कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने 

Agriculture Insiders : कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने कोणती हे समजून घेऊया. ही वैशिष्ट्ये आणि आव्हाने एकमेकांशी संबंधित अशीच आहेत. कारण, अनेक आव्हाने ही कृषी निविष्ठांच्या काही गुणधर्मांशी आणि वैशिष्ट्यांशी निगडीत असलेलीच आहेत.
[gspeech type=button]

आतापर्यंत आपण कृषी निविष्ठा उत्पादनांची वैशिष्ट्ये, आणि कृषी निविष्ठा उत्पादने आणि अन्य उद्योगांमधून उत्पादित होणारी उत्पादने यांच्यामधील साम्यस्थळे आणि फरक समजून घेतले. आता कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली आव्हाने कोणती हे समजून घेऊया. ही वैशिष्ट्ये आणि आव्हाने एकमेकांशी संबंधित अशीच आहेत. कारण, अनेक आव्हाने ही कृषी निविष्ठांच्या काही गुणधर्मांशी आणि वैशिष्ट्यांशी निगडीत असलेलीच आहेत. कसे? ते पाहूया.

मागणीचा अंदाज बांधणे

एखाद्या उत्पादनाची विक्री करताना सर्वप्रथम त्याची मागणी किती आहे, याचा अभ्यास करणे आवश्यक असते. हेच कृषी निविष्ठा उत्पादनांनासुद्धा लागू आहे. परंतु कृषी निविष्ठांची मागणी ही थेट मागणी नसून ‘साधित मागणी’ (Derived demand) असते, हे आपण याअगोदर पाहिलेच आहे. ही मागणी ज्या अनेकविध घटकांवर अवलंबून असते त्यातील बहुतेक सर्वच घटक हे विक्रेत्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. त्यामुळेच मागणीचा अचूक अंदाज बांधणे कठीण असते. हे घटक म्हणजे हवामान, पाऊसपाणी, पिकांवर पडणारे रोग आणि किडी, पिकांची बाजारातील आवक आणि त्यानुसार ठरणारे बाजारभाव, सरकारी अनुदान आणि योजना, हमीभाव  इत्यादी. 

पाऊसपाणी आणि बाजारातील परिस्थिती बघून शेतकरी कुठले पीक घ्यायचे ते ठरवतात, किती प्रमाणात किंवा किती क्षेत्रावर घ्यायचे तेही ठरवतात. त्यानुसार त्यांची कृषी निविष्ठांची मागणी ठरते. पाऊस कमी असेल किंवा उशिरा असेल तर शेतकरी बियाणे आणि खते विकत घेताना थांबून, अंदाज घेऊन मगच खरेदी करतात. जर पाऊस उशिरा सुरू झाला, तर खरेदीसुद्धा लांबते. पाऊस सुरू होऊन मध्येच त्यात खंड पडला, तर मात्र दुबार पेरणीची शक्यता निर्माण होते, त्यामुळे बी-बियाण्याची मागणी वाढू शकते. तसेच अनियमित पावसामुळे रोग आणि किडी वाढतात, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी रसायने, बुरशीनाशके, कीटकनाशके यांची मागणी वाढते. 

कुठल्या पिकांवर किती सरकारी अनुदान जाहीर झाले आहे, पीक विमा योजना आणि अन्य सरकारी योजनांची स्थिती काय आहे, कोणत्या पिकांचे हमीभाव किती आहेत, ते रास्त आहेत का, शेतकरी त्याबाबत समाधानी आहेत का, समाधानी नसल्यास सरकारकडे त्यांनी त्याबद्दल मागणी केली आहे का, कोणत्या अन्य पिकांमध्ये बाजारभाव आणि हमीभाव जास्त आकर्षक आहेत, या व अशा अनेक घटकांचा एकत्रित प्रभाव कृषी निविष्ठांच्या मागणीवर पडत असतो. त्यामुळे विक्रेत्यांना अशा सर्वच घटकांचा पद्धतशीर अभ्यास करून आपली धोरणे ठरवावी लागतात आणि त्यानुसार विक्री आराखडा आखावा लागतो.

वितरण व्यवस्था करणे

कृषी निविष्ठा उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारताना येत्या हंगामात कुठल्या उत्पादनाला कुठल्या भागात किती मागणी असेल, याचा अचूक अंदाज करणे आवश्यक असते. कारण त्यानुसार वितरकांना आवश्यक तेवढी उत्पादने योग्य ठिकाणी पाठवून आपल्या गोदामांमध्ये किंवा रीटेल विक्रेत्यांकडे त्यांचा विक्री-पूर्व पुरेसा साठा करावा लागतो. त्यासाठी वाहतूक व्यवस्था आणि गोदाम व्यवस्था यांची पुरेशी तजवीज करावी लागते. हा अंदाज काहीसा चुकला आणि साठा केलेल्या प्रमाणात पुरेशी विक्री झाली नाही, तर तो वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च विक्रेत्यांना डोईजड होऊ शकतो. तसेच, एखाद्या भागात मागणीच्या अंदाजानुसार विक्री झाली नाही, परंतु दुसऱ्या एखाद्या भागात मागणीच्या अंदाजापेक्षा जास्त विक्री होऊ लागली तर कमी विक्री असलेल्या भागातून जास्त विक्री होत असलेल्या भागात पुरवठा वाढवावा लागतो. त्यासाठी अतिरिक्त वाहतूक खर्च येतो त्यामुळे नफ्याचे प्रमाण घटते. शिवाय, असा अतिरिक्त पुरवठा त्वरित व्हावा लागतो, उशीर झाल्यास विक्रीची शाश्वती नसते.

