पूर्वी सणासुदीला किंवा विशेष प्रसंगीच असणारे गोड पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात कधी शिरले ते कळलंच नाही. उपलब्धता आणि वस्तू घेण्याची क्षमता या प्रमेयाला जागत कळत-नकळतपणे आपल्या आहारात वेगवेगळ्या मार्गाने साखर स्थिरावली.
पण साखर खाणं बंद केल्यास आपल्या शरीरात अनेक चांगले बदल होतात. किती दिवसांत नेमका काय फरक पडतो पाहुयात.
रक्तातील साखरेचं प्रमाण (blood sugar) हळूहळू कमी व्हायला लागतं. झोपण्याआधी आपण जे शेवटचं काही अन्न खातो, त्यातली साखर (glucose) शरीर वापरायला सुरुवात करतं. त्यामुळे रक्तातील साखर नॉर्मल होते.
इन्सुलिन नावाचं एक महत्त्वाचं द्रव्य रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. साखर खाणे थांबवल्यास , शरीर साठवलेली साखर आणि ग्लायकोजेन वापरून ऊर्जा तयार होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहते. आणि मूड बदलणे, थकवा येणं , पुन्हा साखर खाण्याची इच्छा होणं या गोष्टी टाळता येतात. साखर खाणे थांबवल्यास एका दिवसात, यकृत (Liver) ग्लायकोजेनचं रूपांतर साखरेत करतं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य ठेवतं.
साखर कमी केल्यावर शरीरात होणारे बदल
आपल्या शरीरात साखरेचा पुरवठा कमी झाला की, शरीरात ‘ग्लायकोजेनोलिसिस’ नावाची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत, शरीरात साठवलेले ‘ग्लायकोजेन’ साखरेत बदलतं. त्यामुळे, अन्नातून साखर मिळाली नाही तरी, आपल्याला ऊर्जा मिळत राहते.
पण, जेव्हा शरीर साखरेच्या कमतरतेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. डोकेदुखी, चिडचिड , थकवा जाणवू शकतो. हे तात्पुरते असतं, नंतर शरीर सवयीचं होतं.
साखर खाणं कमी केल्यावर आपल्या मेंदूतील ‘डोपामिन’ नावाचं एक रसायन कमी होतं. साखर खाल्ल्यावर हे रसायन वाढतं, पण साखर बंद केल्यावर ते कमी होतं. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी, चिडचिड असे त्रास होऊ शकतात. पण, दोन दिवसांनी शरीर साखरेऐवजी साठवलेली चरबी वापरून ‘किटोन’ तयार करतं, यामुळे शरीराला आणि मेंदूला ऊर्जा मिळते.
साखर बंद केल्यावर काय होतं?
साखर खाणं थांबवलं की शरीराला साखरेऐवजी चरबीतून ऊर्जा मिळवावी लागते. यामुळे काही जणांना जास्त उत्साही वाटू शकतं आणि डोकंही शांत होतं. पण, काही जणांना ‘केटो फ्लू’ नावाचा त्रास होऊ शकतो. यात मळमळ होणे, डोकं दुखणं आणि चक्कर येणं असे त्रास होतात. हे त्रास तात्पुरते असतात.
भरपूर पाणी पिऊन आणि शरीरातील क्षार (इलेक्ट्रोलाईट्स) संतुलित ठेवून हा त्रास कमी करता येतो. साखर न खाता एक आठवडा झाल्यावर, तुमच्या जिभेची चव बदलते. पूर्वी फिकट वाटणारे पदार्थ, जसे की फळे आणि भाज्या जास्त चवदार लागतात. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते.
शरीराला काय फायदा होतो?
साखर खाणे बंद केल्यामुळे आपले शरीर हळूहळू शरीरातील चरबीपासून ऊर्जा तयार करतं. आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते आणि आपले आरोग्य सुधारते. तुमचं शरीर साखरेचा वापर चांगल्या प्रकारे करायला लागतं, यामुळे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ आणि ‘टाइप 2 मधुमेह’ होण्याचा धोका कमी होतो.
दोन आठवडे साखर बंद केल्यावर काय होतं?
दोन आठवडे साखर खाणं पूर्णपणे थांबवलं की तुमची ऊर्जा स्थिर होते. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा येत नाही. कारण तुमचं शरीर साखरेच्या तात्पुरत्या ऊर्जेवर अवलंबून न राहता, चरबी आणि प्रथिनांच्या स्थिर ऊर्जेचा वापर करायला सुरवात करते.
तसेच शरीरातील सूज कमी होते, त्वचा चांगली होते, सांधेदुखी कमी होते. हृदयविकार आणि काही कर्करोगांसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील कमी होतो. साखर न खाल्ल्याने, आपल्या आतड्यातील चांगले बॅक्टेरिया संतुलित राहतात, जे पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
एक महिना साखर बंद केल्यावर काय होतं?
तुम्ही जर एक महिना साखर खाणे पूर्णपणे बंद केली तर शरीरात होणारे आणखी चांगले बदल तुम्हाला दिसतील. विशेषतः पोटावरची चरबी कमी होते. पोटातील अवयवांभोवती असलेली चरबी कमी झाल्यामुळे, ‘मेटॅबोलिक सिंड्रोम’ आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.
यकृताचे आरोग्य सुधारतं, कारण त्याला जास्त प्रमाणात ‘फ्रुक्टोज’ (फळांतील साखर) प्रक्रिया करावी लागत नाही. जास्त फ्रुक्टोज खाल्ल्याने यकृताला चरबीयुक्त आजार होऊ शकतो, पण साखर बंद केल्याने ते टाळता येतं.
त्याचप्रमाणे आपले मानसिक आरोग्य सुधारते. दीर्घकाळ साखर न खाल्ल्याने, तुमचा मूड चांगला राहतो, चिंता आणि नैराश्य कमी होते.
शरीरातील चरबी कमी झाल्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. रक्तदाब कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. साखर बंद केल्याने, दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होण्याची शक्यता देखील कमी होते.