एळकोट मल्हार आणि कानडी मैलारचा संबंध

खंडोबा हा देव अभ्यासकांच्या मते हा मूळचा कर्नाटकातील लोकदेव / ग्रामदेव. कर्नाटकात त्याचे नाव मैलार म्हणून ज्ञात आहे. याचा संदर्भ इसवी सन 1012 सालच्या एका कानडी शिलालेखात सापडतो. कर्नाटकातील मैलारपूर पेंबर हे खंडोबाचे आदिक्षेत्र मानले जाते.
[gspeech type=button]

महाराष्ट्रातील प्रमुख लोकदेवतांपैकी एक म्हणजे खंडोबा. प्रादेशिक दैवतशास्त्र आणि आख्यायिकांनुसार खंडोबा म्हणजे योद्धा आणि रक्षक या स्वरूपातील शिवाचे रूप. खंडोबा अवताराच्या आख्यायिकांनुसार मणि आणि मल्ल नावाच्या दोन राक्षसांनी पृथ्वीवर उच्छाद मांडण्यास सुरुवात केली. परिणामी त्यांचा पराभव करण्यासाठी शिवाने खंडोबाचे रूप घेतले आणि मणि-मल्लाचा वध केला. खंडोबाची पूजा मुख्यतः मराठा, धनगर, कुंभार, लिंगायत, माळी, महार आणि तसेच इतर अनेक समाजांमध्ये मोठ्या भक्तिभावाने केली जाते. खंडोबाचे प्रसिध्द आणि महत्वाचे मंदिर महाराष्ट्रातील जेजुरी येथे आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक लोककथा आणि लोकगीतांमध्ये खंडोबाची भक्ती दिसून येते. 

कर्नाटकचे ग्रामदैवत मैलार !

खंडोबा हा देव महाराष्ट्रात प्रसिध्द असला तरीही तो लगतच्या राज्यांतही, म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही तितकाच प्रसिध्द आहे. अभ्यासकांच्या मते हा मूळचा कर्नाटकातील लोकदेव / ग्रामदेव. कर्नाटकात त्याचे नाव मैलार म्हणून ज्ञात आहे. साधरणतः इसवी सन 1000 पासून हा ग्रामदेव कर्नाटकात प्रसिध्द होवू लागला. 

कर्नाटकमधील खंडोबाचा हजार वर्षांपूर्वीचा लिखीत पुरावा

या संदर्भातील सर्वात जुना लिखित पुरावा इसवी सन 1012 सालच्या एका कानडी शिलालेखात सापडतो. हा शिलालेख कोटवुमचगि (गदग-धारवाड) येथील आहेत. शिलालेखातील मजकुरानुसार चालुक्य सम्राट त्रिभुवन्मल्ल विक्रमादित्याचा केशवय्या नावाचा महासामंताधिपती महाप्रचंडदंडनायक होता. त्याने उमचिगे गाव रोण येथील मौनर श्रीधरभट्टास अग्रहार करून दिला. या श्रीधरभट्टाने यातील बारा मत्तर (तत्कालीन जमीन मोजण्याचे एकक) जमीन एळकोटि तपोधनाच्या अन्नसत्रासाठी दिली असा उल्लेख आहे. यातील एळकोट शब्द मैलाराच्या उपासनेत प्रसिध्द आहे. म्हणून एळकोटि तपोधन म्हणजेच मैलाराचे उपासक असे ह्या शिलालेखातील उल्लेखाचे स्पष्टीकरण श्री  ग. ह. खरे यांनी दिले आहे. 

‘एळकोट एळकोट मल्हार’चा कानडी संदर्भ 

एळकोट ह्या शब्दाची मीमांसा केल्यास, एळकोटि म्हणजेच सात कोटी सैन्य घेवून खंडोबाने मणि-मल्लाचा पाडाव केला. म्हणूनच ’सात कोटी सैन्य असलेल्या खंडोब’ अशा अर्थाने एळकोट मल्लार म्हणून त्याचा जयजयकार केला जातो. ह्यातील एळ हा सात संख्यावाचक शब्द मूळ कानडी संख्यावाचक शब्द आहे. 

खंडोबाचे आदीक्षेत्र बीदरजवळील मैल्लारपूर पेंबर

खंडोबाच्या दैवतशास्त्रानुसार मणि-मल्लाचा वध केल्यानंतर सप्तर्षींनी त्याला विनंती केली की, “ज्या ठिकाणी तुम्ही आमचे संरक्षण केले. तेथे तुम्ही स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात निवास करावात”. हा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुध्द षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी. खंडोबाचा मणि-मल्लावरील विजय साजरा करणारा हा दिवस. ज्या ठिकाणी खंडोबाने हा विजय मिळवला ते ठिकाण म्हणजे प्रेमपूर. म्हणजेच कर्नाटकातील बीदर जवळील मैलारपूर पेंबर. हे खंडोबाचे आदिक्षेत्र मानले जाते. खंडोबाच्या मल्लारिमहात्म्यात 20 आणि 21 असे दोन अध्याय क्षेत्राचा महिमा कथन करतात. 

