अंडरवर्ल्डचा ‘सदा मामा’

Don Sada Mama : गवळी गँगमध्ये अरुण गवळी हा डॅडी होता, तर गँगचा एक मामाही होता. गवळी गँगचा हा मामा मुंबई अंडरवर्ल्डमध्येही त्याच नावानं प्रसिद्ध होता. तो होता सदामामा. म्हणजेच सदाशिव पावले. मराठी गँगस्टर्समधला एक अत्यंत खुनशी, रागीट आणि निर्दयी म्हणून सदा पावलेची ओळख होती.
[gspeech type=button]

गवळी गँगमध्ये अरुण गवळी हा डॅडी होता, तर गँगचा एक मामाही होता. गवळी गँगचा हा मामा मुंबई अंडरवर्ल्डमध्येही त्याच नावानं प्रसिद्ध होता. तो होता सदामामा. म्हणजेच सदाशिव पावले. मराठी गँगस्टर्समधला एक अत्यंत खुनशी, रागीट आणि निर्दयी म्हणून सदा पावलेची ओळख होती. अरुण गवळी जेलमध्ये असताना गँगची जबाबदारी त्याच्या बायकोवर असली, तरी गँग सदा पावले चालवत होता. लहानपणापासून सदा पावले दगडी चाळीतल्या व्यायामशाळेत जायचा. त्यामुळं त्याचं शरीर पिळदार आणि त्याचं व्यक्तिमत्व भारदस्त दिसायचं. तो कबड्डी खेळण्यात पटाईत होता. कबड्डी खेळता खेळता सदाशिव पावले कधी बंदुकींसोबत खेळू लागला त्याचं त्यालाही कळलं नाही.

शिक्षणाला रामराम आणि गुन्हेगारीला जवळ

सदा पावलेचं लहाणपण तसं गरिबीतीच गेलं. त्याचं कुटुंबं घाटकोपर परिसरात रहात होतं. त्याच्या भावानं या गरीबीतही शिक्षण चालू ठेवलं आणि त्यानं रेल्वेत टिसी म्हणून नोकरी केली. पण सदा पावलेचं मात्र शिक्षणात लक्ष लागलं नाही आणि त्यानं शाळेला रामराम ठोकला. शिक्षण अर्धवट सोडून सदा पावले छोटी मोठी रोजंदारीची कामं करु लागला. छोट्या मोठ्या चोऱ्या करत करत तो भांडुपच्या क्रॉम्पटन मिलमध्ये

कामाला लागला. हा काळ 1975 नंतरचा होता. क्रॉम्पटनमध्ये काम करता करता त्याची ओळख अरुण गवळी आणि रमा नाईक यांच्याशी झाली. हे दोघंही सदा पावलेच्या सहवासात राहूनच गुन्हेगारीकडे वळले. अरुण गवळी, रमा नाईक आणि बाबु रेशिमनं ब्रा गँगची सुरुवात केली, तेव्हा सदा पावलेही त्यांना मदत करत होता.

अरुण गवळीची ताकद सदा मामा

1987 मध्ये बाबु रेशिम आणि 1988 मध्ये रमा नाईकचं एन्काऊंटर झाल्यानंतर अरुण गवळी गँगमध्ये एकटा पडला. त्यात दाऊदनं 1992 च्या आसपास त्याच्या भावाची म्हणजे पप्पा गवळीची हत्या घडवून आणली. अरुण गवळी एकदम कमकुवत झाला होता. तेव्हा सदा पावले त्याची ताकद बनला. सनकी असलेला सदा पावले त्याच्यावर सोपवलेली कामगीरी चोख बजावायचा. त्यामुळं गवळी गँगमध्ये त्यानं लवकरच वरचं स्थान मिळवलं. घाटकोपर सोडून सदा पावले दगडी चाळीत राहायला आला. आता अरुण गवळी त्याच्यावर पूर्ण विश्वासानं कामं सोपवत होता. खंडणी गोळा करणं हे त्याचं महत्वाचं काम होतं.

सदा पावलेला कुणीही नकार दिलेला चालत नसे. कुणी पैसे द्यायला नकार दिला, की त्याचा जीव जाणार हे ठरलेलं होतं. त्यामुळं बिल्डर आणि मुंबईतल्या व्यावसायिकांमध्ये अरुण गवळीपेक्षा ही सदा पावलेची जास्त दहशत होती.

अरुण गवळीच्या पहिल्या अटकेला कारणीभूत

एक दिवस अरुण गवळीली माहिती मिळाली की, त्याच्या भावाला मारणारा मनोज कुलकर्णी मुंबईत येतोय. ही संधी अरुण गवळीला सोडायची नव्हती. त्यानं मनोज कुलकर्णीला संपवण्याची जबाबदारी सदा पावले आणि विजय तांडेल यांच्यावर सोपवली. त्या दोघांनी मनोज कुलकर्णीला पकडून दगडी चाळीत आणलं. आणि त्याचा प्रचंड छळ करुन त्याला मारलं. त्यानंतर सदा पावले हा एक क्रूरकर्मा म्हणून सगळ्यांसमोर आला. या घटनेत मुंबई पोलिसांना पूर्ण खात्री होती की हा खुन सदा पावलेनं केलाय. मुंबई पोलिसांनी दगडी चाळीत रेड टाकली. पोलिसांना सदा पावले किंवा त्याच्या गुन्ह्याशी संबंधीत काहीही तिथं मिळालं नाही. पण एका सोफ्यात लपवलेली एके 47 पोलिसांना सोपडली.

