के टी थापा : गुन्हेगारी ते नगरसेवक

KT Thapa : मुंबईच्या उपनगरात हैदोस घालणाऱ्या अनेक गुंडांपैकी एक गुंड होता तो म्हणजे के.टी.थापा. त्याचं पूर्ण नाव खिम बहादूर थापा. एका वॉचमनपासून सुरू झालेला केटी थापाचा प्रवास गुंड ते काही वर्षातच नगरसेवकापर्यंत येऊन थांबला. 
[gspeech type=button]

मुंबईच्या उपनगरात हैदोस घालणाऱ्या अनेक गुंडांपैकी एक गुंड होता तो म्हणजे के.टी.थापा. त्याचं पूर्ण नाव खिम बहादूर थापा. एका वॉचमनपासून सुरू झालेला केटी थापाचा प्रवास गुंड ते काही वर्षातच नगरसेवकापर्यंत येऊन थांबला. 

मुंबईत स्थलांतर

1960 च्या दशकामध्ये मुंबईनगरी ही व्यापारी नगरी म्हणून उदयास येऊ लागली. त्यामुळे मुंबईचं महत्त्व खूप वाढू लागलं. रोजगारासाठी स्थलातरितांचंही प्रमाण वाढत होतं. भारताच्या शेजारील देशातूनही कामाच्या शोधात अनेकजण मुंबईत येऊन स्थायिक होत होते. 

खिम बहादुर थापा याचं कुटुंबही नेपाळहून मुंबईत आलं आणि भाडुंपमध्ये स्थायिक झालं. के.टी.थापा याचं भांडुपमधल्याच गुरूनानक शाळेमध्ये शिक्षण झालं. शाळेत असताना तो खूप चांगला कबड्डीपटू म्हणून नावारूपाला आला होता.  तो ज्या संघात असेल तो संघ जिंकणारच असं एक समीकरण तयार झालं होतं. 

त्यावेळी शिवसेनेच्या शाखांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवल्या जायच्या. यातूनच हळूहळू त्याची शिवसेना नेत्यांशी ओळख झाली.  तो नियमित त्यांच्या संपर्कात राहू लागला. 

वॉचमनच्या नोकरीतून बाहेर पडून गुन्हेगारीला सुरूवात

थापाने एका बँकेत आणि नंतर एका कंपनीत वॉचमन म्हणून काम सुरु केलं. त्या कंपनीत मालक आणि कामगारांमध्ये वाद सुरु झाले, त्यावेळी थापानं कामगारांची बाजू घेत मालकाशी भांडण सुरू केलं. यात त्याची नोकरी गेली. या घटनेनंतर त्यानं पुन्हा नोकरी करण्याऐवजी या कंपनीतल्याच काही कामगारांना हाताशी घेऊन, गुन्हेगारी कामांना सुरूवात केली. हफ्ता वसूल करणं, खंडणी गोळा करणं अशा कामांमधून त्यानं भांडूपमध्ये त्याची दहशत निर्माण केली. 

छोटा राजनसाठी काम

उत्तरप्रदेशमधला सुभाषसिंग ठाकुर हा डॉन छोटा राजन आणि दाऊदसाठी काम करायचा. एखाद्या गुन्ह्यात सुभाषसिंगला पोलिसांनी  तडिपार केल्यावर तो नेपाळमध्ये आसरा घ्यायचा. अशावेळी थापा त्याची नेपाळमधली सर्व व्यवस्था पाहायचा. सुभाषसिंग ठाकुरनेच थापा याची ओळख छोटा राजनसोबत करून दिली होती. त्यानंतर तो छोटा राजनसोबत काम करू लागला. 

राजकारणात प्रवेश

मुंबईतल्या अंडरवर्ल्डमध्ये टिकून राहण्यासाठी राजकीय वरदहस्त असणं गरजेचं आहे, हे थापाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्याने राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या नेत्यांशी त्याचा आधीपासूनच संपर्क होता. गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असला तरी थापा याने स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही प्रयत्न केले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये त्याच्याविषयी चांगली प्रतिमा होती. त्यामुळे शिवसेनेने थापाला नगरसेवकाचं तिकीट दिलं. आणि तो या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आला.

