भारताकडून रशियामध्ये स्वदेशी बनावटीच्या कावेरी जेट इंजिनच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. डीआरडीओ या भारतीय संरक्षण शस्त्रास्त्राच्या निर्मिती करणाऱ्या संस्थेकडून या चाचण्या केल्या जात आहेत. मानवविरहीत लढाऊ हवाई वाहनामध्ये (UCAV) या कावेरी जेट इंजिनचा वापर केला जाणार आहे.
भारतीय बनावटीच्याच तेजस या लढाई विमानासाठी कावेरी जेट इंजिनची निर्मिती केली होती. मात्र आता ते मानवविरहीत लढाऊ विमानासाठी वापरलं जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. यामुळे जनमाणसातही भारतीय शस्त्रांबद्दल विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक स्वदेशी संरक्षण शस्त्रांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. तर जाणून घेऊयात काय आहे नेमकं कावेरी जेट इंजिन.
कावेरी जेट इंजिन
कावेरी इंजिन हे कमी बायपास असलेलं ट्विन स्पूल टर्बोफेन (दोन टर्बोफेन) असलेलं इंजिन आहे. यामध्ये कमी बायपास म्हणजे इंजिनच्या गाभ्यामधून कमी हवा पास होते. जास्तीत जास्त हवा ही टर्बाईनमधून पास होईल अशी प्रणाली विकसीत केली जाते. जेणेकरुन यामुळे या लढाई विमानांना जास्त वेग आणि शक्ती मिळू शकेल. हे इंजिन लढाऊ विमानाला 80 किलोन्यूटन्स (kN) थ्रस्ट म्हणजे वेगाने पुढे जाण्यासाठी शक्ती देते. हे इंजिन डीआरडीओ अंतर्गत गॅस टर्वाईन रिसर्च एस्टाब्लिशमेंटने निर्माण केलं आहे.
भारतीय तेजस या लढाई विमानासाठी सन 1980 साली या कावेरी जेट इंजिन प्रकल्पाला सुरुवात झाली होती. उच्च-गती आणि उच्च-तापमानाच्या परिस्थितीमुळे थ्रस्ट ड्रॉप कमी करण्यासाठी इंजिनची रचना फ्लॅट-रेटेड स्वरुपात केली आहे. डीआरडीओच्या माहितीनुसार, ट्विन लेन आणि पुरेसा मॅन्युअल बॅकअपसह हे इंजिन डिजिटल स्वरुपात नियंत्रीत केलं जाणार आहे. हे या इंजिनचं खास वैशिष्ट्य आहे.
तेजस ते घातक
1980 साली निर्माण करायला घेतलेलं कावेरी इंजिन अजून का वापरलं गेलं नाही हा प्रश्न आपल्याला पडला असेल. हे इंजिन विशेष करुन तेजससाठी तयार करण्यात येत होतं. मात्र तेजस हे लढाऊ विमान वजनाने हलकं आहे. कावेरी इंजिनमधला वेग आणि शक्तीचा दबाव आणि तेजस विमानाचं वजन यामध्ये असंतुलन होतं. त्यामुळे हे इंजिन तेजससाठी वापरता आलं नाही. तांत्रिक अडचणीमुळे तेजसला कावेरी इंजिन न वापरता आल्यामुळे मग अमेरिकन बनावटीच्या जीई एफ 404 इंजिन वापरावं लागलं.
याशिवाय 1998 साली भारताने अणूचाचण्या केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर अनेक निर्बंध टाकले गेले. याचा परिणामही या प्रकल्पावर पडला. या अडचणीशिवाय भारतासमोर आणखीन एक आव्हान होतं ते या इंजिनची चाचणी करण्याचं. भारताकडे या इंजिनची चाचणी करण्यासाठी आवश्यक ती सुविधा नसल्यामुळे भारताला रशियावर अवलंबून राहावं लागलं. त्यामुळे रशियाकडून चाचणीसाठी वेळ मिळायला विलंब लागल्यामुळे या इंजिनची चाचणी करण्यात उशीर लागत होता.
या सगळ्या कारणांमुळे हा प्रकल्प जवळपास बंद पडल्यासारखी परिस्थिती होती. मात्र, 2016 साली केंद्र सरकारने साफ्रेन या फ्रेंच कंपनीसोबत केलेल्या करारानंतर या प्रकल्पाला नव्याने सुरुवात झाली. त्यानंतर तेजसऐवजी घातक स्टेल्थ ड्रोनप्रमाणे मानव विरहित लढाऊ विमानांसाठी या इंजिनचा वापर करण्याचं निश्चित झालं असून त्या अनुषंगाने आता चाचण्या सुरु आहेत.