तुम्ही कधी असा विचार केला आहे का ? की आपले डोळे आणि कान एका क्षणात कितीतरी गोष्टी बघतात आणि ऐकतात, पण आपण एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर का लक्ष देतो? शास्त्रज्ञांनी यावरच अभ्यास करून आपल्या विचारांची कमाल गती किती असते हे शोधून काढलं आहे.
शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार आपले डोळे, कान आणि त्वचा एका सेकंदात अब्जावधी बिट्स माहिती गोळा करतात. मात्र आपला मेंदू एका सेकंदात फक्त 10 बिट्स इतकीच माहिती प्रोसेस करू शकतो. याचा अर्थ आपल्या विचारांची गती ही माहिती गोळा करण्याच्या गतीपेक्षा 10 कोटी पट कमी आहे.
आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एवढी सगळी माहिती असूनही आपला मेंदू ही माहिती का फिल्टर करतो आणि आपण एका वेळी एकाच गोष्टीवर का लक्ष केंद्रित करू शकतो?
मेंदू इतका ‘ स्लो ’ का?
हे ऐकून आश्चर्य वाटतं, पण याचं उत्तर आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासात दडलेलं आहे. पूर्वी मानव जंगलात राहत होता. त्याला सतत जीवित राहण्यासाठी अन्न शोधावं लागत होतं आणि हिंस्र प्राण्यांपासून वाचावं लागत होतं. अशावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं होतं. उदाहरणार्थ, शिकार करताना लक्ष दुसरीकडे गेलं तर अन्न मिळायचं नाही किंवा स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकायचा. हीच सवय हळूहळू आपल्या मेंदूमध्ये रुजली. म्हणूनच आजही आपला मेंदू एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो.
ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस
नवीन संशोधनाने भविष्यातील ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेसच्या कल्पनांनाही आव्हान दिलं आहे. ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस म्हणजे असं तंत्रज्ञान ज्याद्वारे माणूस थेट आपल्या मेंदूच्या साहाय्याने कॉम्प्युटरशी संवाद साधू शकेल. आणि त्यामुळे संवाद जलद होईल असं मानलं जातं. पण या संशोधनानुसार आपल्या विचारांची नैसर्गिक गतीच खूप कमी असल्यामुळे हे तंत्रज्ञान किती प्रभावी ठरेल याबद्दल शंका आहे.
आपल्या मेंदूला अनेकदा जगातली सर्वात गुंतागुंतीची मशीन म्हणतात. पण आपले विचार एका सेकंदात फक्त 10 बिट्स इतक्या हळू गतीने बाहेर पडतात, हे खरंच थोडं आश्चर्यकारक आहे.
अनेक लोकांना असं वाटतं की त्यांच्या मनात एकाच वेळी खूप सारे विचार आणि भावना येत असतात. पण तेवढ्याच वेगात त्या बोलून किंवा लिहून दाखवू शकत नाहीत. प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांना ही गोष्ट खूप त्रास देते. ते याला ‘बँडविड्थची समस्या’ म्हणतात. म्हणूनच त्यांचं स्वप्न आहे की असं तंत्रज्ञान तयार करायचं, ज्यामुळे माणूस थेट कॉम्प्युटरशी बोलू शकेल. माणसाला बोलण्याची किंवा लिहिण्याची गरज पडणार नाही. संशोधकांनी याला “मस्कचा भ्रम” असं नाव दिलं आहे.
मार्कस मेस्टर यांचे मत
अभ्यासातील महत्त्वाचे संशोधक मार्कस मेस्टर, जे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील न्यूरोसायंटिस्ट आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपला मानवी मेंदू आपण विचार करतो त्यापेक्षा खूप कमी प्रभावी आहे. निर्णय घेण्याच्या बाबतीत तो खूप हळू आहे.
या संशोधनातून हे स्पष्ट होतं की माणूस आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील माहितीचा फक्त एक छोटासा भाग समजून घेऊ शकतो. आपलं लक्ष फक्त थोड्याशा माहितीवरच जातं आणि म्हणूनच आपला अनुभव मर्यादित असतो. पूर्वीच्या संशोधनात ही महत्त्वाची गोष्ट राहिली होती. आणि झेंग यांनी आकडेवारीच्या मदतीने ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
संशोधकांनी काय अभ्यास केला?
मेस्टर आणि झेंग यांनी मानसशास्त्र, मज्जासंस्था, तंत्रज्ञान आणि मानवी कार्यक्षमतेवरील संशोधनातून माहिती एकत्र केली. त्यांनी विशेषतः मेंदूतील पेशी (न्यूरॉन्स) माहिती कशी प्रोसेस करतात याचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना तुलना करता येण्यासारखी आकडेवारी मिळाली.
विचारांची सरासरी गती
जवळपास 100 वर्षांच्या संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की मानवी विचार करण्याची गती साधारणपणे 5 ते 20 बिट्स प्रति सेकंद असते. आणि सरासरी ती 10 बिट्स प्रति सेकंद असते असं झेंग सांगतात. या माहितीच्या आधारावर त्यांनी हे देखील कॅल्क्युलेट केलं की माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात जेवढी माहिती मिळवतो ती एका लहान USB ड्राईव्हमध्ये मावेल इतकी असते.
ज्ञानेंद्रिये आणि मर्यादित लक्ष
आपल्या ज्ञानेंद्रियांकडून खूप जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत असली तरी, आपलं लक्ष फक्त थोड्याशा भागावरच केंद्रित होतं. कारण मेंदू एका वेळी फक्त 10 बिट्स माहिती प्रोसेस करू शकतो. यामुळे, जरी डोळे सर्व काही पाहत असले तरी, आपण फक्त महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींवरच लक्ष देतो. आणि प्रत्यक्षात एका वेळी एकच विचार करू शकतो. अनेकदा आपल्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल जास्त अंदाज असतो आणि एकाच वेळी अनेक विचार येत असल्याचा भ्रम होतो. पण खरं तर आपला मेंदू एका वेळेला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असतो.