माती म्हणजे वेगवेगळी खनिजं, हवा, पाणी, सेंद्रिय कर्ब मातीत राहणारे असंख्य जीवजंतू आणि त्यांची चयापचय क्रिया यामुळे सतत घडत आणि बदलत असलेली एक जिवंत रचना असते. ह्या सर्व घटकांचं प्रमाण आणि एकमेकांसोबत असलेलं प्रमाण ह्यावरून मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म ठरतात. मातीचा साठा अमर्याद असला तरी जीवाणूंनी समृद्ध आणि चांगली सुपीक माती नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी कधीकधी शेकडो वर्षे लागतात. त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने हाताळली तर फार कमी काळात तिचा ऱ्हास होऊ शकतो.
मातीची सुपिकता वाचवण्याचा उपाय पर्माकल्चर
सध्या जगभरात जास्तीतजास्त शेती ही रासायनिक पद्धतीने केली जाते. पाण्याचा, रसायनांचा आणि अवजड यंत्रांचा बेसुमार वापर ही तिची वैशिष्ट्ये आहेत. मातीविषयीचं अज्ञान, चुकीची धोरणे, शेतकऱ्यांकडे संसाधनांचा अभाव इत्यादी कारणांमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. भारतात तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब 0.25% इतका खाली आलाय. जमीन क्षारपड होऊन तिथे कोणतंही पीक घेणं दुरापास्त होत चाललं आहे. अक्षरशः लाखो टन सुपीक माती (Top soil) दरवर्षी वाहून जात आहे. हे शाश्वत टिकू शकत नाही, त्यामुळे पर्माकल्चर माती टिकवण्याकडे आणि गुणवत्ता सुधारण्याकडे विशेष लक्ष पुरवायला सुचवतं.
जिवंत मातीचं रक्षण
सर्वात आधी जी जिवंत माती उपलब्ध आहे ती आपल्या शेतातून बाहेर जाणार नाही ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे. ऊन, पाणी आणि वारा ह्यांचा परिणाम मातीवर होऊन मातीची धूप होते. ती होऊ नये ह्यासाठी जमीन शक्यतो उघडी राहणार नाही हे पाहिलं पाहिजे. म्हणजे जमिनीवर सतत जिवंत किंवा इतर पद्धतीचं आच्छादन असलं पाहिजे. त्याचबरोबर पृष्ठभागावरून पाणी वाहणार नाही, अशा पद्धतीने बंधारे आणि शेतीची रचना करता येईल. गेल्या काही भागात आपण ह्यातील काही उपाय पाहिले. त्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वारा प्रतिबंधक भिंत (wind break).

विंड ब्रेक:
वारा जेव्हा वादळ किंवा चक्रीवादळासारखं रूप घेतो तेव्हा वनस्पती, प्राणी आणि वास्तूंसाठी धोकादायक असतो. पण एरव्हीही कमी वेगाने का होईना जेव्हा सतत जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहतो, तेव्हा सोबत ओलावा आणि मातीचे बारीक कण सोबत घेऊन जात असतो. हे होऊ नये म्हणून, शेताच्या सर्व बाजूंनी मोठं शेत असेल तर आतील भागातही वारा प्रतिबंधक नैसर्गिक भिंत असणं गरजेचं आहे. खासकरून ज्या बाजूने जास्त वेगवान मोसमी वारे आपल्या शेतात येत असतील त्या बाजूनं ही भिंत असावी. वाऱ्याला समर्थपणे तोंड देणारी वेगवेगळ्या उंचीची आणि गुणधर्माची झाडे ह्यासाठी लावता येतात. वाऱ्याला प्रतिबंध करण्यासोबतच यामुळे अतिरिक्त उत्पादन, जळणाला लाकूड, पक्षी आणि कीटकांसाठी अन्न व निवारा इत्यादी फायदेही मिळवता येऊ शकतात.
मातीचे गुणधर्म
मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वनस्पतींच्या वाढीसाठी महत्वाचे असतात. त्यामुळे आपल्या जमिनीची गुणवत्ता सुधारतेय की नाही ह्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
भौतिक गुणधर्म
मातीच्या कणांचा आकार, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पाण्याचा निचरा होण्याची क्षमता, सच्छिद्रता, वजन इत्यादी गोष्टी ह्यात येतात. चिकणमाती, वाळू आणि पोयट्याच्या मातीचं प्रमाण कसं आहे ह्यावरून माती कोणत्या पिकांसाठी योग्य आहे ते ठरतं.
रासायनिक गुणधर्म
pH, कॅटायन विनिमय क्षमता, मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण, क्षारांचं प्रमाण, जड धातूंचे प्रमाण इत्यादी गोष्टी रासायनिक गुणधर्मात येतात.
जैविक गुणधर्म
मातीतील जीवाणूंचे प्रकार, त्यांची संख्या आणि प्रमाण, ऍक्टिव्ह कर्ब, एंझाईम्स, मातीतील सेंद्रिय घटक हे सगळं वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी फार महत्वाचे घटक आहेत. वनस्पती त्यांच्या मुळांमधून वेगवेगळी स्त्राव जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी सोडतात आणि त्याद्वारे त्यांना हवं ते अन्नद्रव्य मिळवू शकतात. मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलण्याची क्षमताही मातीतील जैवविविधतेमध्ये असते. जमिनीतील जीवाणूंची विविधता वाढवण्याकडे पर्माकल्चरचा कटाक्ष असतो. त्यामुळे रासायनिक खतांचा आणि बुरशीनाशक, तणनाशक वगैरे घातक रसायनांचा वापर पर्माकल्चरमध्ये निषिद्ध आहे.
