‘जुनं ते सोनं‘ हे म्हणत, मानत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. आजही किशोर कुमार हे कित्येकांचे आवडते गायक आहेत. अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणताच अभिनेता न आवडलेले प्रेक्षक अस्तित्वात आहेत. सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळणं सोडल्यावर क्रिकेट बघणं सोडणारे लोकही माहितीत आहेत. पण, हे सगळं घडत असतांनाही काळ पुढे सरकत होता. प्रेक्षक अरजित सिंगच्या गाण्याला देखील तितकंच डोक्यावर घेत होते, शाहरुख-सलमान-आमिर खानांची लोकप्रियता जरी कमी झालेली असली तरी बॉलीवूडचं दुकान काही बंद झालेलं नव्हतं. त्यांची जागा घेणारे रणबीर, रणवीर, राजकुमार राव सार्थपणे बॉलीवूडची गाडी फ्रंट सीटवर बसून ड्राईव्ह करत आहेत. पण, 2024 हे वर्ष आलं आणि अचानक सर्वांना जुन्या सिनेमांची परत आठवण व्हायला लागली हे आपण सध्या बघत आहोत.
‘नॉस्टॅल्जिया वर्ष‘
एकीकडे ‘स्त्री 2‘ची कोटींच्या कोटी उड्डाण सुरू आहे, तर दुसरीकडे री-रिलीज झालेला ‘तुंबाड‘ बॉक्सऑफिसवर नवा इतिहास रचतो आहे. ‘रहेना है तेरे दिल मे‘हा सिनेमा लोक रांगेत उभं राहून तिकीट काढून परत बघत आहेत. सध्या आपण कोणत्याही मल्टिप्लेक्सची मुव्ही लिस्ट बघितली, तर त्यामध्ये एक जुना सिनेमा, एक नवा सिनेमा असं मिश्रण त्या यादीमध्ये बघायला मिळत आहे. ‘वडा पाव‘ आणि ‘ढोकळा‘ किंवा ‘इडली‘ आणि ‘समोसा‘ एकत्र अशा दोन प्रांतांची डिश एकाचवेळी समोर यावी आणि त्यातून कोणती डिश निवडावी ? अशी मनःस्थिती सध्या सिनेमा निवडतांना प्रेक्षकांची होत आहे. 2024 हे वर्ष संपल्यावर त्याचं नाव ‘नॉस्टॅल्जिया वर्ष‘ म्हणून घोषित झालं तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. सिनेमांचं ‘रि-रिलीज‘ हे प्रकरण प्रेक्षकांना इतकं का आवडत आहे ? जाणून घेऊयात.
री-रिलीजचा धमाका का बरं?
आज थिएटरमध्ये जाऊन री-रिलीज सिनेमा बघणारा प्रेक्षक हा साधारणपणे वयाच्या चाळिशीतला आहे. हे ते वय आहे जेव्हा बहुतांश व्यक्तींना असं वाटत असतं की, आपण खूप काम करत आहोत. पण, या धकाधकीच्या आयुष्यात कुठेतरी आपण स्वतःसाठी जगणं विसरत चाललो आहोत किंवा आपलं काहीतरी जगायचं राहून गेलं आहे. 2जी बटनांचे फोन ते 5जी नेटवर्क, दुकानातून किराणा विकत घेण्यापासून ते 10 मिनिटांत घरपोच कोणतीही वस्तू मिळणे ही स्थित्यंतरं बघणारी ही पिढी आपण एकेकाळी जगलेल्या निवांतपणा मिस करत आहे. जुने सिनेमे परत थिएटरमध्ये बघतांना तो निवांतपणा त्या प्रेक्षकाला मिळत आहे. 3 तासांच्या आसपास कालावधी असलेला सिनेमा, त्यामध्ये येणारी 3–4 गाणी (जे की नव्या सिनेमांध्ये नाहीये) हे एका पिढीतील प्रेक्षकाला खूप आनंद देत आहे. जसं कोणतंही प्रॉडक्ट विकत घेण्यामागे एक विशिष्ट मानसिकता असते; ज्याला की, ‘कन्झ्युमर बिहेवीयर‘ असं म्हणतात. तोच पॅटर्न इथे पण लागू पडतो. हाच अभ्यास निर्मात्यांनी केला असावा आणि ‘री-रिलीज‘ चा धडाका लावला आहे.
