आजकाल आपण हवामानाची माहिती घ्यायची असेल, तर सरळ मोबाईलमध्ये अॅप उघडतो किंवा हवामान खात्याच्या वेबसाईटवर जातो, नाहीतर टीव्हीवर रिपोर्ट बघतो. पण पूर्वीच्या काळात असं काहीच नव्हतं. तरीसुद्धा लोकांना अगदी बरोबर कळायचं की पाऊस कधी येणार. आणि हे सगळं कळायचं ते निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे आणि पावसाचे संकेत देणाऱ्या पक्षांमुळे.
हो, अगदी खरंय, पक्षी त्यांच्या वागणुकीतून, आवाजातून, घरटी बांधण्याच्या पद्धतीतून आणि हालचालींमधून पावसाची चाहूल देतात. शेतकरी, आदिवासी आणि गावाकडचे लोक आजही हे लक्षणं ओळखतात. आताच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रहांच्या मदतीने हवामानाचा अंदाज घेणारी यंत्रणा कार्यरत असली. तरी देखील ग्रामीण भागातील शेतकरी आजही परंपरागत चालत आलेल्या तंत्रांचा आणि संकेतांचा आधार घेतात.
हेही वाचा : देशांचे राष्ट्रीय पक्षी
पक्षी पावसाची वर्दी कशी देतात?
हवेमध्ये थोडा जरी ओलसरपणा आला, थोडेसे ढग जमायला लागले, तरी काही पक्षी लगेचच वेगळं वागायला लागतात. ते अधिक आवाज करतात, गाणी गातात, त्यांच्या हालचाली वाढतात, घरटी बांधायला सुरुवात करतात, काहींच्या पंखांचा रंग बदलायला लागतो. हे सगळं बघून गावातले अनुभवी लोक लगेच म्हणतात, ‘पाऊस काही दूर नाही’. पाऊस येणार असल्याची पहिली बातमी ही आपल्याला पक्षीच देतात.
चला तर मग पाहूया, पाऊस येणार असल्याची ही आनंदाची बातमी देणारे पक्षी कोणते आहेत.
पावसाची चाहूल देणारे खास पक्षी
1. ‘पेरते व्हा’ म्हणणारा पावशा पक्षी
‘पावशा’ नावाचा पक्षी खूप प्रसिद्ध आहे. हा पक्षी ‘पेरते व्हा… पेरते व्हा’ असा आवाज काढायला लागला, की शेतकरी लगेच शेतीची कामं, म्हणजे पेरणीची तयारी सुरू करतात. या पक्ष्याला ‘पर्जन्यदूत’ म्हणजे पावसाचा दूत मानलं जातं. त्याचा आवाज आणि तो ज्या पद्धतीने फिरतो, ते निसर्गात बदल होत असल्याचं स्पष्ट लक्षण असतं.
2. नवरंग पक्षी
हा रंगीबेरंगी पक्षी जंगलात आणि झाडाझुडपांमध्ये दिसतो. नवरंग पक्षी देखील पावसाच्या येण्याची चाहूल देतो. त्याचा आवाज ऐकू यायला लागला की वातावरणात बदल झालाय असं समजावं.
3. खंड्या पक्ष्यांचा पाण्याजवळ वावर
‘तिबोटी खंडवा’, ‘निळ्या कानाचा खंड्या’, आणि ‘छोटा खंड्या’ हे पक्षी पावसाच्या आधी पाण्याजवळ किंवा ओल्या माळरानांमध्ये फिरताना दिसतात. हे निरीक्षण शेतकरी खूप काळापासून करत आलेत. खंड्या पक्षाचा पाण्याजवळचा वावर वाढला म्हणजे लवकरच पावसाची सुरुवात होणार आहे, असा संकेत समजतात.
4. पाणकोंबडी आणि मोर
जेव्हा मोर जोरात ओरडतो किंवा नाचतो, तेव्हा वातावरणात ओलावा वाढलेला असतो. हाच ओलसरपणा म्हणजे पावसाची चाहूल. पाणकोंबडीही पावसाआधी गोंगाट करते, पाण्याजवळ राहते. हे दोन्ही पक्षी पावसाळ्यापूर्वी ओरडून पावसाची पूर्वकल्पना देतात.
5. तित्तीर पक्षी
तित्तीर हा माळरानात आढळणारा पक्षी आहे. याच्या अंगावर काळे-पांढरे ठिपके असतात आणि तो “कोड्यान केको, कोड्यान केको” असा विशिष्ट आवाज करतो.
हा आवाज ऐकू आला की शेतकऱ्यांना पावसाळा जवळ आल्याची खात्री होते.
6. कोकीळ, कावळा आणि चिमणी
‘कोकीळ’, ‘कावळा’ आणि ‘चिमणी’ हे पक्षीही आपली वागणूक बदलतात. कोकीळाचा मधुर स्वर, कावळ्यांचे मोठ्या थव्याने ओरडणे, चिमण्यांची नेहमीपेक्षा जास्त हालचाल, यावरून वातावरणात बदल होत असल्याचे संकेत मिळतात. ही सगळी लक्षणं एकत्र पाहिली की शेतकऱ्यांना अंदाज येतो की, लवकरच पाऊस येणार आहे.
7. चातक पक्षी
चातक हा पाहुणा पक्षी आहे जो आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करतो. असे म्हणतात की चातक पक्षी येताना सोबत पाऊस घेऊनच येतो. पाऊस वेळेवर येणार असेल तर चातक पक्षीसुद्धा लवकर येतात. पण जर चातक पक्ष्यांना यायला उशिरा झाला तर पाऊस पण लांबणीवर जातो असा पक्षीतज्ञानचा अनुभव आहे. चातक पक्षी ‘पिऊ… पिऊ’ आवाजात ओरडू लागले की समजून जायचं मिरगातला पहिला पाऊस लवकरच पडणार आहे.
पक्ष्यांबद्दलची ही माहिती पिढ्यानपिढ्या चालत आलेले अनुभव आहेत. गावातल्या शेतकऱ्यांनी, आदिवासी लोकांनी आणि निसर्ग निरीक्षकांनी हे सगळं लक्षपूर्वक पाहिलं आणि अनुभवल आहे.