मल्लारिमहात्म्य संस्कृत ग्रंथ 15व्या शतकात मराठीत

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे खंडोबा हा मूळचा कर्नाटकातील मैलार नावाचा लोकदेव. त्याच्या दैवतशास्त्राच्या अभ्यासानुसार असे लक्षात येते की, एका विशिष्ट काळापर्यंत त्याची लोकप्रियता आणि त्याची मान्यता मर्यादित होती. एका सबळ प्रयत्नाने हा लोकदेव प्रसिद्ध झाला. हा प्रयत्न म्हणजेच मल्लारिमहात्म्य. साधारण 1260 ते 1540 च्या दरम्यान रचला गेलेला संस्कृत ग्रंथ. नंतर साधारण 1585 मध्ये सिध्दपाल केसरी नावाच्या कवीने ह्याचे मराठीकरण केले. मल्लारिमहात्म्याने खंडोबाला दैवतशास्त्राला अनुसरून प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या ग्रंथामुळेच खंडोबाचे मल्लारि मार्तंड भैरव हे नाव प्रस्थापित झाले. त्याचबरोबर खंडोबाला शिवाचा अवतार म्हणून प्रस्थापित करण्याचे काम ह्या ग्रंथाने केले. मल्लारिमहात्म्यात येणारी खंडोबाची कथा महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकमताने स्वीकारली गेली आहे. अभ्यासकांच्या मते ग्रंथाच्या संदर्भातील अतंर्गत आणि बाह्य पुराव्यानुसार हा ग्रंथ महाराष्ट्रात रचला गेला आहे असे मानले जाते. परिणाम कर्नाटकातील मैलार महाराष्ट्रात मार्तंड भैरव किंवा खंडोबा म्हणून प्रसिध्द झाला. 

देवतांचे संस्कृतीकरण आणि उन्नयनामुळे

देवतांचे संस्कृतीकरण आणि उन्नयन हे समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. देवतांचे उन्नयन म्हणजेच एखाद्या देवतेला तिच्या मूळ स्थानापेक्षा उच्च दर्जा देणे किंवा तिचे धार्मिक व सामाजिक महत्त्व वाढवणे. देवतेचा भौगोलिक विस्तार हे या मागचे एक महत्वाचे कारण आहे. एखादी देवता विशिष्ट प्रांतापुरती मर्यादित असते, पण कालांतराने तिचे महत्त्व मोठ्या भौगोलिक प्रदेशात वाढते. याच अनुषंगाने देवतांचे संस्कृतीकरण म्हणजे एखाद्या देवतेला त्या समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आणि सामाजिक जीवनाशी जोडून तिचे महत्त्व विस्तारणे. सुरुवातीला स्थानिक किंवा विशिष्ट समाजापुरती मर्यादित असलेली देवता काळाच्या ओघात व्यापक स्तरावर स्वीकारली जाते. देवतांचे संस्कृतीकरण आणि उन्नयनामुळे सामाजिक एकता जोपासली जाते,  सांस्कृतिक विविधता आणि परंपरांचा विकास होतो. खंडोबाच्या बाबतीत असेच काहिसे घडले आहे.

खंडोबाच्या संस्कृतीकरणाचे श्रेय महाराष्ट्राकडे 

मूळच्या मैलाराचे मार्तंडभैरवस्वरूपात उन्नयन झाले. त्याचे कारण हा मल्लारिमहात्म्य हा ग्रंथ. श्रेष्ठ अभ्यासक रा. चि. ढेरे यांच्या मते, कर्नाटकातील मैलाराच्या नामरूप उपासनेचे संस्कृतीकरण म्हणजेच महाराष्ट्रातील मल्लारि मार्तंड भैरवस्वरूप. खंडोबाच्या या संस्कृतीकरणाचे श्रेय त्यांच्या मते महाराष्ट्राकडे जाते.

माळचि म्हणजे म्हाळसा

बारावे शतकातील ब्रह्मशिव नावाचा जैन कन्नड कवी जैनेतर देवतांवर टिप्पणी करतो. त्याचा मतितार्थ, नव्याने पुढे आलेल्या मैल आणि माळचि या देवता लोकप्रिय झाल्या आहेत. मग प्राचीन हरिहरांची काय कथा. म्हणजेच मैल म्हणजे खंडोबा आणि माळचि म्हणजे म्हाळसा या नव्याने उदयाला आलेल्या देवता अल्पावधीत प्रसिध्द झाल्या आहेत. हे त्याचे उद्गारही खंडोबाचे उन्नयन आणि संस्कृतीकरण अधोरेखित करतात. 

माळचि कर्नाटकातील मूळची स्वतंत्र देवता

ब्रह्मशिवाच्या विधानातील माळचि म्हणजेच खंडोबाची पत्नी म्हाळसा. माळचि देखील कर्नाटकातील एक क्षुद्र ग्रामदेवताच. ही मूळची स्वतंत्र देवता आहे. मात्र तिचे त्याच प्रदेशातील मैलार देवतेसोबत म्हणजेच खंडोबासोबत विलिनीकरण झाले. खंडोबाच्या उन्नयनासोबत तिचेही उन्नयन झाले. मल्लारिमहात्म्यात तिच्या आणि खंडोबाच्या विवाहाचे वर्णन येत नाही. कारण ह्या ग्रंथानुसार म्हाळसा ही खंडोबाची शक्ती आहे पत्नी नाही. खंडोबासोबत विलिनीकरण झाले असले तरीही तिचे स्वतंत्र अस्तित्व कर्नाटकात टिकून आहे. तिने तिच्या स्वतंत्र स्थानाचा त्याग  नाही केला. देवीहोसूर (हावेरी-धारवाड) येथील अकराव्या शतकातील प्रसिध्द मंदिर माळज देवीचे आहे. ती सध्या बनशंकरीचे म्हणून प्रसिद्ध आहे. हेच तिचे मूळ स्थान. मंदिरातील एका शिलालेखानुसार तिचे नाव माळज देवी असे येते. तिच ही माळचि म्हणजेच म्हाळसा.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