गाण्यांमधली हरवत चाललेली ‘फिलॉसॉफी’

Philosophical Hindi Songs : बॉलीवूडच्या सुरुवातीच्या काळात किंवा अगदी 70, 90 च्या दशकापर्यंत असं नव्हतं. सिनेमाची गाणी ही तेव्हा कथा, नायक, नायिका यांच्या पलीकडे जाऊन जीवनावर भाष्य करायचे. उदाहरण सांगायचं झालं तर  राजेश खन्ना यांच्या 'जिंदगी कैसे है पहेली...' या गाण्याचा उल्लेख अग्रस्थानी करावा लागेल.
[gspeech type=button]

“आजकालची गाणी लक्षातच राहत नाहीत” किंवा “आजकालची सगळी गाणी सारखीच वाटतात” हे आपण नेहमीच ऐकत, म्हणत असतो. अरिजित सिंगच्या सुरू असलेल्या या अखंड एरा मध्ये आपण सगळे काही वर्षांपासून मनसोक्त विहार करत आहोत. आजची सर्वच गाणी वाईट आहेत असं नाहीये. पण, त्यामध्ये एक कन्फ्युजन हे आहे की, गाणं गायलं जातंय की, वाचलं जातंय हेच काही वेळेस लक्षात येत नाही. गद्य आणि पद्य यांचं एक मिश्रण आजकालच्या गाण्यांमध्ये ऐकायला मिळतं. मुख्यतः आजची गाणी ही सिनेमाचं कथानक पुढे सरकवण्याच्या हेतूने सिनेमात पेरलेली असतात. 

बॉलीवूडच्या सुरुवातीच्या काळात किंवा अगदी 70, 90 च्या दशकापर्यंत असं नव्हतं. सिनेमाची गाणी ही तेव्हा कथा, नायक, नायिका यांच्या पलीकडे जाऊन जीवनावर भाष्य करायचे. उदाहरण सांगायचं झालं तर  राजेश खन्ना यांच्या ‘जिंदगी कैसे है पहेली…’ या गाण्याचा उल्लेख अग्रस्थानी करावा लागेल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडणारे उतार- चढाव गीतकार योगेश यांनी  अडीच मिनिटांच्या गाण्यात कव्हर केले आहेत. संगीतकार सलील चौधरी यांनी या गाण्याला साजेसं संगीत दिलं आणि मन्ना डे यांनी आपल्या आवाजाने हे गाणं अजरामर केलं. 

तो भी, देखो, मन नहीं जागे

पीछे-पीछे सपनों के भागे

एक दिन सपनों का राही

चला जाए सपनों से आगे, कहाँ?

हे शब्द केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत नव्हते, तर ते एका प्रकारे जीवन जगण्यासाठी प्रेक्षकांना प्रेरित करत होते. स्वप्नांच्या मागे धावतांना आपल्या सोबतीला असलेल्या व्यक्तीकडे पण लक्ष असू द्या हे सांगत होते.

“जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम… वो फिर नही आते…” – आनंद बक्षी यांचे हे शब्द जेव्हा किशोर कुमार यांच्या खर्जातील आवाजात प्रेक्षकांपर्यंत आजही पोहोचतात, तेव्हा त्यांना ते शब्द खरे वाटतात. आपल्या जीवनात आपल्या समोर येणाऱ्या पर्यायांपैकी कोणते पर्याय आपण निवडतो आणि कोणते सोडून देतो ? कोणत्या लोकांची साथ निवडतो ? कोणाची साथ सोडून देतो ? या सर्व गोष्टींवर हे गाणं आपल्याला विचार करायला लावतं. 

