सणासुदीच्या काळात अनेक अत्यावश्यक गोष्टींच्या किंमती वाढत जातात. तेल, साखर, विविध डाळी, सुकामेवा, तूप अशा सगळ्याच गोष्टींच्या किंमती गगनाला भिडतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना उत्साहात सण साजरे करताना किचन बजेटचा पूर्ण विचार करावाच लागतो. मात्र, यंदा तसं होणार नाही. यंदा तुम्ही तुमची दिवाळी दणक्यातच साजरी करू शकता.
कारण, केंद्रीय अन्न – प्रशासन सचिवांनी सर्व खाद्यतेल कंपनींना तेलाच्या किंमती खाली आणण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच गहू, साखर आणि धान्याचाही पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असून या उत्सवाच्या काळात त्याचीसुद्धा चढ्या भावाने विक्री न करण्याचे आदेश दिलेले आहेत.
केंद्रीय अन्न – प्रशासन सचिवांनी तेल कंपन्यांना का दिले निर्देश?
अनेकदा केंद्रीय पातळीवर आयात शुल्कात वाढ केल्यावर संबंधित उत्पादनाच्या किंमतीत उत्पादकांकडून वाढ केली जाते. दिनांक 14 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने रिफाईन आणि कच्चे सोयाबीन, पाम, सूर्यफुल तेलाच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे.
याचा आधार घेऊन अनेक खाद्यातेल कंपन्यांनी आपल्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. मात्र, आयात शुल्क कमी असताना देशामध्ये या तेलाचा मुबलक साठा करून ठेवण्यात आला होता. त्यामुळे कमी आयात शुल्क असताना घेतलेले तेल अलिकडे वाढवलेल्या आयात शुल्काच्या आधारावर वाढीव किंमतीत विकणे चुकीचं असल्याचं मत केंद्र सरकारने मांडले आहे.
त्यामुळे खाद्यतेल कंपन्यांकडून गैर पद्धतीने करण्यात येत असलेली ही वाढ रोखण्यासाठी आणि विशेषत: सणासुदीच्या काळात या तेलाच्या किंमती आटोक्यात राहाव्यात, यासाठी केंद्र सरकारने या सर्व कंपन्यांना कठोर निर्देश दिले आहेत.
खाद्यतेलाचा उपलब्ध साठा आणि तेलाच्या किंमती
कमी आयात शुल्क असताना आयात केलेल्या तेलापैकी सद्धा 30 लाख टन तेल शिल्लक आहे. हे तेल पुढचे 45 ते 50 दिवस संपूर्ण देशाची गरज भागवू शकते.
तरिही आयात शुल्क वाढीचा गैरफायदा घेत खाद्यतेल कंपन्या सोयाबीन तेल 105 रूपयावरून 130 रूपयांनी विकत आहेत. पाम आणि रिफाईन तेलामध्ये सुद्धा अशीच अवाजवी वाढ केली आहे.
नवीन आयात शुल्क
सरकारने एकूणच कच्च्या आणि रिफाईन तेलावर 20 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे कच्चे सोयाबीन, पाम आणि सूर्यफुल तेलावर 27.5 टक्के आयात शुल्क लागते. तर, रिफाईन सोयाबीन, पाम आणि सूर्यफूलाच्या तेलावर 35.75 टक्के आयात शुल्क लागू झालं आहे.
केंद्र सरकारने आयात शुल्क का वाढवले?
देशात आता सोयाबीनचे पिक तयार बाजारात येऊ लागलं आहे. या सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून बाहेरून आयात करीत असलेल्या सोयाबीनवर सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम ही सोयाबीनच्या विक्री भावावरून दिसून येत आहे. दिवसेंगणिक या भावात 100 ते 200 रूपयांची वाढ पाहायला मिळते. आज बाजारात सोयाबीनचा भाव 4 ते 5 हजार रूपये आहे.