ज्येष्ठ नागरिकांना आता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आरोग्यविमा काढता येणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलानुसार आता आरोग्य विमा काढण्याची वयोमर्यादाचा रद्द केली आहे. शिवाय हा विमा ज्येष्ठ नागरिकांना परवडेल आणि त्याच्या वार्षिक प्रिमियम वाढीसंदर्भात सुद्धा IRDAI विमा कंपन्यांना निर्देश दिलेले आहेत. समजून घेऊयात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचा नवीन नियम काय आहेत आणि याचा विमा पॉलिसी कंपन्यांच्या व्यवसायावर काही परिणाम होतो का?
आरोग्यविम्यासाठी वयोमर्यादेची अट काढली
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा घेण्यासाठी जी वयोमर्यादेची अट होती ती रद्द केली आहे. यापूर्वी 65 वयवर्षापर्यंतच्याच लोकांना आरोग्यविमा काढता येत होता. मात्र, आता अशी कोणतीही वयाची अट ठेवली नाही आहे. त्यामुळे आता 80 आणि 99 वर्षाच्या वृद्ध नागरिकांनाही आरोग्य विमा काढता येणार आहे.
विमा हप्त्यातील वाढ
आरोग्यविमा घेतल्यावर त्याच्या हप्त्यामध्ये (प्रिमियम) वर्षागणिक काही टक्क्याने वाढ होत असते. यानुसार ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विम्याच्या हप्त्यामध्ये जास्तीत जास्त 10 टक्क्यांपर्यंतच वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरुन, सर्व ज्येष्ठ नागरिकांना हा विमा परवडण्याजोगा होईल. वाढत्या हप्त्यापासून त्यांचं रक्षण होऊन त्यांचं कव्हरेज वाढेल.
गंभीर आजारासाठी विमा नाकारता येणार नाही
नवीन नियमांनुसार, वृद्ध व्यक्तिनां जे पहिल्यांदा विमा पॉलिसी घेत आहेत त्यांना जर का कोणताही गंभीर आजार पूर्वीपासून असेल तरिही त्यांना विमा नाकारता येणार नाही. थोडक्यात विमा काढण्याआधी जरी त्या वृद्ध व्यक्तीला कॅन्सर, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणं, तत्सम कोणता आजार किंवा एचआयव्ही जरी असेल तरी त्यांना विमा देणं बंधनकारक आहे.
हे ही वाचा : केंद्र सरकारची नवीन विमा सखी योजना; दोन लाख महिलांना मिळणार रोजगार
वेटिंग कालावधीत कपात
जर विमा काढण्यापूर्वी आपल्याला जर कोणता आजार असेल आणि त्यावर उपचार आपल्याला विम्यातून करुन घ्यायचे असतील तर त्यासाठी वेटिंग पिरीयड असतो. ज्येष्ठ नागरिक नसलेल्या लोकांना हा वेटिंग पिरीयड तीन वर्षाचा असतो. मात्र, वृद्ध लोकांसाठी हा कालावधी दोन वर्षाचा करण्यात आला आहे. यानुसार, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला स्टोन, मोतीबिंदू, पाईल्स वा या पद्धतीच्या आणखीन कोणत्या आजारा संबंधित सर्जरी करायची असेल तर ती विमा घेतल्यापासून दोन वर्षानंतर त्या विम्याचा लाभ घेता येतो.
या निर्णयाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पॉलिसी निर्माण करणं त्या गरजूपर्यंत पोहोचविणं, तसंच ज्येष्ठ नागरिकांनी पॉलिसी क्लेम केल्यावर त्यांची कामं प्राथमिकता देऊन पूर्ण करणं, त्यांच्या शंकाचं आणि तक्रारीचं योग्य पद्धतीने निवारण करणं याविषयीसुद्धा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
आयुष्यमान आरोग्य योजना
आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत भारत सरकारने वयोमर्यादा हटवली आहे. शिवाय वयोवर्षे 70 आणि त्यावरील वृद्ध माणसांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमीचीही अट ठेवलेली नाही. भारत सरकारच्या या निर्णयामुळे देशातल्या प्रत्येक वृद्ध माणसाला आरोग्यविम्याचा लाभ घेता येतो. त्यामुळे जे वृद्ध नागरिक स्वखर्चाने आरोग्यविमा काढू शकत नाही त्यांना या योजनेचा लाभ निश्चितच घेता येईल.
या नविन नियमांमुळे विमा कंपन्यांच्या व्यवसायावर काही परिणाम झाला का? वृद्ध नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो याविषयी ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’ने एलआयसी विकास अधिकारी संदीप मुळे यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले की, आरोग्यविम्याची वयोमर्यादेची अट रद्दबादल करण्याचा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचा निर्णय खूपच चांगला आहे. यामुळे सर्वप्रथम प्रत्येक वयोगटातल्या नागरिकाला विमा संरक्षण मिळेल याची खात्री निर्माण झाली. केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेअंतर्गत सुद्धा देशातील प्रत्येक नागरिकाला व्यापक आरोग्य सुरक्षा कवच मिळालेलं आहे. या योजनेचे अनेक फायदे आहेत. पण आयुष्ममान योजनेचे लाभ केवळ सरकारी आणि काही ठरावीक खाजगी रुग्णालयातच घेता येतात.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नियमांनुसार आरोग्यविम्यासाठी वृद्ध माणसांची वयोमर्यादा हटवल्यानंतर अनेक विमा कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामध्ये कोणताही आजार असला आणि कितीही वय असलं तरी विमा द्यावाच लागतो.
मात्र या दोन अटीमुळे कंपन्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत नाही. कारण ज्येष्ठ नागरिक असल्याने मुळातच त्यांच्या हप्त्याची रक्कम ही वर्षाला साधारण 80 हजार पर्यंत असते. त्याशिवाय सामान्य विमा धारकांच्या वार्षिक हप्त्यामध्ये जवळपास 5 ते 6 टक्के वाढ केली जाते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या वार्षिक हप्त्यामध्ये ही वाढ 10 टक्क्यांपर्यंत केली जाते. त्याहून जास्त करता येत नाही.
दरम्यान, विम्याची वार्षिक रक्कम पाहता सगळ्याच वृद्ध लोकांना विमा काढणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेक विमा कंपन्यांनी वयोवर्षे 75 पर्यंतच्या वृद्ध लोकांसाठी विशेष पॉलिसी योजना विकसीत केल्या आहेत. ज्यामध्ये सर्व आजारांवर विमा दिला जातो. पण विम्याच्या हप्त्यांची रक्कम ही काही अंशी कमी असते. एकूणच प्राधिकरणाच्या या निर्णयानंतर वृद्ध लोकांनाही आरोग्य विम्याचे फायदे मिळू लागले आहेत.