1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आप की कसम’ या सिनेमातील हे गाणं राजेश खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. ‘वो फिर नही आते’ हे परत परत सांगत किशोर दा जणू आपल्याला एक वॉर्निंग देत आहेत असं वाटतं. आपल्यावरच लिहिलं गेलेलं हे गाणं पुढे जाऊन आपल्याला हे सांगतं की – 

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर

पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं

वो बहारों के आने से खिलते नहीं

जीवन सर्वांना फुलाप्रमाणे संधी देत असतं. तुम्ही जर त्या संधीबद्दल संवेदनशील असाल तर त्यांचा सुगंध तुम्हाला जाणवेल, नाही तर फुलं जशी सुकतात तशा तुमच्या जीवनातील संधी देखील एकेक करून निघून जातील. असंच जीवनात येणाऱ्या लोकांबद्दल देखील आहे हे पुढच्या ओळींमध्ये कवीने अधोरेखित केलं आहे.

कुछ लोग जो सफ़र में बिछड़ जाते हैं

वो हज़ारों के आने से मिलते नहीं

उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम

वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

ज़िन्दगी के सफ़र में …

जीवन कोणासाठी थांबत नाही. जीवनचक्र हे निरंतर सुरूच असतं.  सकाळ होते, संध्याकाळ होते, रात्र होते. आजकाल जसं एखादा व्हिडीओ बघतांना आपला ‘स्पॅन ऑफ अटेंशन’ कमी असतो आणि प्रत्येक क्षणात काहीतरी घडावं असं आपल्याला प्रेक्षक म्हणून वाटत असतं; तसं जीवनाच्या पटलावर खरंच घडत असतं. पुढच्या कडव्यात आनंद बक्षी यांनी आपल्याला हेच सांगितलं आहे:

सुबह आती है, शाम जाती है 

सुबह आती है, शाम जाती है यूंही

वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं

एक पल में ये आगे निकल जाता है

आदमी ठीक से देख पाता नहीं

और परदे पे मंज़र बदल जाता है

एक बार चले जाते हैं जो दिन\-रात सुबह\-ओ\-शाम

वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

ज़िन्दगी के सफ़र में …

ही गाणी त्या काळात लोकांना विचार करायला लावायची. त्यांचे शब्द मनात घोळायचे. आजच्या गाण्यांची ट्युन्स आपल्या लक्षात राहतात, शब्द आपण विसरतो. आपल्या जीवनाची गती अचानक किती तरी पटीने वाढली आहे, कदाचित हे देखील त्याचं एक कारण असावं. 

गीतकरांच्या व्यक्तिगत आयुष्याचा गीतलेखनावर परिणाम 

आनंद बक्षी यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर लक्षात येतं की, त्यांचं जीवन हे एखाद्या सिनेमा प्रमाणे उतार चढावांचं होतं. 1930 मध्ये आजच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे त्यांचा जन्म झाला होता. भारताच्या फाळणीनंतर काही वर्ष त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यानंतर ते काही वर्ष मेरठ येथे होते. नंतर दिल्ली आणि शेवटी मुंबई. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही वर्ष इंडियन नेव्ही मध्ये काम केलं होतं. आपल्या लिहिलेल्या कविता, गीतांचा वापर आनंदजी तेव्हा सैन्यातील जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी करायचे. आपल्या कलेला वाव मिळावा यासाठी त्यांनी मुंबई गाठली. 

1965 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जब जब फुल खिले’ हा त्यांचा पहिला यशस्वी सिनेमा होता. बॉबी, अमरप्रेम, शोले ते डीडीएलजे, ताल, परदेस, मोहोब्बते, गदर : एक प्रेम कथा सारख्या विविध जॉनरच्या सिनेमांसाठी त्यांनी गीतं लिहिली. आपल्या जीवनात ज्या व्यक्तीने इतकी स्थित्यंतरं बघितली आहेत तोच जीवनाबद्दल इतकं नेमकं भाष्य करू शकतो याची आपल्याला पण नक्कीच खात्री पटली असेल. 