‘री-रिलीज‘ होऊन यशस्वीही झालेल्या सिनेमांमध्ये खालील सिनेमांची नावं प्रकर्षाने घ्यावी लागतील –
तुंबाड – राही अनिल बर्वे यांचं दिगदर्शन असलेला 2018 चा हा सिनेमा प्रत्येकाच्या मनात कमी जास्त प्रमाणात असलेल्या लोभी वृत्तीवर भाष्य करतो. पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. पण, मधल्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. कोव्हिड काळ येऊन गेला. लोकांना आयुष्याचं, जिवंत असण्याचं महत्व पटलं. सोशल मीडियाचा वापर वाढला. चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचू लागले. प्रेक्षक राजा विचार करून सिनेमा निवडू लागला. कोणत्याही स्टार्सपेक्षा सिनेमाचा कंटेंट महत्वाचा हे प्रेक्षकांना पटलं आणि या मानसिकतेचा फायदा तुंबाडला झाला आणि सिनेमा दुसऱ्या इनिंगमध्ये बॉक्सऑफिसवर तुफान चालला.
रहेना है तेरे दिल मे – आर माधवन आणि दिया मिर्झा यांची सुंदर प्रेमकथा असलेला 2001 चा हा सिनेमाचं गौतम मेनन यांनी दिग्दर्शन केलं होतं. आज आपल्या लाईफ पार्टनर सोबत सिनेमा बघणाऱ्यांनी कदाचित पहिल्या वेळी हा सिनेमा इतर कोणासोबत बघितलेला असावा. आज जेव्हा हा सिनेमा परत प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांच्या मनात त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि प्रेक्षकांची पावलं परत थिएटरकडे वळली.
लैला मजनू – या सिनेमाचे दिगदर्शक इम्तियाज अली यांचे सिनेमे प्रेक्षकांना बऱ्याच वेळेस उशिराने कळतात, आवडतात. ‘तमाशा‘ बद्दल प्रेक्षकांचं हेच झालं होतं. लैला मजनू हा सिनेमा आपल्या पहिल्या इनिंग मध्ये चालला नव्हता. पण, मधल्या काळात ‘एनिमल‘च्या यशाने तृप्ती डिमरीची लोकप्रियता वाढली आणि निर्माता दिगदर्शकाने ती ‘एन्कॅश‘ केली.
रॉकस्टार – इम्तियाज अली यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आधीसुद्धा आवडला होता. त्यातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘एनिमल‘ च्या यशाने रणबीर कपूरची वाढलेली लोकप्रियता बघून निर्माता, दिगदर्शकाने पुन्हा हा सिनेमा आपल्या पोतडीतून बाहेर काढला आणि नव्या प्रेक्षकांसमोर ठेवला. सिनेमातील मुख्य पात्राचे विद्रोही विचार, मनाला भिडणारी गाणी तरुणाईला आवडली आणि त्यांनी ‘रॉकस्टार‘ला पुन्हा हिट केलं.
गँग्स ऑफ वासेपूर – 2012 मध्ये प्रदर्शित झालेला आणि अनुराग कश्यप यांनी दिगदर्शित केलेला हा सिनेमा प्रेक्षकांना त्याच्या वास्तविकतेमुळे आणि मनोज वाजपेयींच्या अभिनयामुळे खूप आवडला होता. सोशल मीडियावरील विविध मिम्समुळे मागची 12 वर्ष हा सिनेमा लोकांच्या लक्षात राहीला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी यांना नवीन ओळख देणारा हा सिनेमा थिएटरमध्ये परत बघण्यासाठी प्रेक्षकांनी आपल्या जुन्या मित्रांसोबत ‘गेट-टूगेदर‘ आयोजित केले आणि निर्मत्याचं रि-रिलीजचं प्रयोजन सार्थ ठरलं.
जब वी मेट – 2007 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा देखील इम्तियाज अली यांनी दिगदर्शित केला होता. करीना कपूरने या सिनेमात साकारलेलं ‘गीत‘ हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आनंदी जगा, वर्तमानात जगा हे सांगणारं हे पात्र परत एकदा मोठ्या पडद्यावर बघावं, इतरांना, नव्या पिढीला दाखवावं असं प्रेक्षकांना वाटलं आणि त्यांनी या सिनेमाला परत हिट केलं.
खऱ्या आयुष्यातला रिटेक
री-रिलीज सिनेमांच्या यादीत चक दे इंडिया, ये जवानी है दिवानी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारखे ‘आयकॉनिक‘ सिनेमे देखील लवकरच समाविष्ट होणार आहे. मल्टिप्लेक्स मालक या सर्व बदलामुळे आनंदात आहेत. कारण, कधीही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन न बघणारे प्रेक्षक देखील या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी होणारा ‘रिटेक‘ प्रेक्षकांना खऱ्या आयुष्यात सध्या अनुभवता येत आहे असं आपण म्हणू शकतो. जुन्या कलाकृतींचं कौतुक करणारा प्रेक्षक नव्या दमाचे कलाकार, लेखक, सिनेमांचं देखील येत्या काळात स्वागत करेल अशी आशा करूयात.