मातीची सुपिकता वाढविण्याचे उपाय:
मातीतली जैवविविधता वाढविण्यासाठी आणि गुणधर्म सुधारण्यासाठी पर्माकल्चर प्रामुख्याने काही गोष्टी सुचवतं. त्या म्हणजे – कंपोस्ट, आच्छादन (मल्चिंग), हिरवळीची खते. जागेचा आकार, उपलब्ध संसाधने, वेळ आणि पर्माकल्चर झोन ह्यावरून कोणत्या पद्धती कुठे वापरायच्या हे ठरवता येतं.
कंपोस्ट:
जमिनीतील जीवाणूंची संख्या आणि विविधता वाढविण्यासाठी कंपोस्टचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं विघटन होऊन ते वनस्पतींच्या वापरासाठी पुन्हा उपलब्ध होतात. जागेवर (In situ) कंपोस्ट केलं तर तिथे अन्न घेणाऱ्या पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर वाढते व वनस्पतींची वाढ जोमाने होते. कंपोस्टबाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कंपोस्टचा वापर खतासारखा मुख्य अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी न करता विरजणासारखा केला पाहिजे. कंपोस्ट करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जात जातात. त्यातील काही पद्धती आपण पाहू.
गांडूळखत (वर्मीकंपोस्ट):
ह्यात गांडूळांच्या साहाय्याने पालापाचोळ्या सारख्या जैविक पदार्थांचे विघटन केले जाते. गांडूळांच्या विष्ठेतून आवश्यक जीवाणू आणि अन्नद्रव्ये वनस्पतींना मिळतात.
कंपोस्ट खड्डा/ढीग:
वेगवेगळ्या सुक्या आणि ओल्या पदार्थांचे थरांवर थर रचून त्याचे जीवाणूंच्या साहाय्याने विघटन करण्यात येते. खड्डा करायचा की ढीग करायचा, हे आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतं. मुख्य काळजी घ्यायच्या गोष्टी म्हणजे जास्तीतजास्त एरोबिक (प्राणवायू आवश्यक असणारे) जीवाणू वाढतील, योग्य ओलावा आणि तापमान राहील हे पाहणे. बाकी काम निसर्ग करतो. थोडंफार इकडे तिकडे झालं तरी फार बिघडत नाही
फॉरेस्ट फ्लोअर पद्धत
ही पद्धत क्लीआ चांदमल ह्या सुक्ष्मजीवतज्ञ आणि पर्माकल्चर गुरूंनी विकसित केली. आम्ही मोहरानात ही पद्धत वापरतो. ह्यात एक भाग ओला कचरा, तीन भाग सुका पालापाचोळा, एक भाग सुकी माती आणि थोडी जंगलातील जीवाणूयुक्त सुपीक माती चांगली मिसळून, त्याचा एखाद्या लोखंडाच्या जाळीत किंवा झाडाखाली सावलीत जास्तीतजास्त एक मीटर उंचीचा ढीग केला जातो. चोवीस तासात ढिगाचं तापमान 55℃ च्या आसपास जातं आणि जवळपास 8-10 दिवसांत कमी झालं की हे कंपोस्ट शेतात वापरण्यासाठी तयार होतं. ह्याचे फायदे असे की व्हेज/नॉनव्हेज अशा कोणत्याही प्रकारचा ओला कचरा ह्यात वापरता येतो. एकदा ढीग केला की पुन्हा ढवळाढवळ करावी लागत नाही. कोणताही दुर्गंध येत नाही.

3 Comments
खूप उपयुक्त आणि अतिशय गरजेची माहिती ह्या लेखात आहे.
फाॅरेस्ट फ्लोअर कंपोस्ट पध्दत सोपी करून आणि थोडक्यात सांगितल्याबद्दल आभार.
“श्रेष्ठ महाराष्ट्र: माती हा निसर्गाचा अविभाज्य भाग” या लेखात मातीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे सुंदर वर्णन केले आहे. जैवविविधता, शेती आणि हवामान संतुलन टिकवण्यासाठी माती किती महत्त्वाची आहे हे ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे. मातीच्या आरोग्यावर आणि शाश्वत जीवनशैलीवर होणाऱ्या थेट परिणामांवरील चर्चा खूपच विचारप्रवर्तक आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक उपाय अवलंबण्याची गरज स्पष्ट होते. महाराष्ट्रातील समृद्ध मातीविविधतेवर दिलेला भर आणि तिच्या संवर्धनासाठी केलेले आवाहन खूप प्रेरणादायी आहे. हा लेख आपल्याला या अनमोल संसाधनाचे जतन करण्याची जबाबदारी प्रकर्षाने जाणवून देतो. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा लेख वाचकांना प्रेरणा देणारा आहे.
या उत्कृष्ट उपाययोजनांसोबत, बायो-खतांच्या वापराबाबत आपले विचार काय आहेत? मातीच्या योग्य सुधारण्यासाठी त्यांचा उपयोग होईल असे तुम्हाला वाटते का? की ते निसर्गासारखेच असले तरी प्रक्रिया केलेले असल्याने ते शेवटी मातीचे नुकसान करतील? या विषयावर तुमचे मत लेखाला अधिक महत्त्वपूर्ण मूल्य देईल!
Manoj Bhagwat आम्ही शेती केली 25वर्ष आमचा भर होता कंपोष्ट, गांडूळ, शेण खत पूर्ण मुरलेले आणि कंपोष्ट खत तर आम्ही शेतावरच तयार करीत होतो दरवषी 100 बैल बंडी शिवाय निंदाणाच्या वेळेस शेतातच लहान खड्डे करून निदान तेथे टाकून मातीने बुजवत होतो . या सर्वांसह पिकांचे अवशेष न जाळता त्याचा इंधन म्हणून उपयोग करीत होतो तुराट्या पर्याट्या धसकट इत्यादी