योगेश गौर – 

राजेश खन्ना यांच्या ‘आनंद’ सिनेमासाठी “कही दूर जब दिन ढल जाये… ” आणि वर उल्लेख केलेल्या “जिंदगी कैसी है पहेली…” सारखी अर्थपूर्ण गाणी लिहिणाऱ्या या गीतकाराचा जन्म लखनऊ येथे झाला होता. वयाच्या 16 व्या वर्षी योगेश हे मुंबईत करियर करण्यासाठी आले होते. त्यांचे भाऊ योगेंद्र गौर हे तेव्हा बॉलीवूडमध्ये स्क्रीनप्ले रायटर म्हणून काम करायचे. कित्येक सिनेमांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर “तुम जो आओ, तो प्यार आ जाये” या मन्ना डे यांनी गायलेल्या गण्याने गीतकार म्हणून त्यांची ओळख निर्माण केली. त्यांच्या इतर उल्लेखनीय गाण्यांमध्ये आपली मुंबई अजून सुंदर दाखवणाऱ्या “रिमझिम गिरे सावन…” या गाण्याचा समावेश होतो. 

जावेद अख्तर – 

1980 च्या दशकांत स्क्रिप्ट रायटर म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जावेद अख्तर यांची सलीम खान यांच्यासोबत झालेली जोडी ही लेखकांची सर्वात यशस्वी जोडी मानली जाते. शोले, दोस्ताना, मिस्टर इंडिया सारख्या 24 सिनेमांसाठी एकत्र काम केल्यानंतर ही जोडी तुटली आणि मग जावेद अख्तर हे गीतकार म्हणून स्वतंत्रपणे काम करु लागले. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या ‘स्वदेस’च्या “यु ही चला चल राही…” या गाण्यात आपल्याला सिनेमाच्या कथानकाला बाजूला ठेवून जीवनावर भाष्य केल्याचं लक्षात येईल. या गाण्यातून जेव्हा “कितनी हसी ये दुनिया…” हे शब्द जेव्हा वारंवार कानावर पडतात तेव्हा आपण ते मान्य करतो. हे गीतकाराचं श्रेय आहे. 

‘कल हो ना हो’ या सिनेमाचा टायटल ट्रॅक लिहितांना जावेद अख्तर हे त्या ‘फिलॉसॉफीक ट्रान्स’मध्ये परत एकदा गेले होते. या गाण्याचं संगीत, चित्रीकरण बघतांना आपण काही क्षण हे विसरतो की, हे गाणं एखाद्या सिनेमातील आहे. कारण, एकेकाळी बॅकग्राउंडला 100 डान्सर सोबत नाचणारा नायक यावेळी मोठ्या पडद्यावर एकटाच वावरतांना दिसतो. शाहरुख खानचं स्वगत वाटणारं, जीवनावर प्रेम करायला लावणारं हे गाणं प्रत्येकवेळी ऐकल्यावर प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं आहे. 

आजचा संघर्ष स्थान टिकवण्याचा 

आजचे लेखक, गीतकार हे स्वतंत्र, स्थिर भारतात जन्मलेले लोक आहेत. ज्यांना गाणे लिहिण्याची आवड आहे. आजचा संघर्ष हा स्थान टिकवण्याचा आहे, त्या काळचा संघर्ष हा अस्तित्व निर्माण करण्याचा होता. 1960, 70 च्या दशकांत नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारतीय लोकांना तेव्हा “जीवन म्हणजे नेमकं काय?” हे उलगडत नव्हतं. आज तसं नाहीये. शिक्षणाचा प्रसार वाढला आहे, करिअरचे पर्याय वाढले आहेत. गीतकार नाही होऊ शकलो तर दुसरं काय ? याकरता प्लॅन बी आजच्या पिढीच्या डोक्यात तयार असतो. गाण्यांची ‘डेप्थ’ ही त्यामुळे कमी झाली, असं आपण म्हणू शकतो. गाण्यांची गरज कमी झाली, गाण्याने सिनेमाची गती कमी होते हे समज त्यात अजून भर घालत गेले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