पर्माकल्चरचा पाया हा पृथ्वीची काळजी आणि पृथ्वीवरील माणसांची काळजी ह्या दोन मूल्यांपासून बनलेला आहे. त्यामुळे माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व नैसर्गिक संसाधने शाश्वत टिकून राहतीलच. शिवाय त्यांच्या गुणवत्तेत सतत सुधार होत राहील, अशा पद्धतीनेच आपल्या शेतीची आणि जगण्याची डिझाईन असली पाहिजे, ह्यावर पर्माकल्चर जोर देतं. आपल्याकडील सुपीक मातीला सांभाळण्यासोबत तिच्यातील जीवाणूंची विविधता वाढवण्यासाठी कंपोस्टचा वापर कसा करता येईल ते आपण गेल्या भागात पाहिलं. निसर्गात सुपीक माती नक्की कशी तयार होते, हे समजून घेण्यासाठी एक महत्वाची संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे Ecological Succession (परितंत्रीय अनुक्रमण). म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेपासून जंगल तयार होण्याची प्रक्रिया.
प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय?
सुरुवातीला लाव्हा वाहून किंवा ग्लेशियर मागे जाण्यामुळे खनिजरूपातील, निर्जीव माती उघड्यावर येते. मग त्यावर हळूहळू बॅक्टेरिया, बुरशीसारखे सूक्ष्म जीवाणू आणि शेवाळ, लिचेनसारखे Pioneer (पायनियर /आद्य प्रवर्तक) जीव वस्ती करतात. ह्या सजीवांमुळे दगडापासून हळूहळू माती तयार होत जाते. मग त्यावर गवत, खुरटी झुडुपे, छोटी झुडुपे, छोटी झाडे, मोठी झाडे अशा क्रमाने जंगल तयार होत जाते. जमिनीच्या वर जसं जंगल तयार होत जातं तसंच जमिनीच्या पृष्ठभागाच्या खालीही बॅक्टेरिया, बुरशी, प्रोटोझोआ, निमॅटोड, आर्थ्रोपॉडसारख्या सूक्ष्मजीवांची विविधता वाढत जाते, त्याचबरोबर जमिनीच्या वर राहणाऱ्या सजीवांचीही विविधताही वाढते. जमिनीच्या वर आणि खाली विकसित होणाऱ्या ह्या जैवसाखळ्या परस्परावलंबी असतात. निसर्गात अशी साखळी तयार व्हायला शेकडो किंवा कधीकधी हजारो वर्षे लागतात. ह्याला प्रायमरी सक्सेशन म्हणतात.
सेकंडरी सक्सेशन:
काहीवेळा आधी परिपूर्ण असलेली परिसंस्था वणवा लागण्यासारख्या काही कारणांमुळे उध्वस्त होते. अशावेळी पृष्ठभागावरील जैवविविधता मोठ्या प्रमाणात नष्ट होत असली तरी, माती आणि मातीत असलेली जैवविविधता बऱ्यापैकी टिकून राहते. अशा ठिकाणी जंगल आणि एकूण परितंत्र पूर्ववत होण्याच्या प्रक्रियेला सेकंडरी सक्सेशन म्हणतात. नैसर्गिकरित्या ह्याला काही दशकांचा वेळ लागू शकतो.
ही संकल्पना समजून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की, माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा अशा सगळ्या गरजा पूर्ण करून पर्यावरणाचीही समृद्धी टिकून राहील अशी व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर तशी परिसंस्था तयार करावी लागेल. ही परिसंस्था स्थळ आणि काळ सापेक्ष तर असेल. ही परिसंस्था कुठेही असली तरी जमिनीवरच्या परिसंस्थेला साथ देऊ शकेल, अशी जमिनीखालची व्यवस्थाही तयार असावी लागेल. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रातून जेवढे सेंद्रिय घटक बाहेर काढले जातात, त्यापेक्षा जास्त वनस्पतींद्वारे गोळा केले जात असतील तरच ती व्यवस्था शाश्वत राहू शकेल.
सक्सेशन ओळखून त्यानुसार वनस्पती, प्राणी
ह्यावरून एक म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या वनस्पती आणि प्राणी सक्सेशनच्या कोणत्या अवस्थेत, नैसर्गिकरित्या आढळतात ते लक्षात घेता येईल. उदाहरणार्थ आपल्याला भात, गहू ह्यासारखी धान्ये हवी असतील तर गवत वर्गीय पायनीअर वनस्पतींसाठी सोयीची परिसंस्था तयार करावी लागेल. जी सक्सेशनच्या सुरुवातीच्या अवस्थेत असेल. ह्याउलट आंबा, फणस ह्यासारखी फळझाडे हवी असतील तर सक्सेशनची क्लायमॅक्स किंवा त्याच्या थोडी आधीची अवस्था तयार करावी लागेल. दुसरा उपयोग म्हणजे आपल्याकडे सध्या सक्सेशनची कोणती अवस्था आहे ते ओळखून सहज मिळू शकणाऱ्या गोष्टींसोबत वेगाने परिसंस्था आपल्याला हव्या त्या अवस्थेकडे नेण्यासाठी प्रयत्न करता येतील.