पोलिसांनी अरुण गवळीच्या विरोधात टाडा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. जेलमध्ये जाताना अरुण गवळी गँगची जबाबदारी बायकोवर सोपवून गेला. पण अरुण गवळी जेलमध्ये असताना सदा पावलेनं खऱ्या अर्थानं त्याची गँग चालवली आणि वाचवलीही. गँगला पैशांची कमी पडू दिली नाही की अरुण गवळी जेलमध्ये असूनही गँगची दहशत कमी होऊ दिली नाही. त्यानं मोठमोठ्या बिल्डरला सळो की पळो करुन सोडलं.

मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर

अशातच एकदा रघुवंशी मिलचा मालक वल्लभ ठक्कर याच्याकडे सदा पावलेनं 50 लाखांची खंडणी मागीतली. त्यानं आधी खंडणी द्यायला नकार दिला. नंतर त्यानं पोलिस तक्रार केली. आणि अरुण गवळीशी संपर्क करुन 25 लाखांवर मांडवली केली. अरुण गवळीनं त्याला जेलमधून निरोप पाठवला की ठक्करकडून 25 लाख घेऊन प्रकरण मिटवून टाक. सदा पावले निरोप ऐकून सैरभैर झाला. मांडवली तर ठिक आहे, पण त्याने पोलिसांत तक्रार करायला नको असं म्हणत तो तडक बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेला आणि भर दिवसा त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार मारलं. दिवसाढवळ्या एका प्रतिष्ठीत बिल्डरच्या खुनानं मुंबईच्या व्यावसायिकांसह मुंबई पोलिसांचीही झोप उडवली. आता सदा पावले पोलिसांच्या हिटलिस्टवर आला.

सगळ्या एन्काऊंट स्पेशलिस्टच्या एकाच वेळी रडारवर

मुंबई पोलिसांची 1983 ची बॅच ही एन्काऊटर स्पेशलिस्ट बॅच म्हणून ओळखली जाते. मुंबईतले बहुतेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट हे याच बॅचचे आहेत. त्यांच्यामुळंच 90 चं दशक हे मुंबई अंडरवर्ल्डसाठी तापदायक ठरलं होतं. हे अधिकारी साधारणपणे त्यांच्या परिसरातल्या गुंडांवर लक्ष ठेवून असत. त्यांच्या परिसरातल्या गुंडांचं एन्काऊंटर करत. पण सदा पावले हा असा गुन्हेगार होता जो एकाच वेळी संपूर्ण मुंबईभर पसरलेल्या सगळ्याच एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांच्या हिटलिस्टवर होता.

सगळं पोलिस खातंच त्याचा बंदोबस्त करण्याची तयारी करत होता. पण तो काही त्यांच्या हाती लागत नव्हता.

अखेर विजय साळस्कारांच्या जाळ्यात

अखेर एकदा विजय साळस्कर यांना खबर मिळाली की सदा पावले हा दगडी चाळीत आहे. त्यांनी दगडी चाळीवर छापा टाकला. पण तिथं त्यांना तो सापडला नाही. त्यानंतर लगेचच त्यांना खबर मिळाली की सदा पावले हा त्याच्या कुटुंबासोबत शिर्डीला जाणार आहे. या माहितीवर साळसकर आणि त्यांच्या टिमनं जोरदार तयारी केली. 26 सप्टेंबर 1997 ला दुपारी सदा पावले, त्याचा भाऊ आनंद पावले आणि विजय तांडेल हे शिर्डीला जात असताना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलजवळ पोलिसांनी त्यांना घेरलं आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत सदा पावले आणि विजय तांडेल यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिस आणि मुंबईतल्या अनेक बिल्डर्सनी त्या दिवशी सुटकेचा निःश्वास सोडला.

कुटुंबियांचे आरोप आणि न्यायालयीन लढाई

हे एन्काऊंटर प्रचंड वादग्रस्त ठरलं. एन्काऊंटर झालं तेव्हा त्याची बहीण, भाऊ आणि भावाची बायको हेही त्याच गाडीत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी ठरवून सदा पावलेचं एन्काऊटर केलं आहे. त्यांनी त्याला शरण यायला संधी दिली नाही. सदा पावले शरण जायला तयार असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सदा पावलेच्या कुटुंबियांनी यासाठी मोठा न्यायालयीन लढा दिला. शेवटी लढाईत मुंबई पोलिस जिंकले.

सदा पावलेच्या मृत्युनंतर गवळी गँग खऱ्या अर्थानं कमकुवत झाली. त्यानंतर गँगमध्ये कुणीही त्याच्या तोडीचा गुंड झाला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