नगरसेवकपदाला दिला न्याय 

नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर त्याने भांडूपमध्ये अनेक कल्याणकारी कामं पूर्ण केली. सर्वोदय नगर हा भाग टेकडीवर होता म्हणून त्याठिकाणी बेस्टच्या बसेस जात नव्हत्या. त्यावेळी थापा याने छोट्या बसेसचा वापर करण्याचा पर्याय बेस्टला दिला. काही दिवसांतच सर्वोदय भागात बेस्टकडून ही सुविधा सुरू करण्यात आली.

त्याकाळी थापा भांडूपमध्ये सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करायचा. भांडूपमध्ये त्यानं शाळाही सुरू केली होती. 

गुन्हेगारी क्षेत्रातही वाढ

थापा नगरसेवक असला तरिही गुन्हेगारी क्षेत्र काही त्यानं सोडलं नव्हतं. राजकीय नेता झाल्याने तो आता निर्धास्तपणे गुन्हेगारी क्षेत्रात काम करत होता. भांडूपच्या बाहेरही त्याने त्याचं प्रस्थ वाढवायला सुरूवात केली. अशोक जोशीच्या हद्दीत तो काम करू लागला. छोटा राजनच्या सांगण्यावरुन त्याने अशोक जोशीवर हल्ला केला. पण अशोक जोशी या हल्ल्यातून वाचला होता. 

1990च्या दरम्यान, दाऊद आणि छोटा राजनमध्ये मतभेद होऊ लागले. दाऊद आणि छोटा राजनमध्येच मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा होऊ लागली.  थापानेसुद्धा सुभाषसिंग ठाकुरसोबत दाऊदबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. 

थापाने छोटा राजनच्या हद्दीत जाऊन खंडणी आणि हफ्ता वसूली करायला सुरुवात केली. यामुळे छोटा राजनला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे तो छोटा राजनच्या हिटलिस्टवर आला. 

विश्वासू सहकाऱ्यानंच दिली टिप

1992 पर्यंत भांडूपमध्ये के टी थापाला मारणं तेवढं सोपं नाही, हे छोटा राजनला माहीत होतं. यासाठी त्याला थापाचा विश्वासू माणूस आणि चांगल्या प्लॅनिंगची गरज होती. छोटा राजननं थापाचा अत्यंत विश्वासू असलेला सहकारी अवधूत भोंडे याला फितवलं. 23 एप्रिल 1992 रोजी थापा भांडूपमधल्या एका शाळेतला कार्यक्रमावरून येत होता. त्याच्यासोबत काही पाहुणे होते. त्यांना घेऊन एलबीएस रोडवरच्या मंगतराम पेट्रोलपंपाजवळच्या एका हॉटेलमध्ये तो जेवायला गेला. कुणीही त्याला भेटायला आलं तर तो त्या पाहुण्यांना तिथंच जेवायला घेऊन जायचा. त्यामुळे तो तिथं नक्की येणार, हे अवधूत भोंडेनं छोटा राजनला सांगितलं होतं. त्यानुसार छोटा राजनने दिवाकर चुरी, अमर जुक्कर आणि संजय रग्गड या त्याच्या चांगल्या शूटर्सना हॉटेलबाहेर तैनात केलं. 

थापा हॉटेलच्या बाहेर येताच एक गाडी त्याच्या थेट समोर आली आणि त्याच्यावर धडाधड गोळीबार करू लागली. थापा स्वत:च्या बचावासाठी धावत पुन्हा हॉटेलमध्ये शिरला. पण त्याला हॉटेलमधून दुसऱ्या बाजूनं पळून जाण्यासाठी मार्ग मिळाला नाही. शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार सुरूच ठेवला. अखेर थापाचा जागीच मृत्यू झाला.  

थापाच्या हत्येचा बदला

थापाच्या हत्येनंतर त्याची टीप देणारा अवधूत भोंडे आणि तिन्ही शूटर्स हे नेपाळला पळून गेले होते. नेपाळमध्ये लपून बसलेल्या या चारही जणांना सुभाषसिंह ठाकुरने शोधलं. त्यांची हत्या करत त्यांचे मृतदेह नदीत फेकून देत थापाच्या हत्येचा बदला घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