सॉइल फूड वेब
Elaine Ingham ह्यांनी गेल्या दोन दशकांत जमिनीतील सूक्ष्मजीवांवर संशोधन केले आहे. वेगवेगळ्या वनस्पतींची सक्सेशनमधील अवस्था ओळखून त्याच्या सर्वोत्तम उत्पादनासाठी मदत करू शकेल, अशी जमिनीतील सूक्ष्मजीवांची विविधता ज्याला सॉइल फूड वेब म्हणतात ते तयार करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. सक्सेशनच्या सुरुवातीच्या अवस्थेत माती बॅक्टेरियाबहुल असते आणि बुरशी कमी प्रमाणात असते, जसजशी उन्नत अवस्था आकार घेत जाते, बॅक्टेरियाही वाढतात आणि बुरशीही वाढते. क्लायमॅक्स अवस्थेत बुरशीचं प्रमाण आणि विविधता बॅक्टेरियाच्या मानाने प्रचंड वाढलेलं असतं.
मातीचं शाश्वत चक्र:
पर्माकल्चर निसर्गातील पॅटर्न लक्षात घेऊन त्यातून शिकून माणसाच्या आणि निसर्गाच्या दोघांच्याही शाश्वत संवर्धनासाठी व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करतं. अर्थातच निसर्गात ज्या गोष्टी घडण्यासाठी दशकं किंवा शतकं लागतात ती लवकरात लवकर तयार करण्यासाठी आपण डिझाईन करू शकतो. आपल्याकडे किती संसाधने, मनुष्यबळ, पैसे, वेळ इ. उपलब्ध आहे, ह्यावर आपली डिझाईन अवलंबून असेल हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सूर्याची ऊर्जा वापरून वनस्पती प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) करतात. हवेतील कर्ब शर्करेच्या रूपात आणि पेशींच्या रूपात स्थिर होतो. ही शर्करा मुळांवाटे मातीतील सूक्ष्मजीवांसाठी स्रावाच्या रूपात दिली जाते. त्याबदल्यात मातीतील जीवाणू मातीतील खनिजं, नत्र इत्यादी अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात. अशाप्रकारे वनस्पती खाणारे जीव आणि त्यांना खाणारे जीव ह्यांना निसर्गातील खनिजं आणि इतर अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जेव्हा हे जीव मरतात तेव्हा ते आणि वनस्पतींची मृत पाने, मुळे, जनावरांची विष्ठा, जनावरांच्या मृत पेशी इत्यादींचं विघटन करणारे जीवाणू त्यातील घटकही वनस्पतींना उपलब्ध करून देतात. अशाप्रकारे अन्नद्रव्यांचं चक्र मातीतील अन्नसाखळीमुळे व्यवस्थित राहते.
निसर्गातील अन्नद्रव्यांचं चक्र सुरुवातीपासून व्यवस्थित कार्यरत राहील, ह्यासाठी आपण मातीची रचना करू शकतो. मोठ्या वृक्षांनाही आधार देऊ शकेल अशी खोल सुपीक माती तयार करू शकतो. आमच्या मोहरान ह्या फूड फॉरेस्टमध्ये नवीन रोप लावण्यासाठी जी माती आम्ही वापरतो, ती ह्याच संकल्पनेचा वापर करून बनवलेली असते.
सखोल सजीव मातीचे चक्र चालविणारे घटक:
- खनिजे (खनिजयुक्त माती, रॉक फॉस्फेट, सल्फर, हाडे इ.)
- सेंद्रिय कार्बन (सुका पालापाचोळा, काटक्या, लाकडाचा भुसा, लाकूड इ.)
- जीवाणू (जीवाणूयुक्त जंगल माती, जंगल ज्यूस, कंपोस्ट, कंपोस्ट टी इ.)
- ओलावा (ओला कचरा, योग्य वाफसा राहील असं पाणी व्यवस्थापन इ.)
- वनस्पती (सतत जमीन हिरवीगार ठेवून सूर्यप्रकाश गोळा करणारे वनस्पतींचे 7 थर)
- प्राणी आणि वनस्पतींच्या मृत पेशी (सर्व प्रकारच्या मृत पेशी, विष्ठा, मूत्र इत्यादी)
- खेळती हवा (मातीचं स्ट्रक्चर, जीवाणू, कीटक, प्राण्यांच्या क्रियांमधून खोलवर हवा खेळती राहणे)
हे सगळे घटक योग्य प्रमाणात एकत्र आले की, त्यांच्या साहाय्याने मातीतील अन्नद्रव्यांचं चक्र व्यवस्थित सुरू होतं. मग पुढील काम निसर्ग स्वतःहून करतो. माणसाने फक्त त्यातून आपल्या गरजेपुरतंच बाहेर काढायचं आणि तेही वापर करून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थेत परत जाईल हे पाहिलं की झालं.
2 Comments
तुमच्या लेखातून नेहमीप्रमाणे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद.
खूप छान मांडणी केली आहे.
हे आजघडीला खूपच महत्त्वाचे आहे आणि सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे .
तेव्हा, मन:पुर्वक धन्यवाद.