रोकड व्यवस्थापन 

कृषी निविष्ठांची खरेदी-विक्री सहसा रोख रक्कम देऊन केली जात नाही. बऱ्याच वेळा 30 / 60 / 90 दिवसांच्या क्रेडिटवर विक्री होते. अनेकदा त्यापेक्षा जास्त मुदतीची म्हणजे हंगामी पिकांच्या बाबतीत पिकाची विक्री झाल्यावरसुद्धा काही रक्कम चुकती करण्याची सवलत दिली जाते. त्याचवेळी त्यावर व्याज आकारणीसुद्धा केली जाते. कृषी निविष्ठा विकत घेण्यासाठी लागणाऱ्या रोख रकमेची टंचाई, तसेच त्यांच्या वाढत्या किंमती आणि त्या तुलनेत वाढत न जाणारे पिकांचे बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांकडे नेहेमीच रोख रकमेची टंचाई असते, त्यामुळे तेही याला मान्यता देतात. विक्रेत्यांच्या दृष्टीने मात्र वेळेत पैसे वसूल करत व्यवसायासाठी पुरेशी रोकड फिरवत राहणे, हेच एक आव्हान असते. कारण त्यांच्याकडचा माल अगोदर हातातून गेलेला असतो, वापरला गेलेला असतो आणि त्यातून तयार झालेल्या शेतमालाला किती भाव मिळणार हे निश्चित माहिती नसते. म्हणजेच शेतकरी शेती करताना जो धोका पत्करत असतात, तोच धोका हे विक्रेते स्वतःवर घेत असतात. त्यातून योग्य वेळेत पैसे वसूल करणे हे मोठे आव्हान असते.

ग्राहकांची विविधता

कृषी निविष्ठांचे ग्राहक म्हणजेच शेतकरी विविध प्रकारचे असतात आणि प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. सर्वच ग्राहकांना चालेल असे कुठलेच उत्पादन नसते. ग्राहकांची जमीनधारणा किती आहे, शेती बागायती आहे की कोरडवाहू आहे, पिके कोणती असतात (अन्नधान्य पिके / फळबाग / भाजीपाला / फुलशेती / नगदी पिके), उत्पन्नाची पातळी किती आहे, त्यांचे शिक्षण किती झाले आहे, त्यांची उच्च तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता किती आहे, त्यांच्याकडे विजेची उपलब्धता किती आहे, ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात की आधुनिक पद्धतीने, त्यांची जीवनशैली कशी आहे या सगळ्या बाबींवरून ग्राहकांची विविधता ठरते. त्यानुसार त्यांच्या गरजा बदलत असतात.

विक्रेत्यांसमोर हे मोठे आव्हान ठरते, कारण त्यांना आपापल्या क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करून त्यानुसार विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यांना नवीन उत्पादने वापरुन बघण्यासाठी उद्युक्त करावे लागते. त्यासाठी प्रसंगी त्यांना आर्थिक किंवा अन्य सुविधा पुरवाव्या लागतात. शेतजमीन धारणेच्या निकषानुसार मोठे शेतकरी (10 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक), मध्यम शेतकरी (4 ते 9 हेक्टर), अर्ध-मध्यम शेतकरी (2 ते 4 हेक्टर), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर), अल्पभूधारक शेतकरी (1 हेक्टरपर्यंत) आणि दुसऱ्याच्या मालकीच्या शेतावर शेती करणारे पट्टेदार शेतकरी (tenant farmers) असे विविध प्रकारचे शेतकरी आहेत. 

भारतात यापैकी अल्पभूधारक शेतकरी हे बहुसंख्येने म्हणजे एकूण शेतकरी संख्येच्या 80 ते 90 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. ते सर्व मिळून एकूण शेतजमिनीच्या 10 ते 20 टक्के जमीन धारण करतात. त्यांची क्रयशक्ती अतिशय कमी असते. त्यामुळे कृषी निविष्ठांची खरेदी-विक्री करण्याच्या बाबतीत, विक्रेत्यांच्या दृष्टीने पाहिल्यास ग्राहक म्हणून त्यांची संख्या प्रचंड मोठी असल्यामुळे ती एक मोठी बाजारपेठ असली तरीही त्यांच्या मर्यादित आर्थिक क्षमतेमुळे त्यांना योग्य त्या निविष्ठा पुरवून योग्य प्रमाणात नफा कमावून किफायतशीर व्यवसाय करणे हे एक आव्हान असते.

पुढील भागात, या आव्हानांना सामोरे जात कृषी निविष्ठा उद्योग आणि विक्रेते सक्षम वितरण व विक्री व्यवस्था कशी उभी करतात, हे जाणून घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