पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विमा सखी योजने’चा शुभारंभ केला. या योजने अंतर्गत दोन लाख महिला एलआयसी एजंट म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांना मानधनही देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी हरियाणा मधल्या पानिपत इथून ‘विमा सखी योजने’चा शुभारंभ केला.
काय आहे विमा सखी योजना?
महिलांना आर्थिक क्षेत्राशी जोडून घेणं आणि समाजातही विमा संदर्भात जनजागृती करण्यासाठी ही विशेष योजना सुरू केली आहे.
विमा सखी योजने अंतर्गत वयोवर्षे 18 ते 70 वयोगटातल्या महिलांना एलआयसीचे विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे. मात्र यासाठी लाभार्थी महिलांचे किमान 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना एलआयसीचे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येऊ शकते. मात्र या योजनेकरता एक महत्त्वाची अट आहे. एलआयसीचे एजंट म्हणून सध्या काम करत असलेल्या लोकांच्या नातेवाईक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या सर्व महिलांना आवश्यक ते प्रशिक्षण सरकारकडून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत आणि पुढील तीन वर्षापर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम (साधारण 5 ते 7 हजार रूपये) मानधन म्हणून देण्यात येणार आहे. तीन वर्षानंतर या महिला एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होतील. त्यांना प्रत्येक पॉलिसवर कमिशन दिलं जाईल. तसचं टार्गेट पूर्ण केल्यावर बोनसही दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करायचा आहे.
या योजने अतंर्गत येत्या एका वर्षात दोन लाख विमा सखी लाभार्थी बनवण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे.