प्राचीन बौध्द संगीनी

Buddhist council : गौतम बुध्दांच्या मृत्यूनंतर, बौद्ध भिक्षुसमुदायांनी म्हणजेच संघांनी वेळोवेळी एकत्र येऊन बौद्ध धर्मातील तत्त्वे, आचार आणि विचार या संबंधात मंथन केले. या त्यांच्या बैठकींनाच बौध्द संगीती म्हटले जाते.
[gspeech type=button]

गौतम बुध्दांच्या मृत्यूनंतर, बौद्ध भिक्षुसमुदायांनी म्हणजेच संघांनी वेळोवेळी एकत्र येऊन बौद्ध धर्मातील तत्त्वे, आचार आणि विचार या संबंधात मंथन केले. या त्यांच्या बैठकींनाच बौध्द संगीती म्हटले जाते. पाली भाषेतील संगीती शब्दाचा अर्थ एकत्र पठण असा होतो. म्हणूनच बौध्द संगीतींचा प्रमुख उद्देश बौध्द धर्मग्रंथांचे एकत्रित पठण करून त्यांची मूळ आवृत्ती टिकवणे होता. त्याशिवाय कालौघाने बौध्द धर्मांच्या अनुयायांमध्ये आचार विचार या संबधातील वाद मिटवणे आणि बौद्ध ग्रंथांचे पुनरावलोकन आणि दुरुस्ती करणे ही दोनही या संगीतींची उद्देश्य होती. 

अशा एकूण सहा संगीती झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या चार संगीती प्राचीन काळातील असून नंतरच्या दोन आधुनिक काळातील आहेत. बौद्ध परंपरांद्वारे पहिल्या चार संगीती खऱ्या घटना मानल्या जातात. तथापि, या संगीतींचा ऐतिहासिक विश्वासार्हता आणि तपशील आधुनिक बौद्ध अभ्यासामध्ये वादाचे विषय मानले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या बौद्ध संप्रदायांच्या स्रोतांमध्ये या घटनांचे परस्परविरोधी वर्णन आढळते. 

पहिली बौद्ध संगीनी

पहिली बौद्ध संगीती इ.स.पू. 483 मध्ये राजगृह येथे हर्यंक वंशातील अजातशत्रू राजाच्या आश्रयाने आयोजित करण्यात आली होती. बुद्धांचे श्रेष्ठ शिष्य, महाकाश्यप या संगीतीचे अध्यक्ष होते. ”बुद्धांच्या मृत्यूनंतर भिक्षूंना शिस्तीच्या नियमांचे पालन करण्याची गरज नाही आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतात असा एका भिक्षूचा संवाद महाकाश्यपांनी ऐकला होता. त्यामुळे ही संगीती भगवान बुद्धांच्या निधनानंतर लगेजच काळात आयोजित केली गेली. या संमेलनात सर्वप्रथम भिक्षू आणि भिक्षुणींसाठीच्या नियमांचे पुनरावलोकन करण्यात आले. त्याशिवाय या संगीतीत बुद्धांच्या शिकवणीचे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले – विनय पिटक आणि धम्म पिटक. आणि त्यांना अधिकृत धर्मग्रंथ म्हणून स्वीकारण्यात आले. विनय पिटकाचे संकलन उपाली नावाच्या बुद्धांच्या विनयाचे प्रख्यात जाणकार भिक्षुंच्या मार्गदर्शनाखाली झाले. तर सुत्त पिटकाचे संकलन बुद्धांचे प्रमुख शिष्य, आनंद नावाच्या भिक्षुंच्या मार्गदर्शनाखाली झाले. उपाली आणि आनंद यांना अनुक्रमे विनय पिटक व सुत्त पिटकासाठी प्रामुख्याने मान्यता दिली गेली. ही संगीती सलग नऊ महिने चालली.  विविध संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 500 भिक्षूंच्या सभेने हे कार्य पार पाडले. काही पारंपरिक कथांनुसार, बुद्धाच्या मृत्यूनंतर 499 प्रमुख अर्हतांनाच संगीतीसाठी निवडण्यात आले होते. त्यावेळेस आनंद हा केवळ ‘सोतापन्न’ (म्हणजेच प्रथम स्तराचा साधक) होता. मात्र संगीतीच्या पहिल्या दिवशी पहाटेपर्यंत त्याने स्वतःला प्रशिक्षित करून अर्हतत्त्व प्राप्त केले आणि त्याला संगीतीमध्ये सामील होण्याची परवानगी मिळाली.

दुसरी बौद्ध संगीनी

दुसरी बौद्ध संगीनी इ.स.पू. 383 मध्ये वैशाली येथे राजा कालाशोकाने आयोजित केली होती. बौध्द संघामध्ये झालेल्या एका वादाच्या पार्श्वभूमीवर ही संगीनी घेतली होती. यासंदर्भातील तपशीलांबाबत काही मतभेद असले तरी, सर्व संप्रदायांमध्ये एक गोष्ट समान आढळते. वैशालीतील काही भिक्षू सामान्य लोकांकडून धनस्वरूप दान स्वीकारत होते आणि इतरही काही शिथिल आचरणांचे पालन करत होते. जेव्हा इतर भिक्षूंना हे समजले, तेव्हा वाद निर्माण झाला. या गोष्टीची सर्वप्रथम जाणीव यश काकंदकपुत्र नावाच्या एका भिक्षूला झाली. त्याने इतर वरिष्ठ भिक्षूंना याची माहिती दिली आणि दोषी भिक्षूंना जाहीररित्या आव्हान दिले. या घटनेच्या उत्तरादाखल, वैशालीतील भिक्षू आणि यश यांनी मिळून आसपासच्या भागातील वरिष्ठ भिक्षूंचा सल्ला घेण्यासाठी संघ एकत्रित केला, जेणेकरून हा वाद पूर्णतः मिटवता येईल. परिणामी वैशाली येथे संगीनी आयोजित करण्यात आली. 

हे ही वाचा : गौतम बृद्ध आणि बोधी वृक्ष

दुसऱ्या संगीनीत अविधर्मी प्रथांवर मंथन

या शिथिल आचारांचे वर्णन “दहा दोष” अशा स्वरूपात केले जाते.  हे दहा दोष म्हणजे 1) शिंगामध्ये मीठ साठवणे (सिंगिलोणकप्प), 2) सूर्याच्या सावलीने मध्यान्ह ओलांडल्यानंतर दोन बोटांच्या अंतराने जेवणे (दुवंगुलकप्प), 3) एकदा जेवून पुन्हा गावात भिक्षेसाठी जाणे (गामंतरकप्प), 4) एकाच क्षेत्रात राहणाऱ्या भिक्षूंनी स्वतंत्र उपोसथ विधी पार पाडणे (आवासकप्प), 5) संघ अपूर्ण असताना अधिकृत संघकर्म पार पाडणे (अनुमतिकप्प), 6) आपला गुरू किंवा शिक्षक जसा आचरण करतो, तसा स्वतः आचरण करणे (आचिन्नकप्प), 7) मध्यान्हानंतर आंबट ताक सेवन करणे (अमथितकप्प), 8) अद्याप पूर्णपणे आंबलेले नाही असे मद्यपान करणे (जलोगिकप्प), 9) न शिवलेली चादर वापरणे (निसीदनकप्प) आणि 10) सोने आणि चांदी (धन) स्वीकारणे (जातरूप-रजतकप्प). 

यामधील प्रमुख वादाचा मुद्दा “सोनं आणि चांदी” म्हणजेच कोणत्याही प्रकारचे धन किंवा पैसा स्वीकारणे हाच होता. यामुळे संघामध्ये मतभेद झाले. काहींना वाटत होते की भिक्षूंनी जनतेकडून दिलेले सोनं-चांदी (अर्थात पैसा) स्वीकारू नये, तर काही भिक्षू त्यास अनुमती देत होते. दुस-या संगीनीत दहा ‘अविधर्मी’ प्रथांना नाकारण्यात आले. मात्र, वैशालीचे भिक्षू आपले मत सोडण्यास तयार झाले नाहीत आणि त्यामुळे कोणतेही एकमत होऊ शकले नाही. या संमेलनाचा परिणाम असा झाला की बौद्ध संघात कायमचा फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले – स्थविरवाद (Sthaviras), जे पारंपरिक विनयाचे पालन करणारे होते आणि महासांघिक (Mahasanghikas), जे नवीन बदलांना समर्थन देणारे होते.

