी केला जातो.
सीतादही हे नाव कसं पडलं असेल?
ह्या विधीला सीतादही म्हणण्यामागे काय कारण असेल हे समजणे जरा कठीण आहे. मुळात रामायणात जनकराजाला सीता नांगरलेल्या शेतात सापडली होती. संपूर्ण कथेत सीतेचा भूदेवीशी संबंधही वेळोवेळी अधोरेखित केलेला आढळतो. त्याही पलिकडे गेल्यास ऋग्वेदात सीता कृषिकर्माची अधिष्ठात्री देवता मानली आहे. त्यानुसार तिला भूदेवी मानले आहे. सुगी आणि जमिनीच्या विकासासाठी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात सीतेची स्तुती केलेली आढळते. म्हणून कदाचित ह्या विधीच्या नावामध्ये सीतेचा उल्लेख आढळतो.
उत्तम शेतीकरता भूदेवीची पूजा
काठक गृह्यसूत्रात उत्तम शेतीसाठी दिलेल्या यज्ञविधीमध्येही सीतेच्या नावाचा उल्लेख आहे. त्यातील विधानानुसार यज्ञासाठी सुगंधी गवत वापरून सीतेची मूर्ती बनविण्यास सांगितले आहे. काठक गुह्यसूत्रातील गवताची सीतेची मूर्ती करण्याच्या विधी आणि सीतादही विधीदरम्यान कापसाची बाहुली करून पूजण्याच्या प्रथेमध्ये साधर्म्य आढळते. याशिवाय पाराशर गृह्यसूत्रात सीतेला (भूदेवीला) इंद्रपत्नी म्हटले आहे. इंद्रामुळे (पर्जन्यामुळे) सीता (म्हणजेच भूदेवी) सुफलित होते अशी धारणा आहे.
लोकसंस्कृती आणि मिथक
अशाच प्रकारे सीता आणि भूदेवी यांचा संदर्भात अजून एक समजूत नागा आणि माडिया आदिवासी जमातीत आढळते. नागा आणि माडिया आदिवासी पेरणी करण्यापूर्वी जमीन जाळतात. या क्रियेला ते सीतेच्या अग्निदिव्याची उपमा देतात. अशाप्रकारे वेदांमध्ये आढळणा-या काही मिथकाचे आपल्याला लोकसंस्कृतीत पडसाद उमटलेले दिसतात.