गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा या ग्रामपंचायतीने संपूर्ण देशात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारने दिलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात डव्वा ग्रामपंचायतीला “हवामान कृती विशेष पुरस्कार” मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच पंचायत राज दिनी म्हणजे 24 एप्रिल रोजी बिहार राज्यातील मधूबनी इथं एक कोटी रुपये रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन डव्वा ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या अतुलनीय आणि अभिमानास्पद कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि विशेषतः गोंदिया जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे.
कार्बनमुक्त होण्याचा निर्धार
हवामान बदलाच्या परिणामांना संपूर्ण जग सध्या तोंड देत आहे. डव्वा ही आदिवासीबहुल ग्रामपंचायत आहे. आपल्या भागात वाढत असलेल्या हवामान बदलाचा परिणाम लक्षात घेऊन भविष्यातील धोके टाळण्यासाठी या ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात ठोस उपाययोजना केल्या. त्यात “कार्बनमुक्त ग्रामपंचायत” होण्याचा निर्धार करून त्यांनी त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू ठेवले. ग्रामपंचायतीने पर्यावरण सेवा दूत, महिला बचत गट, शाळेतील विद्यार्थी, शेतकरी यांना पर्यावरण विषयक कामात सहभागी करुन ग्रामसभेच्या माध्यमातून कार्ययोजना तयार केली. गाव कार्बन न्युट्रल होण्यासाठी फटाके बंदी, कृषी कचरा जाळण्यास बंदी, प्लास्टिक बंदी करणारा ठराव ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. सेद्रिंय खताचा वापर वाढविला. लोक सहभागातून पर्यावरण रक्षणाची ठोस पावले उचलतांना गावकऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. ग्रामपंचायत आणि जंगलव्याप्त परिसरात गावकऱ्यांनी विविध प्रकारची 1 लाख 16 हजार 643 झाडे लावली. प्रत्येक कुटुंबामार्फत किमान 15 ते 20 झाडे लागवड करुन त्यांचे योग्य संवर्धन करण्यात येत आहे. प्रत्येक शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत इमारत, पाणीपुरवठा योजना याठिकाणी सौरऊर्जेचा उपक्रम सुरू केला. प्रत्येक घरासाठी ‘एक घर, एक सौरऊर्जा साधन’ ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली.
गावातील विजेचा वापर कमी करण्यासाठी 100 टक्के एलईडी दिव्यांचा वापर सुरू करण्यात आला. गावात प्लास्टिक बंदीचा ठराव करुन सर्वत्र कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात झाले. त्यामुळे प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण थांबवण्यात मोठे यश मिळाले.
पाणी साठवण आणि शेती सुधारणा
डव्वा ग्रामपंचायतीने गावातील विहिरी, तलाव यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची पातळी वाढवली. पावसाचे पाणी अडवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या योजना राबवल्या. गावात आणि शेतशिवारात केलेल्या जलसंधारणामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. गावातील शेतकऱ्यांनी हवामान अनुरूप पिके घेऊन उत्पादनात वाढ केली.त्यांनी सेंद्रिय खताचा वापर वाढवला. रासायनिक खते कमी केली. शेतकऱ्यांनी शेतीत नैसर्गिक पद्धतींचा स्वीकार करून शाश्वत शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे.
कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यवर्धन
गावातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. तर सुका कचरा प्रकारानुसार वेगळा करून पुनर्वापरासाठी पाठवला जातो. इतकेच नव्हे तर गावात सॅनिटरी पॅड विल्हेवाट केंद्र देखील उभारले आहे. ग्रामपंचायतीने
वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी गावकऱ्यांना सायकल तथा वीजेवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर करण्यास प्रवृत्त केले. ग्रामपंचायतीत वीजेवर चार्ज होणाऱ्या वाहनांसाठी केंद्रही उभारले आहे.
डव्वाचे यश – संपूर्ण भारतासाठी आदर्श
गावकऱ्यांच्या या सर्व प्रयत्नांमुळे डव्वा गावात कार्बन वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी होऊन हवामान अधिक स्थिर झाले आहे. पाणीटंचाई कमी झालीआणि गावातील जैवविविधतेत वाढ झाली आहे. गावकऱ्यांचा सहभाग, इच्छाशक्ती आणि सुसंगत योजना यांच्या माध्यमातून कोणतेही गाव हवामान बदलास सामोरे जाऊन स्वतःची आणि भविष्यातील पिढ्यांची सुरक्षितता वाढवू शकते हे डव्वा ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे.
हेही वाचा – पाणी टंचाई ते पाणी पुरवठादार गावं
डव्वा गावाची पार्श्वभूमी
डव्वा हे गाव गोंदिया शहरापासून 30 कि.मी. अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 3,418 तर कुटुंब संख्या 796 आहे. हे गाव नॅशनल हायवे क्रमांक 753 ला लागून आहे. इथला मुख्य व्यवसाय शेती आहे. डव्वा ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा 4.0 मध्ये राज्यस्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस प्राप्त केले आहे. सरपंच श्रीमती योगेश्वरी चौधरी यांचे धाडस, हिम्मत आणि सातत्य ही बाब या ठिकाणी अधोरेखित करावीशी वाटते. व्यवसायाने शिक्षक असलेल्या त्यांच्या पतीचे 2017 साली निधन झाले. या दुःखातून स्वतःला सावरत त्या 2024 साली सरपंच पदावर निवडून आल्या. वैयक्तिक दुःख बाजूला सारून त्यांनी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला आणि कल्पकतेने, परिश्रमाने आपल्या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले.
ग्रामपंचायतच्या या उपक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि गावकऱ्यांसोबतच पंचायत व जिल्हापरिषद अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिल्यानं डव्वा ग्रामपंचायतीला हे यश मिळाल्याचं सरपंच योगेश्वरी चौधरी सांगतात.