तिसरी बौद्ध संगीनी

तिसरी बौद्ध संगीनी सम्राट अशोकाच्या अध्यक्षतेखाली पाटलीपुत्र येथे घेण्यात आली. पाली साहित्यातील दीपवंस आणि महावंस या ग्रंथांनुसार, या संगीनीचे अध्यक्ष थेर मोग्गलिपुत्त तिस्स होते. या संगीनीत एक हजार अर्हत भिक्षू सहभागी झाले होते. ही संगीनी सम्राट अशोकाने मोग्गलिपुत्त तिस्स यांच्या विनंतीवरून आयोजित केली होती.  संमेलनाच्या शेवटी मोग्गलिपुत्त तिस्स यांनी “कथावत्थु” नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी अनेक बौद्ध पंथांच्या चुकीच्या मतांचे खंडन केले. बौध्द धर्माची जी मते आणि शिक्षा या संगीनीत अधिकृतरीत्या मान्य करण्यात आली, तीच पुढे थेरवाद या नावाने ओळखली जाऊ लागली. 

या संगीनीत दोन महत्त्वपूर्ण निर्णय झाले. बौद्ध धर्मग्रंथांची नवीन वर्गवारी करण्यात आली. यामध्ये तिसऱ्या पिटकाची भर घालण्यात आली — अभिधम्म पिटक. या पिटकात आधीच्या दोन पिटकांतील (विनय व सुत्त) शिकवणींचे तात्त्विक विश्लेषण आहे. त्यामुळे बुद्धांचे उपदेश यानंतर त्रिपिटक म्हणून ओळखले जाऊ लागले. या संगीनीचा दुसरा परिणाम असा झाला की, सम्राट अशोकाने विविध प्रदेशांत बौद्ध धर्म प्रचारासाठी धम्मदूत पाठवले. 

चौथी बौद्ध संगीनी

चौथ्या बौद्ध संगीनीच्या काळापर्यंत, बौद्ध धर्म भारतात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागला गेला होता. चौथ्या संगीनीबद्दल दोन मते आहेत. एका मतानुसार चौथी बौद्ध संगीनी अंदाजे इ.स. 100 मध्ये भारताच्या उत्तर भागात, कुशाण राजा कनिष्काच्या आश्रयाखाली काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आली. या संगीनीचे अध्यक्ष वासुमित्र, तर अश्वघोष उपाध्यक्ष होते. बौद्ध तत्त्वज्ञ पार्श्व किंवा पार्श्विक यांच्या विनंतीवरून कनिष्काने ही घडवून आणली. यावेळी साधारण 500 भिक्षू उपस्थित होते. 

विविध पंथांतील मतभेद मिटवणे आणि सर्वास्तिवाद संप्रदायाच्या धर्मग्रंथांचे संकलन आणि भाष्य तयार करणे ही ह्या संगीनीची दोन महत्वाची उदिष्टे होती. त्रिपिटकावर आधारित तीन विस्तृत भाष्ये यावेळेस तयार केली गेली. यानंतर या भाष्यांचे ताम्रपटांवर लेखन करून ते कनिष्काने बांधलेल्या स्तूपात संग्रहित केले. या भाष्यांचा संपूर्ण संच म्हणजे महाविभाषा शास्त्र, जे काश्मीरमधील वैभाषिक संप्रदायाचे मूलभूत ग्रंथ झाले.

मात्र या काश्मीरमधील संमेलनास थेरवाद परंपरेत अधिकृत मान्यता नाही, आणि याचे उल्लेख प्रामुख्याने महायान परंपरेतील ग्रंथांमध्ये आढळतात. थेरवाद परंपरेनुसार चौथी संगीनी श्रीलंकेती अलू विहार येथे झाली. यात मौखिक परंपरेने जपलेल्या त्रिपिटक आणि टीका  लिपिबद्ध करण्याचा निर्णय झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Grampanchayat : गावात विकास हवा असतो मात्र त्यासाठी जीव ओतून जे परिश्रम घ्यायचे असतात ते घेण्याची तयारी कुणाचीच नसते. आपणास
High Blood Pressure : उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन. हा आजार हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा सुरुवातीला
Tumor : आज आपण एका महत्त्वाच्या आणि काहीशा भीतीदायक वाटणाऱ्या पण समजून घेतल्यास सामोरे जाणे सोपे असलेल्या विषयाबाबत माहिती घेणार

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