न्यायालय, पोलिस स्टेशन आणि रूग्णालयाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. या तिन्ही ठिकाणांबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये भिती आणि त्याहून जास्त गैरसमज जास्त असतात. रुग्णालयाची पायरी ही कधी ना कधी चढावी लागतेच. पोलिस स्टेशन आणि न्यायालयासारखी ती टाळता येत नाही. पण या भिती वा गैरसमजांमुळे अनेक गुन्ह्यांची नोंद केली जात नाही. परिणामी, अशा घटनांमुळे गुन्ह्यांचं प्रमाणही वाढत जातं. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून दखलपात्र असलेल्या गुन्ह्यांची नोंद आपण केली पाहिजे. एफआयआर दाखल करण्यासाठी नागरिकांना पोलिस स्टेशनला येणं शक्य नसेल, तर त्यांना आता ई-एफआयआर दाखल करता येणार आहे.
ई – एफआयआर काय असते?
ई-एफआयआर म्हणजे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. नागरिकांना लहान-मोठ्या चोऱ्या किंवा त्रासांबद्दल जसं की, मोबाईल हरवणं वा चोरी होणे, पाकीट चोरीला जाणे, गाडीची चोरी अशा स्वरुपाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल करणं शक्य नसतं. बऱ्याचदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणं, प्रसंगी पोलिस कर्मचारी उपस्थित नसेल तर वाट पाहत बसणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ लागतो. त्यामुळे या घटनांची तक्रार दाखल करायला एखाद्याकडून टाळाटाळ होऊ शकते. अशा गोष्टींची तक्रार आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करता येते. ऑनलाईन पद्धतीने एफआयआर दाखल केल्यावर, त्या एफआयआर काय कारवाई केली? याबाबतची माहिती आणि पाठपुरावाही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घेता येतो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करणं हे जास्त सोयीचं आणि सुरक्षित झालं आहे.
ई – एफआयआर कशी दाखल करायची?
ई – एफआयआर दाखल करण्यासाठी विभागनिहाय पोलिस स्टेशनच्या वेबसाईट्स तयार केलेल्या असतात. त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन एफआयआर हा पर्याय निवडावा लागतो.
- त्यानंतर वेबसाईटवर विचारलेली प्राथमिक माहिती जसे की, आपलं नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि ई-मेल आयडी द्यायचा.
- गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे आणि गुन्ह्याचे ठिकाण, वेळ, काय घडलं, आरोपीची माहिती, प्रत्यक्षदर्शी असतील तर त्यासंदर्भातली माहिती द्यावी लागते.
- ऑनलाइन तक्रार नोंदवल्यावर त्याची पावती आपल्याला आपल्या ई-मेलवर मिळते. पावतीमध्ये तक्रार क्रमांक दिलेला असतो. या तक्रार क्रमांकावरून आपण आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करू शकतो.
- यामध्ये अजामिनपात्र, गंभीर गुन्ह्यांची ऑनलाईन एफआयआर नोंदवल्यानंतर त्यावर पुढील तीन दिवसात संबंधित पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्या ऑनलाईन नएफआयआर कॉपीवर पोलिसांची सही घेणं अत्यावश्यक आहे.
अनेकदा अनेक तक्रारीची नोंद वा एफआयआर दाखल करून घेण्यासाठी पोलिस यंत्रणा तयार नसते. काही प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवू नये म्हणून पोलिसांकडून दमदाटी वा दबाव टाकला जातो. अशावेळी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करणं सोपं होतं. एकदा का ऑनलाईन पोर्टलवर तक्रार दाखल केली की ती काढता येत नाही. त्यामुळे पिडीत व्यक्तिंना न्याय मिळणं जास्त सोपं जातं.